राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबनानंतर बीड जिल्ह्य़ात सुरेश धस यांच्या समर्थकांचा सूर राजकारणातील काही नेते आपल्या खास शैलीने कायम चच्रेत असतात. पक्ष कोणताही असो, मतदारसंघावरील पकडही मजबूत ठेवतात. आपल्या रांगडय़ा स्वभावाने आणि अस्सल बोली भाषेतील भाषणांनी सुरेश धस यांचाही २० वर्षांपासून प्रभाव आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला उघड मदत केल्यामुळे राष्ट्रवादीने निलंबित करताच त्यांच्या बहुतांशी समर्थकांनीही पक्षांच्या पदाचे राजीनामे देत ‘आता कसं, अण्णा म्हणतील तसं’ असा सूर लगावत असल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या कट्टर राजकीय विरोधक दिग्गज नेत्यांनी अनेकांना ‘कात्रजचा घाट’ दाखवून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. मात्र दोन्ही दिग्गज नेत्यांचा विश्वास संपादन करून दोघांनाही ‘राजकीय हाबाडा’ देण्याची नोंद माजी मंत्री सुरेश धस यांच्या नावावर झाली आहे. १२ वर्षांपूर्वी दिवंगत मुंडेंच्या ताब्यातील जिल्हा परिषदेत सत्तांतर केल्यानंतर धस यांनी पुन्हा या वेळी सत्तांतर घडवून उघडपणे भाजपला मदत केली. परिणामी राष्ट्रवादीने धस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले असून आता गावागावांत जाऊन कोणत्या पक्षात प्रवेश करावा, याची चाचपणी सुरू केली आहे. पडद्याआड ठरल्याप्रमाणे पक्षप्रवेश निश्चित असला तरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांमधून वातावरणनिर्मिती केली जात आहे. पक्षाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर मतदारसंघातील तीनही नगरपंचायती, तालुका पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन ‘आता कसं, तर अण्णा म्हणतील तसं’ असा सूर आवळल्याने समाजमाध्यमांसह गावागावांत ‘अण्णा म्हणतील तसं’ याचीच चर्चा रंगली आहे. कार्यशैलीमुळे छाप २० वर्षांपूर्वी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालेल्या सुरेश धस यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या राजकीय तडजोडीत उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. कार्यकर्त्यांचा कायम गोतावळा आणि कोणत्याही कामाचा प्रत्येक टेबलावर जाऊन पाठपुरावा करत बोली भाषेत भाषण करण्याच्या शैलीमुळे धस यांचे नेतृत्व अल्पकाळात उदयाला आले. दिवंगत मुंडे यांचे खास विश्वासू झाल्यानंतर आष्टी मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला. मात्र राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे बारा वर्षांपूर्वी धस यांनी दिवंगत मुंडे यांच्या ताब्यातील जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून बारामतीकरांचा विश्वास संपादन केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केल्यामुळे त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. मतदारसंघाचा ‘सालकरी’ असल्याचे सांगत धस यांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. लोकसभा निवडणुकीत दिवंगत मुंडे यांच्या विरोधात पक्षातील कोणीच उभे राहण्यास धजावत नव्हते तेव्हा धस यांनी हा विडा उचलला. मात्र लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही या वेळी अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून धस यांची राष्ट्रवादीतील अस्वस्थता अनेक कार्यक्रमांतून दिसू लागली होती. धस यांनी संधी येताच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तांतराचा डाव यशस्वी केला.