बारावीची परीक्षा आणि त्यानंतर वेगवेगळ्या पात्रता परीक्षा आटोपल्यानंतर नागपूरच्या बाहेर, राज्याच्या बाहेर किंवा मग परदेशातही शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा क्रिम क्लास गेला की उर्वरित विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये कुठे ना कुठे प्रवेश घेऊन कोणती तरी पदवी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रवेश आणि परीक्षा या दोन्ही टोकांमध्ये अनेक ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’चे ते कधी सक्रिय तर कधी मूक साक्षीदार असतात. या ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’तून त्यांच्या आयुष्याला किती आकार दिला जातो. त्यातून नेमके काय साधते, गुणवत्तायुक्त शिक्षण खरेच त्यातून मिळते का? की विद्यार्थी अॅक्टिव्हिटीच्या नावाखाली केवळ प्रसिद्धी लाटली जाते. विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या महाविद्यालयीन अॅक्टिव्हिटीतून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण गुणांचा केवळ विकास होतो की तोही एक सोपस्कार आहे.

शिक्षणाचे जाळे खेडोपाडी, अगदी गडचिरोलीच्या दुर्गम भागात पोहोचले ते महाविद्यालयांमुळे. पूर्वी मैलो न् मैल पायपीट करीत शाळा शिकून मोठी झालेली माणसे त्यांचे शालेय अनुभव सांगतात तेव्हा आताची शैक्षणिक परिस्थिती खूप पटीने चांगली असल्याची खात्री पटते. कारण दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर ग्रामीण भागातही महाविद्यालये स्थापन करण्यात आली असल्याने मुलांना शिक्षण घेणे सोईस्कर झाले आहे. दिवसेंदिवस शिक्षण घेणारा विद्यार्थी टक्काही वाढतो आहे. पण, आजचा विद्यार्थी खरेच गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतोय की केवळ महाविद्यालयातील सवंग लोकप्रियता मिळवणाऱ्या उत्सव, जयंती-पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्यांच्या दौऱ्यांमध्येच मश्गुल होत चागला आहे. आता हा संशोधनाचा विषय उरलेला नसून महाविद्यालयांमधील प्राध्यापक आता अशा सवंगतेविषयी बोलू लागले आहेत. प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या खऱ्या शैक्षणिक ‘अॅक्टिव्हिटीं’ना बाजूला सारले जात आहे. शिवाय प्राध्यापक केवळ त्यांचे ‘एपीआय’ वाढवण्यासाठी किंवा ‘नॅक’ समोर सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवण्यासाठी ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’ करतात, असाही आरोप शिक्षण क्षेत्रातील लोकच करीत आहेत.
‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’ म्हणजे काय, असा प्रश्न कोणा प्राध्यापकाला विचारला की त्यांचे पहिले उत्तर मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देणे एवढेच असते. पण, अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून खरेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो की प्राध्यापक, प्राचार्याच्या एपीआयमधील गुण वाढवण्यास मदत होते, हे कोणीही डोळे झाकून सांगेल. मुळात ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’मध्ये समाजाविषयी निष्ठा आणि विद्यापीठाविषयी प्रामाणिकपणाची भावना रुजवणे होय. शिवाय त्यातून विद्यार्थ्यांची सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता व गुणवत्ता वाढवणे अपेक्षित असते. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्याची सामूहिक प्रयत्न असावे लागतात. जेणे करून त्याच्या नागरिकत्वाचे, नेतृत्वगुणाचे, सामूदाय निष्ठेची रुजवात होण्यास बळ मिळेल.
अगदी वक्तृत्व कला, वादविवाद स्पर्धांमध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येते. अनेक महाविद्यालयांमध्ये तर या स्पर्धा होऊनही त्याचा पाहिजे तसा गाजावाजा होत नाही. कारण विद्यार्थी त्या प्रमाणात सहभागीही होत नाहीत. गेल्यावर्षीपासून या स्पर्धा काही महाविद्यालयांनी पुन्हा जोरकसपणे घेण्यास सुरुवात केली. मात्र, नवनवीन विद्यार्थी उपक्रमांचा अभाव सातत्याने दिसून येतो. नॅशनल असेसमेंट आणि अॅक्रेडिएशन कौन्सिल (नॅक) ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’वर बराच भर देते. केवळ ‘नॅक’ येणार म्हणूनही वाटेल तशा ‘अॅक्टिव्हिटी’ घेणारी महाविद्यालये आहेत. त्यासाठी बाराही महिने कोणता ना कोणता दिवस साजरा करून त्याचे फोटो वर्तमानपत्रातून छापून आणण्याचा एककलमी कार्यक्रम घेऊन त्यांचा अॅकेडमिक परफॉर्मन्स इंडिकेट्री (एपीआय) वाढवत राहतात.
अनेक महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवले जातात. हा सुद्धा ‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’चा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘नॅक’ याविषयी विचारते. पण नोंदणीकृत विद्यार्थी संघटना अभावानेच सापडतील. राज्यपालांच्या आदेशाने होणारे आव्हान, आविष्कार, युवा महोत्सव इत्यादी तर विद्यार्थ्यांतील अनेक कलागुणांना चांगला वाव देतातच. पण, महाविद्यालयातूनही अशा दूरगामी फलश्रुती देणारे उपक्रम अभावानेच आढळतात. पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयातर्फे घेतली जाणारी ग्रॅज्युएट एक्सलन्स एक्झामिनेशन (जीईई) विद्याथ्यार्ंचे पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी करून घेते. मात्र, अनेक महाविद्यालयांना हे माहितीच नाही. आश्चर्य म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या आमगावच्या भवभूती महाविद्यालयात जीईईसाठी मुले बसवली जातात. नंदनवनमधील महिला महाविद्यालयात एकांकिका बसवायची होती. प्राचार्यानी विद्यार्थ्यांनाच आपल्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक घटनांवरील एकांकिकेची स्क्रिप्ट लिहायला सांगितली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेलाही वाव मिळाला. डझनभर स्क्रिप्ट विद्यार्थ्यांनी बनवल्या. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला त्यानिमित्त उत्तम वाव मिळाला.
आपण जाणतोच की पार्किंगच्या ठिकाणी अपंगांना गाडी काढणे फारच कठीण होऊन बसते. कारण ती मागे घेणे त्यांना शक्य होत नाही. अपंगांची अडचण ओळखून एस.बी. जैन तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अपंगांना दुचाकी मागे घेता येईल, असे तंत्रज्ञान विकसित केले. अर्थात संस्थेतील प्राध्यापकांच्या मदतीने त्यांनी पाच महिने या विषयावर काम करून चक्क एका अपंग व्यक्तीला त्याचा लाभ पोहचवला. भंडाऱ्याचे जे. एम. पटेल महाविद्यालय असो की भारसिंगीचे अरविंद देशमुख महाविद्यालय असो त्यांच्यावतीने ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या अॅक्टिव्हिटी लाजवाब आहेत. जे.एम. पटेल महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या गावातील प्रदूषित वैनगंगेच्या पाण्याचे नमूने गोळा करून तसा प्रकल्प युजीसीला पाठवला आहे, असे दूरगामी ठरणारी महाविद्यालयांची कामे भविष्यात केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्या त्या भागालाही समृद्ध करणारी आहेत.
‘स्टुडंट अॅक्टिव्हिटी’चा खरा प्रत्यय येतो तो ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांना पाहून. गेल्याच आठवडय़ात महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम समन्वयक आणि उत्कृष्ट स्वयंसेवक ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते नागपूर विद्यापीठात सत्कार करण्यात आला. त्यांचा आणि इतर विद्यार्थ्यांचा समाजातील वावरच बरेच काही सांगून जातो. एखाद्या विषयावरील मत व्यक्त करताना त्यांची भूमिका बनलेली असते, भाषेवर प्रभुत्व असते, समाजात वावरताना आत्मविश्वास ओतप्रोत असतो आणि नेतृत्व गुणाने परिपूर्ण असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच चमक असते. त्यामुळेच ग्रामीण भाग असो की शहरी भाग अनेक शासकीय योजना, धोरणे हे ‘एनएसएस’च्या माध्यमातून राबवली जातात.
ज्योती तिरपुडे