स्त्रियांची शरीररचना वेगळी असल्याने त्यांचे काही विकारही वेगळे असतात. त्याशिवाय विशेषत: भारतीय स्त्रियांमध्ये कमी झोप, कमी आहार, हमी हिमोग्लोबिन यामुळे शरीरस्वास्थ्य बिघडतं. त्यांच्यासाठी आयुर्वेद बरेच उपचार सांगतो.

स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न जास्त जटिल असतात. सगळ्याच प्रश्नांचा विचार येथे होऊ शकत नाही. तरीपण काही विशिष्ट स्त्रीरोग व स्त्रियांच्या विशेष अडचणी, उणिवा, स्वभाव वैशिष्टय़े, दिनक्रमांतील फरक यांचा स्वतंत्र विचार करावयास हवाच.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

स्त्रियांना घरचे काम सांभाळून नोकरी किंवा सार्वजनिक काम करावयाचे असेल तर त्यांचे प्रश्न जास्त अवघड होऊन बसलेले असतात. पती, मुले, आला गेला पाव्हणा, नातेवाईक, सणासुदीची धार्मिक व कौटुंबिक जबाबदारी हे सगळे सांभाळताना भारतीय स्त्रियांचा जोम कमी होतो, रक्ताचे प्रमाण कमी होते, कंबरदुखी वाढते. काही स्त्रिया खूप बारीक होतात, काही स्त्रियांचे वजन वाढते. विशेषत: स्त्रियांच्या कटिप्रदेशावर परिणाम होतो. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या तक्रारी, त्या काळातील पोटदुखी, पाळी जाण्याच्या काळांतील त्रास, स्तनांच्या गाठी, वारंवार लघवीला जाण्याची खोड, अशा नाना समस्या उद्भवतात. याशिवाय केस गळणे, मुखदूषिका, पायावरील सूज, थायराइड ग्रंथींचा त्रास असे लहान मोठे अनेक रोग त्रस्त करीत असतात.

स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात; सर्वाच्या जेवणानंतर जेवणे; उरलेले अन्न किंवा शिळे अन्न बळबळे खाणे, स्वयंपाकघरातील काही मैल होतील अशा दैनंदिन फेऱ्या, झोप कमी मिळणे, सर्वाना तोंड देता देता होणारी मगजमारी, अशा अन्य प्रश्नांचाही विचार करावयास हवा. कुटुंबातील स्त्रीचे आरोग्य उत्तम राहिले तर इतरांचे स्वास्थ्य बघण्यास स्त्रीला पुरेसा वेळ देता येईल. सोबत स्त्रीसुलभ विशेष विकारांचाच थोडक्यात विचार केलेला आहे.

अतिश्रम व उपासमार

स्त्रीसुलभ स्वभावामुळे कामाचा रगाडा खूप असल्यास भुकेची नेमकी वेळ निघून जाते. आपणच केलेल्या स्वैपाकाची रुची निघून गेलेली असते. अन्न गार झालेले असते. खाण्याचे पदार्थ कमी-जास्त उरलेले असतात. त्यामुळे भरपूर श्रम करूनही प्रत्यक्ष आहार तोकडा पडतो. भारतीय स्त्रियांचे रक्ताचे सर्वसाधारण प्रमाण यामुळेच खूपच कमी असते. रक्तातली हिमोग्लोबिनची टक्केवारी नऊदहाच्या आसापर्यंत खाली असते. सहसा बारातेराच्या वर कोणत्याच स्त्रीचे एचबी जात नाही. याकरिता ठरवून काही पदार्थ कटाक्षाने खावयास हवेत. जमेल तेव्हा सणकून झोप घ्यावयास हवी. सकाळी व सायंकाळी हातापायांना खोबरेल तेल, एरंडेल, तिळाचे तेल जरूर जिरवावे. खारीक, खोबरे, शेंगदाणे, गूळ, लाह्य़ा, पोहे, कोहळा, नारळ पाणी, बारा तास भिजत ठेवलेली कडधान्ये असा पूरक आहार असावा.

