महाराजा सयाजीराव गायकवाड हे गुजरातेतील बडोद्याचे संस्थानिक असले तरी त्यांचे ऐतिहासिक काम देशभरात सगळ्यांनाच माहीत आहे. शिवाय, एक कर्तबगार मराठी माणूस म्हणून अनेकांना त्यांचा अभिमानही आहे. अशाच कौतुकापोटी सोलापूर जिल्हय़ातल्या माढा तालुक्यातील रिधोरे गावातील शेतमजूर हरी गायकवाड यांच्या बाळाचे नाव सयाजी असे ठेवण्यात आले. आपला सयाजी मोठा होईल, कर्तबगार होईल आणि त्याला सारे आदराने सयाजीराव म्हणतील, बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यासारखेच कर्तृत्व आपला मुलगा गाजवील, असे स्वप्न हरी गायकवाड यांच्या डोळ्यांत तरळत असायचे. त्या स्वप्नाच्या आधारावरच हरी गायकवाड आपल्या गरीब संसाराचा गाडा हाकत होते. अशा हालअपेष्टांमध्येच सयाजीने शिक्षण पूर्ण केले. पुढे कृषी खात्यात कृषी साहाय्यक या छोटय़ाशा पदावर नोकरीही लागली आणि हरी गायकवाड यांच्या डोळ्यांत तरळणाऱ्या स्वप्नाला वास्तवाचा आकार येऊ लागला.. या दुसऱ्या सयाजीरावांनी केलेले काम डोळे दिपवून टाकणारे ठरले. त्यांच्या आगळ्या कर्तृत्वाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ६० कोटी रुपये खर्च करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

या दुसऱ्या सयाजीरावांची नेमकी कामगिरी समजून घेताना डोळे विस्फारतात, तोंडाचा ‘आ’ होतो.. सयाजीच्या घरी तीन एकर कोरडवाहू जमीन. आई-वडील दोघेही मजुरी करणारे. एक लहान भाऊ. सयाजीचे प्राथमिक शिक्षण रिधोरे गावात झाल्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी बार्शीला घेतले. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयातून सयाजीने पदवी घेतली त्या दिवशी वडिलांनी सयाजीला जवळ बोलावले. त्याच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवतानाच त्याला एक सल्लाही दिला- ‘मोलमजुरी करून आम्ही येथपर्यंत शिकवले. आता नोकरी बघ, संसाराला चार सुखाचे दिवस दाखव.’ असे मायेने सांगितले. मग नोकरीचा शोध सुरू झाला. खूप वणवण केली. पण त्यात यश येईना. काही मित्रांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पण पुढच्या शिक्षणासाठी पसे आणायचे कुठून, हा प्रश्नच होता. तुकाराम व दशरथ गव्हाणे या बार्शीतील मामांना सयाजीने अडचण सांगितली व त्यांनी सयाजीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. सयाजी हरखून गेला. आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करण्याचे त्याने मनोमन ठरवले.

अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. कृषीची पदवी सुवर्णपदक मिळवून पूर्ण केली आणि दीपक फर्टलिायझर्स या कंपनीत पुणे जिल्हय़ासाठी विपणन अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. तीन वर्षांनंतर सातारा जिल्हय़ात बदली झाली. त्या काळी, जवळपास पंधरा वर्षांपूर्वी सर्व सुविधा वगळून महिन्याकाठी पगाराचे १४ हजार रुपये हातात पडत. मग सयाजीने २००१ साली राज्य शासनाच्या निवड मंडळाची परीक्षा दिली. त्यात यश आले. तोंडी परीक्षेतही सहजपणे यश मिळाले अन् कृषी साहाय्यक या पदावर ६ हजार रुपये मासिक पगारावर नोकरीची ऑर्डर मिळाली. शासकीय नोकरी स्वीकारताना निवृत्तिवेतन मिळते, शिवाय गावाकडे जायची संधी मिळेल असा विचार करून पगारात तफावत असली तरी कृषी साहाय्यकपदाची नोकरी सयाजीने स्वीकारली. २९ जानेवारी २००१ साली सांगली जिल्हय़ातील जत तालुक्यात नोकरीची सुरुवात झाली. दीड वष्रे नोकरी केल्यानंतर ऑक्टोबर २००२ साली रिधोरे या आपल्या गावी त्यांनी बदली करून घेतली.

