जिल्हा परिषदेच्या ४००,पंचायत समितीच्या ८३१ जागांसह पहिल्या स्थानी

केवळ शहरी भागातील म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून थेट गावापर्यंत जाऊन पोहोचल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मुंबई-पुण्यासारख्या शहरांबरोबरच जिल्हा परिषद  या निवडणुकीत २५ जिल्हा परिषदेच्या एकूण १५०९ जागांपैकी तब्बल ४०६ तर २८३ पंचायत समितीच्या एकूण २९९० जागांपैकी ८३१ जागांवर कब्जा करीत भाजपने ग्रामीण राजकारणावरील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यात यश मिळविले आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक ४०६ जागा जिंकत भाजपने जिल्हा परिषदेमध्येही आपली हुकूमत प्रस्थापित केली आहे. या पक्षाला विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत ३३९ पैकी १३८ जागा मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे मराठवाडय़ात ४६० पैकी १३२, नाशिक विभागात २१२ पैकी ६२ जागा मिळवीत भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र त्यांना पश्चिम महाराष्ट्रात घुसखोरी करता आली असली तरी ६५ जागांपर्यंत मजल मारता आली असून कोकणात मात्र केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा परिषदांमध्ये ३६० जागा जिंकत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर राहिला असून काँग्रेसला ३०९ तर शिवसेनेला २७१ जागा जिंकता आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाने राष्ट्रवादीला काहीसे तारले आहे.

बदललेले चित्र

मुंबईसह १० महापालिकांबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरून स्पष्ट होते. सन २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, हिंगोली या चार जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता २६ पैकी २२ जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची स्वतंत्र किंवा एकत्रित पकड होती. मात्र आता चित्र पुरते बदललेले आहे.

नुकत्याच निवडणुका झालेल्या २५ जिल्हा परिषदांपैकी जळगाव, लातूर, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्हा परिषदेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, चंद्रपूर आदी जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे.

पंचायत समितीमध्येही बोलबाला

राज्यातील २८३ पंचायत समित्यांच्या  २९९० जागांपैकी ८३१ जागा जिंकत पुन्हा एकदा भाजपनेच अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानावर ६७४ जागाजिंकत राष्ट्रवादी काँग्रेस आली असून ५९१ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला ५८१ जागांपर्यंत मजल मारता आली.