पाळीशी संबंधित विकार

मासिक पाळी आल्यापासून म्हणजे वय १३-१४ पासून किमान ४०-४५ वयापर्यंत दरमहा व्यवस्थित अंगावर जावयास हवे. या संबंधात प्रामुख्याने तीन तक्रारी आढळतात. १) काही स्त्रियांना वयाच्या तिशीनंतर अंगावर कमी जाते. त्याकरिता वेळेवरच पुढील प्रकारे काळजी घ्यावी. डालडा किंवा फार तेलकट, तूपकट, जडान्न खाऊ नये. दोन्ही जेवणानंतर चिमूटभर बाळंतशोपा खाव्या. शक्य असेल तर रोज एक खारीक खावी. फळांपैकी अननस, पपई जरूर खावी. पांडुता असली तर त्याप्रकारे योग्य तो आहार-टरफलासकट कडधान्ये, पालेभाज्या, फळे आहारात हवी. भात कमी खावा. २) ज्यांना अजिबातच अंगावर जात नाही त्यांनी वरील पथ्यपाण्याशिवाय शक्यतो रोज एका कोरफडीच्या पानाचा गर खावा. कोरफड न मिळाल्यास केळीच्या खुंटाचा ताजा रस अंदाजे पंधरा मिली दोन वेळा आठ दिवस घ्यावा. हा उष्ण असतो. याशिवाय गाजराच्या बिया मिळाल्यास चहासारख्या त्या बिया १० ग्रॅम उकळून त्यांचे पाणी सकाळी-सायंकाळी घ्यावे. ३) अंगावर खूप जाणाऱ्यांनी पाळीच्या काळात लो हेड किंवा पायाखाली दोन उशा घेऊन जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी. चंदन खोड उगाळून त्याचे गंध चमचा दोन चमचे दोन वेळा घ्यावे. धने पूड किंवा धने ठेचून त्याचे पाणी प्यावे. शतावरीच्या मुळ्या मिळाल्यास, पंधरावीस ग्रॅम मुळ्याचा ताजा काढा किंवा त्यांचे पाच ग्रॅम चूर्ण नियमितपणे घ्यावे. जांभळाची साल उगाळून त्याचे गंध पोटात घ्यावे.

अपुरी झोप

पुरेशा झोपेचे तास स्त्रियांना कधीच पुरे करता येत नाहीत. ती चांगली, अखंड व स्वप्नविरहित हवी. त्याकरिता रात्री कमी जेवावे. त्याऐवजी कृश स्त्रियांनी म्हशीचे दूध प्यावे. अपुरी झोप येणाऱ्यांनी रात्री झोपेपूर्वी तळपाय, कानशिले, कपाळ, यांना चांगले तूप, एरंडेल किंवा गोडेतेल हलक्या हाताने जिरवावे. नाकात दोन थेंब टाकावे. शक्य असेल तर एक चमचा आस्कंध चूर्ण दुधाबरोबर घ्यावे. पोटांत वायू धरतो, त्यामुळे झोपेत खंड पडत असेल तर चिमूटभर ओवा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घ्यावा. हिंगाची फोडणी दिलेले, जिरे, आले मिसळलेले ताक किंवा कढी प्यावी.

कंबरदुखी

स्त्रियांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप व हल्लीची उभ्याने काम करण्याची पद्धत, खाण्यापिण्यांतील जडान्नाचा वाढता वापर, मासिक पाळी साफ नसणे, मलमूत्रांचे नैसर्गिक वेग अडवणे व अपुरी विश्रांती व झोप, नेमक्या व्यायामाचा अभाव अशा अनेकानेक कारणांनी स्त्रियांची कंबरदुखी सुरू होते, वाढते. त्याकरिता गोडेतेल किंवा किंचित मीठ मिसळून गरम करून नियमितपणे कंबरेला रात्री व जमले तर सकाळी आंघोळीच्या आधी जिरवावे. जेवणात मुगाची उसळ, राजमा, चवळी वा माफक प्रमाणात उडीद असावे. ठरवून भाजलेले खोबरे खावे. मलप्रवृत्तीची तक्रार असल्यास एरंडेल तेलावर परतलेली चिमूटभर सुंठ जेवणानंतर खावी. ज्यांना जमेल त्यांनी रात्री आस्कंध चूर्ण एक चमचा घ्यावे. शक्यतो फळी, कडक अंथरुणावर झोपावे. कटाक्षाने कोल्ड्रिंक्स, शिळे अन्न, जडान्न वज्र्य करावे. आवश्यक वाटल्यास गरम गरम पाणी, घाम फुटेल असे प्यावे. लगेच कंबर मोकळी होते. हिंगाची फोडणी देऊन ताक प्यावे.