आता आपल्याला गावात राहता येईल, कष्टाने वाढवणाऱ्या आई-वडिलांची काळजी घेता येईल, गावच्या विकासात योगदान देता येईल, ज्ञानाचा उपयोग होईल, असे विचार सयाजीच्या मनात घोळत होते. कोरडवाहू शेती, पारंपरिक पीकपद्धती, सिंचन सुविधा नाही अशा गावात काम करण्याचे सयाजीने ठरवले. लोकात मिसळण्याची सवय होतीच. त्याचा उपयोग झाला. गावातील लोकांशी चांगला संवाद सुरू झाला. ‘सिनामाई कृषी विकास मंडळ’ या नावाने गावात संस्था सुरू केली. गावातील सत्यवान गायकवाड हा तरुण अध्यक्ष तर सयाजीकडे सचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. रीतसर नोंदणीचे सोपस्कार पूर्ण करून २ ऑक्टोबर २००४ साली संस्थेला मूर्तरूप आले. सत्यवान गावातील छोटय़ा खोलीत वाचनालय चालवीत होता. त्याच ठिकाणी बठका सुरू झाल्या. कृषिप्रधान देशात शेतकरी पिचतो आहे. त्यास कोणी सन्मान देत नाही. शेतकऱ्याला कुठलीच किंमत नाही, प्रतिष्ठा नाही. सयाजी या विचाराने अस्वस्थ होत होता. शेतकऱ्याला आत्मविश्वास, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काय करता येईल, याचाच विचार मनात घोळत होता. शेतीची देवता म्हणून शेतकऱ्याचे मंदिर उभे करायचे असा विचार मनात चमकला. या मंदिरात आधुनिक कृषितंत्र शेतकऱ्यांना समजावून शेतकऱ्याची व शेतीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी चिंतन केले जाईल, असे सयाजीने गावकऱ्यांना सांगितले. याच कालावधीत गावातील शेतकऱ्यांनी सयाजीच्या सल्ल्याने शेतीत अनेक प्रयोग केले. एक एकरात दहा-बारा क्विंटल मका पिकायचा, तेथे ४६ क्विंटल मका पिकला. सयाजीच्या तळमळीची गावाला खात्री पटली. सयाजी हरी गायकवाड नावाच्या तरुणाला ‘सयाजीराव गायकवाड’ म्हणून ओळख मिळत होती. गावाचे मक्याचे एकरी सरासरी उत्पादन ३० क्विंटलवर पोहोचले. २००४ ते २००९ या काळात सिनाकोळेगाव हा उजनी धरणापासून १९ किलोमीटरचा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा तयार झाला आणि गावाचे नशीबच फळफळले. सिंचनाची सुविधा निर्माण झाली. उसाचे क्षेत्र वाढले. गावातील एका शेतकऱ्याने एकरी १०९ टन ऊस पिकवला. गावचे सरासरी उत्पादन ८० ते ९० टनावर पोहोचले. सयाजीनेही स्वत:च्या शेतात एकरी ९३ टन उसाचे उत्पादन घेतले. गव्हाचे बीजोत्पादन घेऊन महाबीज कंपनीला ५०० क्विंटल बियाणे गावकऱ्यांनी विकले. त्यात २५ टक्के अधिकची किंमत मिळाली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सांगली जिल्हय़ातील आष्टा येथील संजीव माने, वाळवा तालुक्यातील करंदवाडी येथील जगदीश पाटील व सुरेश कवाडे या शेतकऱ्यांची ऊस शेती पाहण्यासाठी गावच्या सहली नेल्या. गावचा आíथक स्तर वाढू लागला. सयाजीरावांच्या शब्दाला गावात किंमत मिळाली. लोकसहभागातून २०११ साली १ हजार चौरस फूट बांधकाम असलेले ‘शेतकरी ज्ञानमंदिर’ उभे राहिले. सव्वासहा लाख रुपये गावकऱ्यांनी यासाठी खर्च केले. या मंदिरात फक्त खांद्यावर नांगर घेतलेल्या बलरामाची प्रतिमा लावण्यात आली आहे. दुसरी मूर्ती नाही, फोटो नाही आणि कोणतीही पूजा नाही. शेतीचे पीकनिहाय नियोजन कसे करावे याचे डिजिटल फलक लावण्यात आले. दृकश्राव्य माध्यमाची यंत्रणा उपलब्ध करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी वाचनालय सुरू झाले. कृषी प्रदर्शनी सुरू करण्यात आली. वाराणसी येथील डॉ. प्रकाश रघुवंशी यांनी विकसित केलेल्या कुदरत २१, २७ या गव्हाच्या जातीची माहिती गावकऱ्यांना दिली. गावरान गव्हाच्या ठुशीत ४० दाणे असतात. परंतु कुदरतमधून ९० ते १२० दाणे असलेली वितभर ठुशी गव्हाला मिळाली. ‘अपनी खेती अपना खाद, अपना बीज अपना स्वाद’ हे रघुवंशी यांनी सुचवलेले घोषवाक्य गावकऱ्यांना समजावून सांगून पारंपरिक वाणाची जपवणूक करण्याची शिकवण देण्यात आली. गावात ‘शेतीचा दवाखाना’ सुरू करण्यात आला. माती परीक्षण केंद्र, पिकावरील कीड व अन्य अडचणी याचे मार्गदर्शन सुरू झाले. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला संध्याकाळी ८ ते ९ या वेळेत शेतीशाळा सुरू झाली. प्रत्येक वेळी कार्यक्रमाचा वेगळा अध्यक्ष व त्याने बठकीसाठी चहा, नाश्त्याचा खर्च करायचा असा प्रघात सुरू झाला. पन्नास-साठ जणांसाठी वर्षांतून एकदा पाचशे ते सातशे रुपयांचा खर्च आनंदाने करू लागले. या शाळेत सर्व विषयांची चर्चा होऊ लागली. दरवर्षी २ ऑक्टोबरला संस्थेचा वर्धापन दिन साजरा होतो. या वर्षी बारावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला.

