मुंबईत भाजपला ११५ जागांची अपेक्षा; शिवसेना मात्र ८५ ते ९० जागांवरच राजी?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपशी युतीसाठी चर्चेची जाहीर अपेक्षा व्यक्त केल्याने भाजपने त्याला प्रतिसाद दिल्याचा सणसणीत टोला मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड आशिष शेलार यांनी लगावला आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शी राहील, या अटीवरच युती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करीत असून ठाकरे यांनाच युतीची गरज वाटत असल्याचे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण तरीही ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात युती करावी, अशी भावना असल्याचे सांगत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु करण्यात आले असून मुंबई महापालिकेच्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे.

भाजपला ११५ जागांची अपेक्षा असून शिवसेना मात्र ८५-९० पर्यंत जागा सोडण्यास तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चर्चा लवकर झाली, तर ठीक नाहीतर  कुठेतरी थांबवून निर्णय घ्यावा लागेल व माझी तयारी सुरु असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

युतीसाठी लवकर चर्चा सुरु व्हावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली होती. निवडणुकीची घोषणाही बुधवारी झाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी अ‍ॅड शेलार व अन्य नेत्यांची बैठक झाली.

शिवसेना भाजपसाठी ८५-९० जागा देण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपही १०० ते १०५ जागांवर तडजोड करण्याची शक्यता असल्याचे समजते. शिवसेनेतर्फे खासदार अनिल देसाई, अनिल परब तर भाजपकडून अ‍ॅड शेलार यांच्यासह काही नेते मुंबई व ठाण्याबाबत चर्चा करीत आहेत.

स्थानिक ठिकाणी अधिकार

ठाण्यात शिवसेनेचे प्राबल्य असून भाजपची ताकद फारशी नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आदी महापालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये युती करण्याचे अधिकार शिवसेनेनेही जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी ते चर्चा करतील. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक युती व आघाडय़ा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेहूनही चमकदार कामगिरी केल्याने आणि ताकद वाढल्याने भाजपला किमान निम्म्या म्हणजे ११५ जागांची अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षासाठी २० जागा तर भाजपने ९ सोडल्या होत्या. आता रिपब्लिकन पक्षाला भाजपच्याच कोटय़ातून जागा सोडाव्यात, अशी शिवसेनेची भूमिका आहे.