बचतगटातील महिलांचा छोटय़ा-मोठय़ा उद्योगाच्या उभारणीसाठी कौशल्यविकास व्हावा, महिलांना बँक व्यवहाराशी जोडून त्यांचे आíथक जीवनमान उंचावे यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड येथे ग्रामविकास विभाग व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोमवारी ‘उमेद’ विभागीय मेळावा होत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याची जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी केली असून जवळपास सात हजार महिला उपस्थित राहतील आणि या प्रशिक्षणातून महिला सक्षमीकरणाची नवी उमेद निर्माण होईल, अशी अपेक्षा कार्यक्रमाचे विभागीय समन्वयक उपायुक्त डॉ. अशोक कोल्हे यांनी व्यक्त केली.
बीड येथे ग्रामविकास विभाग व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील बचत गटातील महिलांसाठीचा पहिला ‘उमेद’ विभागीय मेळावा सोमवारी विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे होत आहे. ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना संघटित करणे, त्यांना बँकेशी जोडणे, गावपातळीवर छोटे-मोठे उद्योग उभे करून उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देऊन महिलांना आíथकदृष्टय़ा सक्षम करण्याचे काम या अभियानांतर्गत केले जात आहे. या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञ, बँकांचे प्रमुख महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील यशस्वी बचत गटांच्या महिला यशोगाथा सांगणार आहेत. विभागातून सात हजारांपेक्षा जास्त महिला सहभागी होतील असा अंदाज आहे.