देशभरात विविध नेत्यांचे दबावगट संघटनांच्या माध्यमातून स्वत:साठी अवकाश तयार करण्याचे काम करीत आहे. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या वाढत्या प्रस्थाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून प्रश्न उपस्थित करणे ही स्वागतार्ह घटना आहे, असे स्पष्ट मत ‘योगी आणि टोळी’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडणारा पुण्याच्या ‘आयएलएस लॉ महाविद्यालया’चा विद्यार्थी भूषण राऊत हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत नाशिकच्या ‘के के वाघ कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजमेंट’चा विद्यार्थी निशिकांत नाईकनवरे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

अग्रलेखावर मत मांडणारे भूषण आणि निशिकांत यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. भूषणला सात हजार आणि प्रमाणपत्र तर निशिकांतला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.