मुंबईतील विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये प्रचार सभा घेऊन राज ठाकरे यांनी मनसेच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्याच सभेत भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणाचा मुंबईकरांच्या जगण्याशी काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दोन कोंबडे झुंजत होते, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपवर तोफ डागली. यावेळी त्यांनी नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. नोटबंदीनंतर पंतप्रधान म्हणाले की, नवीन वर्षात नवा भारत दिसेल. पण बदल कुठे आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने प्रत्येक उमेदवाराला एक कोटी दिले होते. आज उत्तरप्रदेशात भाजपचे ४०० उमेदवार उभे आहेत, मग ४०० कोटी कुठून आले? असा सवालही त्यांनी केला. नोटबंदीमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. हजारो लोक बेरोजगार झाले. रांगेत अनेक लोकांचा बळी गेला. याबाबत कोणी काही बोलत नाही. पारदर्शी कारभार देऊ असे भाजपकडून सांगितले जाते. पण पारदर्शी कारभार कसा देणार? नोटबंदी नक्की का केली? बनावट नोटा कालच पकडल्या गेल्या, मग काय बदल झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजपचा 'पार्टी विथ डिफरन्स'चा अर्थ एवढाच की भाजपकडे पैसा आहे, तुमच्याकडे नाही. हाच तो डिफरन्स आहे. नुसती पॅकेजची आश्वासने द्यायची. पण सरकारकडे पैसे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी आठ हजार कोटी लागतील, असे सांगितले जाते. तेवढे पैसे आहेत का, असा सवाल त्यांनी भाजपवर केला. मुंबई महापालिकेचे ३७,५०० कोटी रुपये बजेट आहे. पगार आणि इतर खर्च वगळून १५,००० कोटी उपलब्ध होतात. मग पाच वर्षांतील ७५, ००० कोटी गेले कुठे? भाजप - शिवसेनेकडून अनेक आश्वासने दिली जातात. मग गेली पाच वर्षे काय केले? मी जे पाच वर्षांत नाशिकमध्ये करून दाखवले ते यांना २५ वर्षांत करता आले नाही. मुंबईत मराठी शाळा बंद होत आहेत, मात्र उर्दू शाळांची संख्या वाढत आहेत, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील विकासकामांबाबतही त्यांनी माहिती दिली. नाशिकच्या पाच वर्षांच्या काळात १८ महिने आयुक्त नसताना विकासकामे सुरू ठेवली. नाशिकमध्ये मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकत आहे. त्यामुळे पुढील ४० वर्षे पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. नाशिकमधील रस्त्यांवर एकही खड्डा सापडला नाही. नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनचे काम पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. राज्यात कोणत्याही शहरात बोटॅनिकल गार्डनसारखे उद्यान आहे का, ते दाखवावे, असे आव्हान त्यांनी विरोधी पक्षांना दिले. भाजपवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीच्या काळात फक्त जाहिराती आणि सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर विकासकामे करून काय उपयोग आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. १९५२ साली स्थापन झालेल्या भाजपला स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत. म्हणून ते पळवापळवी करतात, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेवरही त्यांनी टीकेचा 'बाण' सोडला. शिवसेनेचा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्यावर डोळा आहे. मग महापौरांना राणीच्या बागेत पाठवणार का? राणीच्या बागेत मग महापौर हा एकच प्राणी असेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मुंबईत भावी पिढीसाठी काही घडवायचे असेल तर, महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकर मतदारांना केले.