इफ्को कंपनीने तीन वर्षांसाठी रिधोरे गाव दत्तक घेतले. बांधावर खत पुरवले. पाचटकुट्टी, पाचट कुजवण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून रिधोरे गावातील गावकऱ्यांनी सिना नदीचे पात्र रुंद करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा लोकसहभाग दिला. त्यामुळे गावात पाण्याची कमतरता नाही. लातूरला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बठकीसाठी अनेक अधिकारी येत होते. कृषी विभागाचे अव्वर सचिव डी. के. जैन यांनी या प्रवासात रिधोरे गावाला पाच मिनिट भेट देण्याचे ठरवले. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना शेतीत नत्र, पालाश, स्फुरद हे घटक लागतात याची माहिती असते. मात्र गावातील शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दलची माहितीही एखाद्या कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांप्रमाणे सांगतात हे पाहून ते अवाक्  झाले. आठ दिवसानंतर सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सयाजीरावांशी संपर्क साधला. गावातील कृषी ज्ञानमंदिरासाठी किती खर्च लागला, याची माहिती घेतली. या प्रकल्पातून नेमके काय साध्य केले याची माहिती मागवण्यात आली. मी माहिती पाठवतो, पण याचे तुम्ही काय करणार आहात, असे सयाजीरावांनी विचारले आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीतून, आपल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान सयाजीरावांना मिळाले.

रिधोरे गावात २० गुंठय़ांचे आठ शेडनेट आहेत. आता शेतकरी अत्याधुनिक शेतीकडे वळला आहे. ४३ वर्षांच्या या दुसऱ्या सयाजीरावांना लोकांच्या जीवनात बदल व्हावा, शेतकऱ्याला सन्मान मिळावा एवढेच एकमेव व्यसन आहे. राज्यभरातून अनेक शेतकरी त्यांना दूरध्वनीवरून सल्ला विचारतात. आपल्या सर्व अडचणी बाजूला ठेवून ते शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. सरकारी नोकरी हे समाजाच्या सेवेचे उत्तम साधन आहे, असे सयाजीराव सांगतात, तेव्हा आजूबाजूला बसलेले शेतकरी मान हलवून त्याला दुजोरा देतात. त्यांच्या नजरेत आता आत्मविश्वास दिसत असतो.

दिनेश गुणे : dinesh.gune@expressindia.com

प्रदीप नणंदकर :  pradeepnanandkar@gmail.com