राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

राज्यात नुकत्याच झालेल्या २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत काही ठिकाणी काँग्रेस तर काही ठिकाणी राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही काँग्रेसने आघाडी केल्यास किमान १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीचे संकेत दिले आहेत.

नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केले. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत शिवसेनेला पाठिंबा देणार काय, असे विचारले असता राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज असल्यास स्थानिक पातळीवर चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे पवारांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकंदर वर्तन पाहता ते राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, त्यांनी तसे केलेच तर राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मुंबईत कोणत्या पक्षाचा महापौर होणार, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला कोणत्याही परिस्थितीत पािठबा देणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले आहेत. काही अपक्षांनी शिवसेनेला पािठबा दिल्याने त्यांचे संख्याबळ वाढले आहे. शिवसेना उमेदवारांची जुळवाजुळव करेल, पण वेळ आली तर शिवसेनेला पािठबा देण्याबाबत पक्षाचे स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून शिवसेनेला पािठबा देणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत.