नगर जिल्हय़ातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून झालेले हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपदावरून मुक्त व्हावे, अशी मागणी स्वराज अभियान संघटनेने केली. क्रांती चौकात स्वराज अभियानच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केली. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्हय़ात अमानुष प्रकार वारंवार होत आहेत. ते का घडतात, याचा शोध शासकीय यंत्रणेने घ्यावा. या घटनांचा बोलविता धनी नेमका कोण, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. स्वराज अभियानच्या वतीने कोपर्डी गावाला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले. ज्या ठिकाणी महिलांचा वावर अधिक असतो, अशा ठिकाणी विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात असायला हवी. तसेच राज्यातील दारू तातडीने बंद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. क्रांती चौकात निदर्शने करताना अण्णा खंदारे, जनार्दन पिंगळे, कासमभाई, डॉ. सर्फराज, डॉ. संदीप घोगरे, बुद्धप्रिय कबीर, देवीदास कीर्तिशाही आदींचा सहभाग होता.