महाडचे नाव घेतले तरी आता संकटाच्या सावटाची भीती वाटू लागते. इतिहासकाळापासून अगदी कालपरवापर्यंत अनेक संकटे झेलत महाड नावाचे कोकणातले हे गाव पहाडासारखे उभे राहिले. या गावाला पराक्रमाचा, संकटांचा आणि त्या संकटांशी सामना करत पाय रोवून उभे राहण्याचा इतिहास आहे. म्हणूनच संकटे अंगावर आली, तर ती झेलणाऱ्या मनांची मशागत करण्याची ताकदही या मातीत आहे. महाडच्या याच मातीच्या गुणामुळे परवाच्या पूल दुर्घटनेतही माणुसकीचे अथांग दर्शन घडले. ही माणुसकी तेथे रुजलेलीच आहे. अशाच एका माणुसकीच्या रोपटय़ाची ही कथा.. महाडमधीलच!

जीवनात सभोवताली घडणाऱ्या घटनांचे मानवी मनावर कळत-नकळत परिणाम होत असतात. काहीजण त्यातून नैराश्याच्या गर्तेत जातात, तर काहींना नव्या उभारीने जगण्याची उमेद मिळते. आयुष्य कसं जगावं याचे आत्मभान मिळते. महाड शहरातील गणराज जैन यांच्याबाबत असेच काहीसे घडले.

२५ जुलै २००५ ची ती काळरात्र होती. विजांच्या गडगडाटासह धोधो पाऊस कोसळत होता. भर दिवसा काळोख दाटून आला होता. पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. महाडसाठी मोठा पाऊस ही काही नवी गोष्ट नव्हती. पण दोन दशकांत असा पाऊस झाला नसल्याची चर्चा एव्हाना सुरू झाली होती. जणू ही प्रलयाची चाहूल होती. त्या रात्री अपेक्षेप्रमाणे महाड परिसरावर अस्मानी संकट कोसळले. आधी भूस्खलन आणि नंतर महापूर अशा दुहेरी संकटामुळे महाड हादरले. दासगाव, जुई, रोहण, कोंडीवते गावांत २०० हून अधिक जणांचा बळी गेला होता. सर्वत्र हाहाकार उडाला होता. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले होते. ज्या डोंगरांच्या कुशीत आणि नदीच्या सान्निध्यात येथील लोक आजवर राहत होते, ते गाव त्यांच्या जिवावरच उठले होते. निसर्गाच्या प्रकोपापुढे हतबल असल्याची जाणीव वेळोवेळी होत होती.

त्या प्रलयंकारी घटनेनंतर महाड परिसरात मदत व बचावकार्याचा ओघ सुरू झाला. जलप्रकोपात अडकलेल्या माणसांसाठी अनेक बचाव पथके काम करत होती. पण महापुरात वाहून जाणाऱ्या मुक्या जनावरांसाठी कोणीच नव्हते. मुक्या प्राण्यांच्या याच संवेदना गणराजला जाणवल्या. त्याने पुरात अडकलेल्या प्राण्यांसाठी मदत आणि बचावकार्य सुरू केले. दोन दिवसांत तब्बल ६७ प्राण्यांना पुरातून बाहेर ओढून त्यांचे जीव त्याने वाचवले. यात केविलवाणी कुत्री होती. कुणाची लाडकी मांजरं होती, गोठय़ातल्या गाई-म्हशी, बकऱ्या होत्या आणि अगदी जंगलाच्या आश्रयाने वावरणारी सरपटणारी, विषारी-बिनविषारी जनावरेही होती.. त्यांना वाचविताना आयुष्याचा एक अर्थ सहज गणराजला सापडून गेला आणि त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. दुसऱ्याला जगवण्यात आनंद असतो, याचा साक्षात्कार त्या क्षणी त्याला झाला आणि प्राण्यांबद्दल ओढ निर्माण होऊन पुढे काम करण्याचा मार्ग सापडला. संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठीच यापुढील काळात झटण्याचा निर्णय त्यानं घेतला.

सुरुवातीला घरातच आपद्ग्रस्त प्राण्यांसाठी शुश्रूषेचे काम त्यांनी सुरू केले. मात्र, घरातून तीव्र विरोध होऊ  लागला. मरायला टेकलेले आणि जखमी अवस्थेतील प्राणी घरात आणून ठेवायचे नाहीत असे ठणकावून सांगण्यात आले. हताश झालेल्या गणराजने ही कैफियत आपल्या मित्रांकडे मांडली. चांगल्या कामात अडथळे आले तरी मार्ग सापडतात असे म्हणतात. याचा प्रत्यय गणराजला आला. आसनपोई ग्रामपंचायतीने त्यांच्याकडील २२ गुंठे जागा गणराजच्या या कामासाठी उपलब्ध करून दिली; आणि कोकणातील पहिल्यावहिल्या जखमी प्राण्यांच्या शुश्रूषा केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. या केंद्राला ‘सफर’ असे नाव देण्यात आले. जागा उपलब्ध झाली असली तरी शुश्रूषा केंद्राच्या उभारणीसाठी लागणारे भांडवल त्यांच्याकडे नव्हते. म्हणून जागेभोवती विटांचे कच्चे बांधकाम करून एक पिंजरा विकत घेऊन काम सुरू करण्यात आले.

पुढे कामाचा पसारा वाढतच चालला. जागा पुरेशी होती. पण प्राण्यांसाठी निवारा अपुरा पडत होता. चांगली शेड आणि जास्त पिंजऱ्यांची गरज भासू लागली. ही बाब लक्षात घेऊन गणराजने लग्नानंतर चार-पाच वर्षांत नोकरी करून कमावलेली सर्व जमापुंजी या कामी खर्च करण्याचा निर्णय घेतला. निर्णय धाडसी होता. अशा परिस्थितीतही गणराज यांच्या डॉक्टर पत्नी अर्चना जैन त्याच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. घरातील दागदागिने आणि सामानही विकले. चार चाकी गाडीदेखील विकली आणि शुश्रूषा केंद्राची उभारणी केली. जखमी प्राण्यांची ने-आण करणे ही एक मोठी समस्या होती. कारण रक्तबंबाळ अवस्थेतील प्राण्यांना कोणी गाडीत घेण्यास तयार होत नसत. त्यामुळे ‘सफर’साठी स्वत:ची गाडी असणे गरजेच होते. मग जखमी प्राण्यांच्या वाहतुकीसाठी व्हॅन विकत घेतली. सुरुवातीला त्याच्या या कामाकडे संशयाने पाहिले गेले. पण बरे होणारे प्राणी पाहून हा संशय नाहीसा झाला. आज गणराज आणि त्याच्या पत्नी डॉ. अर्चना यांनी सुरू केलेले ‘सफर केंद्र’ विविध पशुपक्ष्यांचे माहेरघर बनले आहे. कुत्रे, मांजर, बदक, ससे, बैल, बकरी, घुबड, कावळे यांच्यासाठी ‘सफर’ वरदान ठरले आहे.

या कामात अनेक चांगल्या-वाईट अनुभवांना गणराज यांना समोरे जावे लागले. २०१३ मध्ये एका नागाला वाचवताना त्यांना सापाने दंश केला. सापाचे विष शरीरात भिनल्याने प्रकृती खालवली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आठ दिवस गणराजचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. पण आजवरची पुण्याई कामाला आली. मृत्यूशी झुंज यशस्वी ठरली. गणराजसाठी हा एक पुनर्जन्म होता.

या अपघातामुळे एखादा खचून गेला असता. मात्र गणराजला ते मान्य नव्हते. यापुढील आयुष्य प्राण्यांच्या शुश्रूषेसाठी वेचण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आजवर त्यांनी ३ हजाराहून अधिक सापांना जीवदान दिले. तर १५० हून अधिक जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. यात गाई, कुत्रे, मांजरी, बकऱ्या, पक्षी, बदक या पशुपक्ष्यांसह मगर, घारी, मोर यांसारख्या वन्यजीवांचाही समावेश होता. विशेष म्हणजे सहा मगरी, दोन घारी, आठ जखमी साप आणि पाच जखमी मोरांवर उपचार करून त्यांनी वनविभागाच्या माध्यमातून जंगलात सोडले.

महाड परिसरातील सावित्री नदी आणि दासगाव खाडी परिसरात मगरींचा मुक्त संचार असतो. अनेकदा वाट चुकल्याने या मगरी लोकवस्तीत दाखल होतात. यामुळे मगरींच्या जिवाला धोका निर्माण होतो. तर कधी बोटींच्या वाहतुकीमुळे अथवा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्याने त्या जखमी होतात. या जखमी मगरींसाठी ‘सफर’मध्ये उपचार केले जातात. महाड पोलादपूर परिसरातील दुर्गम भागात मोर मोठय़ा प्रमाणात आढळतात. अनेकदा कुत्रे या मोरांवर शिकारीसाठी हल्ला करतात. अशा जखमी झालेल्या मोरांची शुश्रूषा ‘सफर’मध्ये केली जाते.

