शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी सुकाणू समितीकडून सोमवारी राज्यभर 'रास्ता रोको' करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातही ठिकठिकाणी समितीच्यावतीने 'रास्ता रोको' करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. जिल्हयातील पैठण, गंगापूर वैजापूर, खुलताबाद, कन्नड, फुलंब्री आणि औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात सुकाणू समितीने 'रास्ता रोको' केला. सरकारनं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना झेंडावंदन करु देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे नियमित व थकीत कर्ज माफ करावे. तसेच पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, यासाठी शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव द्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि मातांना पाच हजार रुपये पेन्शन सुरु करा, तसेच त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, गाईच्या दुधाला ५० तर म्हशीच्या दुधाला ६५ रुपये भाव द्या, अशा विविध मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. राज्यभर ठिकठिकाणी समितीच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातील क्रांती चौकात समितीच्यावतीनं निदर्शनं करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा ठेवण्यात आला होता. आंदोलन सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. औरंगाबाद-पुणे महामार्गावर कायगाव टोक याठिकाणी काही काळ 'रास्ता रोको' करण्यात आला. तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर याठिकाणी बैलगाडी रस्त्याच्या मधोमध उभी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी सुकाणू समिती आजही आक्रमक आहे.