काश्र्य

काम करणारी स्त्री बारीकच हवी. चवळीच्या शेंगेसारखे अंग लवले तर दिवसाचे सोळा तास काम वर्षांनुवर्षे करता येते. मात्र त्यापेक्षा वजन कमी होणे फारच वाईट. गाल बसणे, गळ्याची, खांद्याची हाडे दिसणे, छाती, पोटऱ्या, मांडय़ांचे मांस कमी होणे. यामुळे पुढे पुढे काम करण्याची क्षमता कमी होते. त्याकरिता वजनावर लक्ष असावे. ठरवून जेवणात उडीद, गहू, साखर, हरभरा, मूग, कांदा, बटाटा, दही, भात, तूप यांचा वापर वाढवावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन वेळा सावकाशपणे जेवावे. प्रत्येक घास चावून खावा. ‘अचिंतया हर्षणेन ध्रुवं संतर्पणेन च। स्वप्नप्रसंगाच्च कृश वराह इव पुष्यति॥’ असे शास्त्रवचन आहे. चिंता न करणे, आनंदी राहणे. भरपूर खाणेपिणे व व्यवस्थित झोप हवी. याशिवाय रात्री आस्कंद चूर्ण एक चमचा घ्यावे, कोहळ्याच्या वडय़ा खाव्या.

केसांचे विकार

केस गळणे व पांढरे होणे या समस्यांनी स्त्रिया हैराण असतात. शिळेपाके खाणे, अपुरी विश्रांती व झोप याबरोबरच केसांना साबण वापरणे, जेवणात आंबट, खारट व आंबवलेल्या पदार्थाचा फाजील वापर यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसात कोंडा असला तर नियमितपणे आठवडय़ातून दोन वेळा आवळकाठी, नागरमोथा, बावची, कापूरकाचरी, रिठा यांचे चूर्ण पाण्यात उकळून केस धुवावे. कोंडा दूर झाल्याशिवाय केस गळणे थांबत नाही. जेवणात कटाक्षाने आंबट, खारट, आंबवलेले पदार्थ, दही, लोणचे, पापड, लिंबू, चिंच, कैरी टाळावी. केसात खवडे, उवा, लिखा असल्यास करंजेल व कापूर मिसळून रात्री लावावे. सकाळी शिकेकाईच्या पाण्याने केस धुवावे. नेहमीकरिता खोबरेल तेल, तीळ तेल, एरंडेल यांपैकी कोणतेही तेल लावावे. वडाच्या पारंब्या, कोरफड, ब्राह्मी, माका, जास्वंद, आवळा, दुर्वा, जाई, जुई, चाफा अशा वनस्पतींच्या रसांत किंवा काढय़ात तेल सिद्ध करून वापरावे.

चिंता, बौद्धिक ताण

चिंतेमुळे आपण आपले आयुष्य कमी करतो असे शास्त्रवचन आहे. जितका आपण फाजील विचार करू त्या प्रमाणात मेंदूकडे, उत्तमांगाकडे रक्ताची गरज वाढते. त्यात फाजील श्रम, कुपोषण व कमी झोप यांची भर पडली तर बघावयास नको. त्याचबरोबर डोके फोड, बौद्धिक ताण यामुळे पांडुता वाढते, केस गळतात, पांढरे होतात, झोप अजिबात नाहीशी होते, हातापायांची ताकद कमी होते, पोटऱ्या दुखतात. याकरिता रोज एक बदाम उगाळून घ्यावा. बेफिकीर राहावयास शिकावे. नियमितपणे दीर्घश्वसन व प्राणायामाचा अभ्यास करावा. किमान सहा सूर्यनमस्कार घालावे. मूग, कोहळा, डाळिंब, खारीक, नारळाचे पाणी आहारात ठेवावे. सकाळी वेखंड मधात उगाळून चाटण खावे. ब्राह्मीची ताजी पाने खावीत. झोपताना आस्कंध चूर्ण खावे. शवासनाचा अभ्यास करावा.

जोम कमी होणे

काश्र्य या तक्रारीचे उपाय करावेच. त्याशिवाय जोम वाढविण्याकरिता; विशेषत: फुप्फुसांची, हातापायांची ताकद वाढविण्याकरिता दीर्घश्वसन, प्राणायाम व किमान सहा सूर्यनमस्कार घालावे. आहारात फळे, दूध यांचे प्रमाण वाढवावे. खोबरे, कोहळा, आवळा यांचा विशेष वापर करावा. टरफलासकट कडधान्ये खावी. डालडा, कृत्रिम अन्न, चहा, कोल्ड्रिंक्स कटाक्षाने टाळावी. नेमक्या वेळेस जेवण, विश्रांती झोप घ्यावी.

