मुंबईत भाजप आणि शिवसेनेला झालं गेलं विसरून एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी मुंबईतील युतीबाबतचे सुतोवाच केले. ते म्हणाले की, शिवसेनेसोबत झालेली भाजपची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. त्यांच्या वैचारिक मतभेत नाहीत आणि निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते टोकाचे नाहीत. त्यामुळे झालं गेले विसरून मुंबईत शिवसेना आणि भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपला मिळालेल्या जागांमध्ये फक्त दोन जागांचा फरक आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर कोणाचा बसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सत्तास्थापनेसाठी युतीसाठी कोण पुढाकार घेणार? दोन्ही पक्षांकडून अपक्षांना आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्तेची गणित कोण जुळवणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. महापौराच्या वादाबाबत बोलताना गडकरी यांनी ‘प्रत्येकालाच आपल्या पक्षाचा महापौर असावा, असे वाटते. मात्र, फडणवीस आणि उद्धव दोघेहे प्रगल्भ नेते आहेत. ते योग्य निर्णय घेतील’, असे स्पष्ट केले.

 

शिवसेना आणि भाजपच्या युती तुटण्याला ‘सामना’ हे सेनेचे मुखपत्र जबाबदार असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले. भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत आणि दोघांनाही आपापली वेगळी मतं आहेत. सत्तेत सहभागी असताना मित्रपक्षाच्या विरोधात वारंवार लिखाण करणे योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांबाबत ‘सामना’मध्ये जे आक्षेपार्ह लिहीले जाते, ते थांबायला हवे. शिवसेना-भाजप युतीमध्ये दरी निर्माण होण्यासाठी ‘सामना’च जबाबदार आहे, असेही गडकरी पुढे म्हणाले.