आपण असे म्हणतो ना की ‘तो वाचला. कारण त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’. या बाबतीतला माझ्याबद्दलचा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या मुलीला केतकीला नृत्याच्या क्लासला सोडून घरी आले. त्या दिवशी खूपच पाऊस पडत होता. वादळीवारेदेखील होते. मी तशीच थोडय़ा वेळाने केतकीला आणायला गेले. मी पूर्ण भिजले होते. केतकी  वाट बघत उभी होती. मी तिला म्हणाले की पाऊस कमी झाला की निघू.

केतकी आई चल ना, चल ना म्हणत होती. केतकीच्या मैत्रिणीचे वडील तिला घ्यायला आले. त्यांनी गाडी उभी केली व ते तिला घेऊन निघाले मी व केतकी दोनच मिनिटे थांबलो आणि तेवढय़ात कडाडकड आवाज झाला व कंपाऊंडमधील मोठे झाड कोसळले. मैत्रीण व तिचे वडील बाजूला झाले म्हणून वाचले. पण त्यांच्या गाडीवर ते झाड पडले. मी आणि केतकी दोन मिनिटे थांबल्यामुळे वाचलो. आम्ही त्यांच्यामागून गेलो असतो तर कदाचित ते झाड आमच्या अंगावर पडले असते. पण म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
प्रियंका जोशी – response.lokprabha@expressindia.com