थायराइड ग्रंथी

स्त्रियांमध्ये या ग्रंथीच्या वृद्धीचे प्रमाण फार आढळते. त्याकरिता आधुनिक वैद्यकांतील आयोडीन असणारी औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. ते एक तऱ्हेचे व्यसनच आहे. या औषधांनी शरीरातील आतडय़ांचे स्वास्थ्य बिघडते. त्याकरिता निग्रह करून ती औषधे पूर्ण बंद करावी. कटाक्षाने डालडा, मीठ, जडान्न वज्र्य करावे. आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादिगुग्गुळ, चंद्रप्रभा व त्रिफळागुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या व रसायन चूर्ण एक चमचा, असे एकत्र मिश्रण दोन वेळा घ्यावे.

पोटदुखी

पोटदुखी तीन प्रकारची असते. मासिक पाळीच्या वेळी जे पोट दुखते त्याकरिता लघुसूतशेखर व गोक्षुरादिगुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्या. त्या न मिळाल्यास किंचित गेरूचा तुकडा, सुंठ चूर्ण, गोखरू चूर्ण किंवा त्याचा काढा घ्यावा. भरल्यापोटी किंवा शिळेपाके खाऊन पोट दुखत असेल तर जेवणानंतर ओवा चूर्ण किंचित मिठाबरोबर घ्यावे. जेवताना आलेलसूण अशी चटणी खावी. ताकाच्या कढीला हिंगाची फोडणी द्यावी, रिकाम्यापोटी पोट दुखत असल्यास शतावरी, मुळ्याचा काढा, चूर्ण, रस किंवा शतावरी कल्प दुधाबरोबर घ्यावा. जेवणानंतर कुमारी आसव घ्यावे.

प्रमेह

वारंवार लघवीला जाण्याची खोड काही स्त्रियांना असते. मधुमेह नसताना या तक्रारीच्या निवारणाकरिता पित्तप्रकृती स्त्रियांनी आवळकाठी, कफप्रकृती स्त्रियांनी हळद चूर्ण खावे. कृश स्त्रियांनी दोन्ही जेवणांच्या सुरुवातीला व शेवटी एक चमचा तूप खावे. पोटात वायू धरत असेल तर जेवणानंतर ओवा खावा. चंद्रप्रभावटी सकाळी व सायंकाळी तीन गोळा बारीक करून घ्याव्या.

मुखदूषिका

तरुण वयात तारुण्यपीटिका आल्या तर त्यांचा संबंध वयात येणे, पाळी साफ न जाणे यांच्याशी असतो. ते फोड फोडायची एकदा का सवय लागली तर त्या फोडांची लस पसरते, खड्डे पडतात, काळे डाग होतात, चेहरा खराब दिसतो. योग्य उपचार वेळीच केले नाहीत तर रोग हट्टी होतो. केसात कोंडा असल्यास मुखदूषिका हा रोग होतो, वाढतो. त्याकरिता कटाक्षाने मीठ वज्र्य करावे. कोंडा जाईपर्यंत केसांना तेल लावू नये. ब्रह्मदेशांतील स्त्रियांना हा विकार होत नाही, हा अभ्यासाचा विषय आहे. चेहऱ्यास कटाक्षाने, साबण लावू नये, डाळीचे पीठ वापरावे. फोडात पू, खाज असली तर पोटांत हळकुंडाचे उगाळून गंध घ्यावे. तसेच चेहऱ्यास हळद चूर्णाचा लेप लावावा, उष्णतेचे फोड आल्यास चंदन खोड किंवा उपळसरी मुळी उगाळून त्याचे गंध चेहऱ्यास लावावे, तसेच पोटात घ्यावे. शिरीष, वड, उंबर, पिंपळ, जांभूळ यांच्या सालींचा लेप तारतम्य वापरून पाहावा. नवीन येणारे फोड, अल्लादपणे कापसाच्या बोळ्याने, मीठ घालून उकळलेल्या पाण्यात बुडवून शेकावे. म्हणजे लस पसरत नाही. शक्यतो आंबट, खारट, तेलकट, जडान्न वज्र्य करावे.

