शाळा सुटली अन् मुलं धावतच शाळेबाहेर पडली. शाळेपासून जवळ एक सुंदरशी बाग होती. अर्णव आणि आर्यन बागेत जाणार होते. प्रचीती आणि नूपुरलासुद्धा बागेत जायचं होतं. आर्यनला झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घ्यायचे होते, तर अर्णवला घसरगुंडीवरून वर-खाली करायचं होतं. मुलांना धीर नव्हता. बागेच्या कुंपणावरून उडय़ा मारून अर्णव आणि आर्यन बागेत गेले. लोखंडी दरवाजा अर्धवट उघडा होता. नूपुर आणि प्रचीती त्या दरवाजातून आत बागेत शिरल्या. सी-सॉची फळी मोकळी होती. त्यावर दोघी बसून त्यांनी फळी खाली-वर केली. थोडय़ा वेळाने त्या दोघी कंटाळल्या. आर्यनचं झोके घेणं आणि अर्णवचं घसरगुंडीवरून खाली घसरणं चालूच होतं. बागेत खूप फुलं फुलली होती. रंगीत फुलं पाहून दोघींना खूप आनंद झाला. दप्तराचं ओझं पाठीवर बाळगत त्या दोघी बागेत फिरल्या. मंद वाऱ्याबरोबर झुडुपांवरची फुलं डोलत होती. पानं हलत होती. आपल्या माना उंचावून फुलं इकडे तिकडे बघत होती. मुलींना गंमत वाटत होती. पिवळी पिवळी शेवंती मुलींना बोलावत होती. इवल्या इवल्या अबोलीला मुलींशी बोलायचं होतं. लाल, पांढरा, तेरडा नाच करून दाखवत होता. मोगरा आपल्या सुवासाने वातावरण आनंदी करत होता, तर फुलांचा राजा गुलाब मुलांना आपल्याकडे खुणावत होता. नूपुरने इकडे तिकडे पाहिलं. तिनं हळूच एक गुलाबाचं टपोर फूल तोडलं आणि फ्रॉकच्या खिशात ठेवलं. प्रचीतीने मोगऱ्याच्या दहाबारा कळ्या तोडल्या नि दप्तरात टाकल्या. ‘किती जोरात चिमटा काढलास गं,’ कुणीतरी बोललं. नूपुरचा हात फ्रॉकच्या खिशात होता. आवाज खिशातून आला होता. नूपुरने गुलाबाच्या झाडाकडे पाहिलं. ते झाड तिच्याकडे रोखून बघत होतं. मोगऱ्याच्या कळ्या दप्तरात मलूल होऊन पडल्या होत्या. प्रचीतीने मोगऱ्याच्या झाडाकडे पाहिलं. मोगऱ्याचं झाड एक एक पान खाली टाकत रडत होतं. आणखी कोणती फुलं तोडावीत या विचारात मुली होत्या. तेवढय़ात माळीदादा आला. ‘काय करताव हिकडं’ माळीदादानं मुलींना विचारलं. ‘कुठे काय? कुठे काय?’ नूपुर म्हणाली. ‘तुझ्या फराकीच्या खिशामंदी काय हाय?’ असं माळीदादानं विचारल्यावर नूपुर घाबरली. तिला वाटलं आता माळीदादा आपल्याला मारणार. ‘घाबरू नगस. म्या न्हाई मारनार तुला.’ नूपुरशी बोलताना माळीदादाला तिच्या जागी त्याची राधी दिसत होती. माळीदादा आपल्याला मारणार नाही याची खात्री पटल्यावर प्रचीतीने दप्तरातल्या मोगरीच्या कळ्या बाहेर काढून माळीदादापुढे धरल्या. ‘च्ऽ च्ऽ च्ऽ च्ऽ या बारक्या कल्या उगा तोडल्याती’ माळीदादा हळहळला. ‘मी याचा हार करून देवाला घालणार होते,’ प्रचीती म्हणाली. ‘मी गुलाबाचं फूल आईच्या केसात माळणार होते’ नूपुरही तत्परतेने म्हणाली. ‘तुमास्नी वाचाया येतंय. फुट्टय़ावर काय लिवलंय ते वाचा.’ माळीदादाने मुलींना फुलझाडांमध्ये ठेवलेला बोर्ड दाखवला. ‘फुलांना हात लावू नका. फुलं तोडू नका. फुलांची शोभा दुरूनच पाहा.’ बोर्ड वाचल्यावर मुलींना अगदी शरमल्यासारखं झालं. माळीदादानं मुलींना कोपऱ्यातल्या बकुळीच्या झाडाजवळ नेलं. झाडाखाली फुलांचा सडा पडला होता. झाडावरून टप् टप् फुलं अंगावर पडत होती. ‘हं. येचा ही बकुलीची फुलां नि बनवा त्येचे हार.’ माळीदादा मुलींना असं म्हणताच दोघींनी बकुळीची भरपूर फुलं वेचली नि फ्रॉकच्या खिशात भरली. जवळच पारिजातकाचं झाड होतं. त्याच्या इवल्या इवल्या कळ्या फुलायला लागल्या होत्या. छानसा सुवास यायला लागला होता. ‘सकालच्याला या नि ह्येची फुलां येचा. आता कल्या नका खुडू,’ असं म्हणून माळीदादा मुलींना कारंज्याजवळ घेऊन गेला. मुलींना खूप मजा वाटली. पाण्याचे गार गार तुषार अंगावर उडत होते. कारंजाचं पाणी रंगीत दिसत होतं. अंधार झाला होता. माळीदादानं मुलींना घरी सोडलं. नूपुरची आणि प्रचीतीची आई मुलींच्या काळजीत होत्या. मुली घरी आल्यावर त्यांना बरं वाटलं. बकुळीच्या फुलांचे गजरे बनवून मुलींनी आईला दिले. घडलेली सगळी हकीगत मुलींनी सांगितल्यावर आई म्हणाली, ‘मुक्या कळ्या तोडू नयेत. झाडाची बाळं असतात ती. फुलं ओरबाडू नयेत, झाडांना दुखापत होते.’ ‘आई, माळीदादाही असेच म्हणाले.’ नूपुर म्हणाली. ‘मी आता झाडावरच्या कळ्या नाही काढणार,’ प्रचीतीने सांगितलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुली बागेत गेल्या. माळीदादा मुलींची वाटच बघत होते. मुलींच्या हातात परडय़ा होत्या. माळीदादांच्या मागोमाग मुली पारिजातकाजवळ गेल्या. माळीदादानं झाडाची एक फांदी जोरात हलवल्यावर फुलांचा पाऊस पडला. मुलींनी ती फुलं वेचली. परडय़ा फुलांनी भरून गेल्या. सुगंधी पाऊसच मुलींच्या परडय़ांत होता. वारा आला की बकुळीची फुलंही अंगावर पडत होती. बकुळीचे गजरे करून त्या बाईंना देणार होत्या. पारिजातकाचे हार करून गणपतीच्या तसबिरीला घालणार होत्या. फुलं वेचून झाल्यावर मुली बागेत फिरल्या. गुलाबाची फुलं मान उंच करून मुलींकडे बघत होती. ‘आता मी नाही तुम्हाला चिमटे काढणार. काल खूप दुखलं का रे?’ नूपुरने गुलाबाच्या झाडाला विचारलं. झाड नुसतं हललं. ‘आता नाही मी तुमच्या इवल्या इवल्या बाळांना तोडणार,’ प्रचीतीने मोगऱ्याच्या झाडाला सांगितलं नि झाडाला प्रेमाने कुरवाळलं. मुलींच बोलणं बाजूच्या शेवंती,अबोलीनं ऐकलं होतं. ‘किती शहाण्या आहात तुम्ही मुली आणि समजूतदारसुद्धा!’ अबोली मुलींना म्हणाली. शेवंती मुलींकडे पाहून फुलली, हसली. मुलींना खूप आनंद झाला. बागेत फुलंच फुलं फुलली होती. फुलांवर-पानांवर दवबिंदू पडले होते. कोवळ्या उन्हात ते दवबिंदू चमकत होते. मुलींची मनं आनंदाने फुलली होती. उजळून गेली होती. लीला तांबे lokrang@expressindia.com