‘सैराट’च्या निमित्ताने चित्रपटाच्या लांबीची चर्चा होत आहे. दिग्दर्शकाने विषयाच्या खोलीचे महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपटाची लांबी वाढविली असेल तर यात बिघडले काय? कुठल्याही कलाकृतीचा आशय, विषय महत्त्वाचा असेल तर त्याची लांबी दुय्यम ठरते. जर काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनुसार चित्रपटाची लांबी कमी केली जात असेल तर हे दिग्दर्शकाच्या अभिव्यक्तीवर बंधन लादण्यासारखेच आहे. ‘सैराट’च्या निमित्ताने चित्रपटांची लांबी, दिग्दर्शकाच्या अभिव्यक्तीचे मुद्दे अधोरेखित झाले आहेत. बऱ्याच प्रेक्षकांकडून सैराटची लांबी कमी करण्याची मागणी होत आहे. चित्रपटातून दिग्दर्शक अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे चित्रपटाचा विषय चांगला असेल तर लांबी महत्त्वाची ठरत नाही. काही वर्षांपूर्वी चित्रपटांची लांबी जास्त होती आणि त्या वेळी ते पाहिले जात होते. मात्र यासाठी कलाकाराच्या आविष्कारावर बंधन येऊ नये. - दीक्षा शिर्के, डी. जी. रुपारेल सध्याच्या काळात लोकांना सर्वच पातळ्यांवर झटपट गोष्टी हव्या असल्यामुळे त्यांना अडीच आणि तीन तासांचे चित्रपट पाहणे आवडत नाही. मात्र चांगला प्रेक्षक चित्रपटाच्या वेळेपेक्षा त्याच्या आशय आणि विषयाला अधिक महत्त्व देत आहे. त्यामुळे सैराट तीन तासांचा असतानाही आज अनेक दिवस हा चित्रपट हाऊसफुल्ल जात आहे. सैराटमध्ये वास्तव आहे. त्यामुळे लांबी जास्त असतानाही या चित्रपटाची कामगिरी चांगली आहे. - गोरक्ष हिवाळे, जोशी-बेडेकर महाविद्यालय सैराट हा चित्रपट सत्य घटनेशी जोडला जाईल इतका वास्तवदर्शी आहे. चित्रपट पाहता हे कथानक खूपच विस्तृत आहे आणि म्हणूनच चित्रपटाचा कालावधी योग्यच आहे हे पटते. त्याचबरोबरच चित्रपटाच्या कालावधीला कात्री लावणे शक्य नाही हे चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकालाच कळू शकते. त्यामुळे किमान चांगल्या चित्रपटाच्याबाबतीत प्रेक्षकांनी संवेदनशीलता बाळगावी. - सर्वेश जोशी, डहाणूकर महाविद्यालय माहितीपट, लघुपट यांची लांबी कमी असून प्रभाव टाकणारे माध्यम आहे. यामध्ये कमी कालावधीत विषय मांडण्यासाठी दिग्दर्शकाला चांगली तयारी करावी लागते. मात्र चित्रपट माध्यम वेगळे आहे आणि मुख्य म्हणजे हे व्यावसायिक आहे. चित्रपट हा समाजातील अनेक महत्त्वाच्या, दुर्लक्षित विषयांवर चर्चा घडवून आणतो. काही वेळा विषयाचे लक्षात घेता तो परिणामकारक व्हावा यासाठी चित्रपटाची लांबी वाढवणे हे स्वाभाविक आहे. - चेतन सावंत, चेतना महाविद्यालय.