मूत्रसंसर्ग

स्त्री जीवनात केव्हातरी हा प्रसंग येतो. त्यातील कारणाच्या मागे न जाता पोटात घेण्याकरिता, अस्सल वासाच्या चंदनाच्या गंधाचा भरपूर उपयोग करावा. तत्काळ आराम पडतो. चंदन स्त्रियांचा मित्र आहे. चंदन न मिळाल्यास वाळा, धने, नारळ पाणी यांचा मुक्त वापर करावा. स्ट्राँग अ‍ॅन्टिबायोटिक्स घेऊ नयेत. पूर्ण विश्रांती घ्यावी. बेहेडा, आवळा, मनुका, द्राक्षे, मुगाचे पाणी, कोथिंबिरीचा रस, जिरे चूर्ण, शिंगाडा लापशी यांचाही वापर फायदेशीर आहे.

व्हेरीकोज व्हेन्स

दोन्ही पायांच्या मागील बाजूस, विशेषत: मांडय़ा, पोटरी यांच्या रक्तवाहिन्या निळ्या हिरव्या दिसतात. सुतळीसारख्या गाठी होतात. उठा- बसायला, चालायला त्रास होतो. त्याकरिता किमान तीन महिने पुढील उपचार करावे, शस्त्रकर्म करू नये. भिंतीला वर पाय लावून किमान अर्धातास पडून राहावे. संपूर्ण पायाला खालून वर असे कोणत्याही तेलाने, कटाक्षाने दोन वेळा मसाज करावे. चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी व त्रिफळागुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्या. त्याचबरोबर आंबट, खारट, शिळे अन्न, परान्न कटाक्षाने टाळावे.

योनिभ्रंश

पोटात खूप वायू धरणे, वारंवार लघवीला जाणे, जास्त बाळंतपणे व स्त्रियांच्या इतर विशेष तक्रारींमुळे योनीचा भाग बाहेर येतो. सुरुवातीला तो परत जातो. नंतर तसाच राहतो. वेळीच उपचार केले तर शस्त्रकर्म टळते. स्प्रिंगचे टेन्शन जाऊन स्प्रिंग जशी काम करेनाशी होते, तसेच योनी किंवा गर्भाशयाचे होते. त्याकरिता पोटात अजिबात वायू वाढू नये म्हणून ओवा, सुंठ, हिंग, लसूण यांचा या ना त्या प्रकारे वापर करावा. कटाक्षाने रात्री कमी जेवावे. जडान्न खाऊ नये. अधूनमधून एरंडेल तेल किंवा एरंडेल तेलावर परतलेली सुंठ खावी. आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादिगुग्गुळ, प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा, जेवणाअगोदर बारीक करून खाव्या. जेवणानंतर अभयारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. झोपताना त्रिफळाचूर्ण किंवा गंधर्वहरितकी चूर्ण घ्यावे. जादा वजन उचलणे, फाजील श्रम, फालतू बोलणे, जिने चढउतार कटाक्षाने टाळावे. योनी मार्गात खोबरेल तेल किंवा तीळ तेलाची पट्टी ठेवावी.

शोथ- सूज

स्त्रियांच्या चेहऱ्यावर, पायावर किंवा सर्वागावर सूज येऊ शकते. पांडुता, फाजील श्रम, विश्रांतीचा अभाव यामुळे सायंकाळी पायावर जास्त सूज येते. त्याकरिता पूर्ण विश्रांतीबरोबरच चंद्रप्रभा, शृंगभस्म, प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा रिकाम्यापोटी घ्याव्या. जेवणानंतर अर्जुनरिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. श्रम कमी करावे. सकाळी सूज वाढत असल्यास कफाची सूज असते असे समजून ‘व्हेरीकोज व्हेन्स’ याकरिता सांगितलेली औषधे व पथ्यपाणी करावे. स्त्रियांची चेहऱ्यावरची सूज वाईट असते. त्यावेळेस अधिक काळजी घ्यावी.

श्वेत प्रदर किंवा धुपणी

भारतीय स्त्रियांमध्ये ही तक्रार फार मोठय़ा प्रमाणात असते. या तक्रारीबरोबर, कंबरदुखी, अशक्तपणा, मुंग्या येणे इ. तक्रारी असतात. त्याकरिता चंद्रप्रभा, प्रवाळ व कामदुधा प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्या. एक चमचा जिरेचूर्ण एक कप पाण्यात रात्री भिजत टाकून सकाळी चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. शतावरी कल्प किंवा शतावरी चूर्ण घ्यावे. कोहळा, मूग, आवळा, डाळिंब, खारीक यांचा आहारात वापर करावा. योनी मार्गात खोबरेल तेल किंवा तीळ तेलाची पट्टी ठेवावी. एवढय़ा उपायांनी न भागल्यास वड, उंबर, पिंपळ यांतील साली मिळतील त्या उकळून त्यांच्या काढय़ाचा, पाळीच्या पाचव्या दिवसापासून सात दिवस ‘डूश’ घ्यावा.