प्राणी उपचार केंद्र चालवतानाच कोकणातील पशुधन आणि त्यांच्या समस्या जैन दाम्पत्याच्या लक्षात आल्या. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेकदा पशुधन सांभाळणे जिकरीचे काम ठरते. अशा परिस्थितीत गाई-बैल सोडून दिले जातात. अशा गायींचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेत सावली गोशाला सुरू करण्यात आली. कधी जखमी झालेल्या, कधी बांळतपणाला आलेल्या गाई गोशालेत दाखल होण्यास सुरुवात झाली. बघता बघता गोशालेतील गायींची संख्या शंभरच्या वर गेली. मात्र एवढय़ा गाईंचे संगोपन करण्यात अडचणी येऊ  लागल्या. यातूनच गरजू शेतकऱ्यांना गाईसंगोपनासाठी देण्याची संकल्पना समोर आली. गाई न विकण्याच्या हमीवर, तसेच त्यांच्या योग्य संगोपनाच्या शपथपत्रावर, शेतकऱ्यांना मोफत गाई उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला. यालाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्या माध्यामातून शेतकऱ्यांना ९८ गाई देण्यात आल्या. आजही सफरच्या गोशाळेत जवळपास ४५ गाई सफरच्या वास्तव्याला आहेत त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी गणराज आनंदाने पार पाडतो.

दहा वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला. ‘सफर’चे काम पाहून आज अनेक लोक या संस्थेशी जोडले गेले. प्राण्यांच्या संगोपन आणि उपचारासाठी सक्रिय मदत करू लागले. वेगळ्या वाटेच्या या कामाची दखल घेतली जाऊ  लागली. संस्थेच्या कामांना प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे आर्थिक मदत देण्यासाठी अनेक हात पुढे आले. दरवर्षी प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली.

गणराजच्या या उपक्रमाकडे सुरुवातीला साशंकतेने पाहिले गेल, पण आता परिस्थिती बदलली. वन विभागाकडून आता चांगले सहकार्य होऊ  लागले. वन्यजीवांवर उपचार करताना सुरुवातीला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असे, पण उपचार झालेले प्राणी जेव्हा बरे होताना दिसले तेव्हा वन विभागाने या उपक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. गंमत म्हणजे, काही महिन्यांपूर्वी महाडजवळील जंगल विभागात एक भेकर जखमी अवस्थेत आढळून आले. या भेकराला ‘सफर’मध्ये आणले गेले. वन विभागाच्या देखरेखीत भेकरावर उपचार सुरू झाले. त्यानेही उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला, योग्य वेळी उपचार मिळाल्याने भेकराचा जीव वाचला.  उपचारानंतर पूर्ण बरे झालेले भेकर पुन्हा जंगलात नेऊन सोडले.

‘सफर’ केंद्रात सध्या दोन माकडांवर उपचार सुरू आहेत. दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी आणले गेले होते. उपचारानंतर यातील एक माकड ठणठणीत बरे झाले. मात्र दुसऱ्या माकडाच्या दोन्ही  डोळ्यांत मोतीबिंदू असल्याचे लक्षात आले. जखमी प्राण्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी ‘सफर’ सुसज्ज केंद्र उभारण्याचा गणराज यांचा मानस आहे. मात्र सध्या आर्थिक परिस्थितीमुळे ते करणे शक्य नाही. म्हणून आहे त्या साधनांचा वापर करून प्राण्यांच्या सेवेचे काम सुरू ठेवले आहे.

नुकत्याच झालेल्या महाड येथील दुर्घटनेत सावित्री नदीतील मगरीचा प्रश्न समोर आला. मदत व बचावकार्यात मगरींचा अडथळा असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण मगरीने माणसावर हल्ला केल्याची घटना समोर आलेली नाही. आगामी काळात महाड परिसरात मगरीसाठी अभयारण्य विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणराज सांगतात.

प्राणिमात्रावर प्रेम करा असे सांगणारी आपली संस्कृती आहे. आज मात्र माणूस प्राण्यांच्या जिवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. कधी पैशाच्या हव्यासापायी तर कधी अंधश्रद्धेपायी प्राणिमात्रांची शिकार केली जाते आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असतो. याला प्राणीदेखीलअपवाद नाही, या भावनेनेच गणराज व त्याच्या पत्नीने हे मैत्र जपले आहे.

आसनपोईसारख्या छोटय़ा गावात सुरू झालेला हा प्रकल्प आज गावाची ओळख बनला आहे.

हर्षद कशाळकर/ meharshad07@gmail.com

दिनेश गुणे / dinesh.gune@expressindia.com