भाजपमधील काही शिवसेनाद्वेष्ट्या मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी भरीस पाडले. मात्र, रणांगणात उतरल्यानंतर आपल्या पाठीशी कुणीही नाही, याची जाणीव फडणवीसांना झाली. त्यांची ही राजकीय वाताहत पाहून आम्हाला कीव येत आहे, अशा शब्दांत शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू झाल्याची टीका करण्यात आली आहे. एकुणच भाजपच्या अंतर्गत राजकारणात मुख्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

चक्रव्यूहात अभिमन्यूची कोंडी व्हावी तशी काहीशी अवस्था (आजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली दिसते. विशेष म्हणजे त्यांना चक्रव्यूहात ढकलून कोंडी करण्याचे काम त्यांच्याच तथाकथित ‘पांडव’ टोळीने केले आहे. शिवसेनाद्वेषाने पछाडलेल्या या मंडळींनी मुख्यमंत्र्यांना पेटलेल्या रणात सोडले आहे. ‘देवेंद्रजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा नारा ऐकून मुख्यमंत्री शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी पुढे आले खरे, पण मागे वळून पाहावे तर ज्यांच्या भरवशावर रणात उतरलो तो एकही पुढारी पाठीशी नाही. कारण शिवसेनेशी दोन हात करणे तर सोडाच, पण शिवसेनेला नुसते अंगावर घेणेही सोपे नाही. याचा अनुभव ते आता घेत आहेत. ‘‘लडनेकू तुम, कपडा संभालनेकू हम’’ असे त्यांच्या बाबतीत झाले आहे व एका भल्या माणसाची ही राजकीय वाताहत पाहून आम्हाला त्यांची कीव येत आहे, अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

भाजपच्या केंद्रातील नेतृत्त्वाच्या मनात शिवसेनेबद्दल अढी असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीशी सलोख्याचे संबंध राखण्यावर कायम भर दिला होता. मात्र, गेल्या काही प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढले आहेत. त्यामुळे आता फडणवीसांना भले वगैरे म्हणणेही थोडे जड आहे, असे सेनेने म्हटले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेमुळेच आपल्याला मिळाली, पण त्या संधीचे आपण मातेरे केलेत. स्वतःबरोबर महाराष्ट्राची कोंडी केलीत, अशी टीका सेनेने केली आहे.