स्तनग्रंथी

हा विकार बाळंतपणात नीट काळजी घेतली नाही, मासिक पाळी नीट साफ झाली नाही व या काळात जडान्न, डालडा, गोड पदार्थ, मीठ फार खात राहिले तर होतो. त्याकरिता वेळीच आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, त्रिफळागुग्गुळ, कांचनारगुग्गुळ व लाक्षादिगुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा बारीक करून घ्याव्या. कटाक्षाने आहारावर लक्ष असावे. शक्यतो गाठींना लेप वा पोटीस लावू नये. गाठी हालत नसल्यास विनाविलंब शस्त्रकर्म करावे. अपेक्षा करू नये. सुधाजल किंवा चुन्याचे लाइम वॉटर चार चमचे दोन वेळा घ्यावे. अमरकंद ही वाळलेली वनस्पती ५ ग्रॅम, एक कप पाण्यात उकळावी. अर्धा कप उरवून गाळून ते पाणी प्यावे.

स्थौल्य

स्त्रिया वयाच्या चाळिशीनंतर जाडजूड होत जातात. त्याला अनेक कारणे आहेत. मासिक पाळी कमी होत जाणे, मलप्रवृत्तीचे वेग अडवणे, तुलनेने काम वा हालचाल कमी होणे, व्यायामाचा अभाव, कारणपरत्वे जडान्न, डालडा, मिठाई, फाजील मीठ, भूक नसताना जेवण, दुपारी झोप अशी विविध कारणे संभवतात. शरीरातून घाम, मूत्र पुरेशी जात नाहीत. त्याकरिता कटाक्षाने जेवणावर नियंत्रण हवे. पहाटे व रात्री झोपण्यापूर्वी किमान पंधरा वीस मिनिटे फिरावयास जावे. दूध्याभोपळा पाव किलो उकडून जेवणाच्या सुरुवातीस खावा. त्या सोबत मीठ किंवा साखर घालू नये. शक्यतो तेल, तूप, डालडा, भात, साखर, मांसाहार, थंडपेये, फरसाण वर्ज करावे. उकडून भाज्या खाव्या. गव्हाऐवजी ज्वारीचा वापर करावा. कंबरेतील स्थूलपणा कमी करण्याकरिता सिट अप्स् किंवा पश्चिमोत्तानासनाचा माफक व्यायाम करावा. कंबरेचा भाग कमी होतो. सूर्यनमस्कार, दोरीच्या उडय़ा, पोहणे हे व्यायाम जमेल तसे करावे. जेवणानंतर किंचित् कात खावा. कफ प्रकृत्ती स्त्रियांनी हळद चूर्ण व पित्त प्रकृत्तीच्या स्त्रियांनी आवळा चूर्ण खावे. त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादिगुग्गुळ, चंद्रप्रभा व आरोग्यवर्धिनी या गोळ्या प्रत्येकी तीन अशा दोन वेळा घ्याव्या.

हर्निया

आतडय़ाचा हर्निया स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. त्याला अनेक कारणे संभवतात. अवेळी व फाजील प्रमाणात जेवण, दुपारची झोप, मलप्रवृत्ती साफ न होणे, जडान्न, तेलकट, तुपकट, डालडा, मिठाई, फरसाण, बेकरीचे पदार्थ, यांचा फाजील आहार ही कारणे असतात. दोन दोन शस्त्रकर्म करूनही हा त्रास पुन:पुन्हा होत असणाऱ्या खूप केसेस असतात. त्याकरिता ‘‘योनीभ्रंश’’ या तक्रारीकरिता सांगितलेली औषधी योजना व पथ्यपाणी पुरेशी आहे. जेवणावर कटाक्षाने नियंत्रण ठेवावे. नेहमीच्या जेवणातील एकचतुर्थाश भाग कमी करावा.

अस्तु.

आदरणीय माता भगिनींनी वरील उपचार नि:संकोचपणे वापरावे. आपले अनुभव कळवावे.

वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com