abhyas-upscआजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या विषयावर चर्चा करणार आहोत. यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो, ज्या अतिशय बुद्धिमान व हुशार असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला हे पाहता येते की, ‘बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. भावनिक बुद्धिप्रामाण्याच्या अभ्यासाचे मूळ आपल्याला डार्वनिच्या सद्धांतिक कामामध्ये आढळून येते. डार्वनिने हे सर्वात प्रथम मांडले की, भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी (Survival) आवश्यक असते.
अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना हे लक्षात आले आहे की, केवळ बुद्धिमत्ता तपासून बघणे (जी बुद्धिमत्ता चाचण्या/बुद्धय़ांक – Intelligence test/Intelligence quotient यामधून तपासली जाऊ शकते.) यामधून एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांची पूर्ण पारख होऊ शकत नाही. सर्वसामान्यत: ‘बुद्धिमत्ता’ या शब्दामधून ज्या प्रकारच्या क्षमतांची अपेक्षा केली जाते, त्यापलीकडे जाऊन मानवी भावनांवर आधारित बुद्धिमापनाची नवीन प्रणाली विकसित करण्यात आली. भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) हा तुलनेने नवीन असा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय आहे. या विचाराचे बीज आपल्याला डार्वनिच्या संशोधनातदेखील दिसून येते. भावनिक बुद्धय़ांक जास्त असणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी अधिक यशस्वी होतात, असे अनेक पाहणीअंती सिद्ध झाले आहे.
बुद्धिमत्तेचे प्रकार व त्यासंबंधीची वैचारिक मांडणी
गेल्या शतकापर्यंत ‘बुद्धिमत्ता’ या संकल्पनेच्या कक्षा केवळ स्मरणशक्ती, आत्मसात करण्याचा वेग अथवा समस्या सोडवणूक म्हणजेच  Cognitive Abilities (संज्ञानात्मक क्षमता) इथवरच रुंदावल्या होत्या. मात्र, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात काही शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप केवळ संज्ञानात्मक नसून त्यापेक्षा पुष्कळच विस्तृत असल्याचे सिद्ध केले.
भावनिक बुद्धिमत्तेचा इतिहास
* १९२०- एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सर्वप्रथम ‘सामाजिक बुद्धिमत्ता’ अशी संकल्पना मांडली.
* १९४० – डेव्हिड वेश्लर,  IQचे जनक, यांनी हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचे मत मांडले.
* १९६६ – ल्यूनन (Leunen) यांनी एक  ‘इमोशनल इंटेलिजन्स’वर आधारित शोधनिबंध प्रसिद्ध केला.
* १९७४ – क्लॉड स्टायनर यांनी ‘भावनिक साक्षरता’ या विषयावरील लेख प्रसिद्ध केला.
* १९८३ – हॉवर्ड गार्डनर यांनी ‘मल्टिपल इंटेलिजन्स’वरील लिखाण
प्रसिद्ध केले.
* १९९० – पीटर सॅलोवे व जॅक मेयर यांनी आपली भावनिक बुद्धिमत्तेची
मांडणी केली.
* १९९५ – डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेविषयी पुस्तक प्रसिद्ध केले.
वर नमूद केलेल्या गोष्टी म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेवरील संशोधनाचा इतिहास आहे. यामधील काही सद्धांतिक चौकटी या काळाच्या मोजपट्टीवर जास्त खऱ्या उतरल्या आहेत. जसे की, हॉवर्ड गार्डनर यांनी केलेले काम  Frames of Mind : The theory of multiple intelligence. यामध्ये त्यांनी मनुष्याकडे एकापेक्षा अधिक प्रकारच्या ‘बुद्धिमत्ता’ असल्याची संकल्पना मांडली.
एकूण सात विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचे त्यांनी प्रामुख्याने वैयक्तिक (Interpersonal) आणि आंतरवैयक्तिक (Interpersonal) प्रकार मांडले. तसेच डॅनियल गोलमन यांनी kEmotional Intelligence : Why it can matter more than IQ हे पुस्तक १९९५ मध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या या अतिप्रसिद्ध पुस्तकानंतर Emotional Intelligence अथवा भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा अधिक प्रचलित झाली.
भावनांचे महत्त्व
डार्वनिने म्हटल्याप्रमाणे, शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, भावनांमागे जीवशास्त्रीय कारण असते. भावना एक प्रकारे हे निदíशत करत असतात की, एखादी गोष्ट मानवाच्या गरजेनुसार पूर्ण होत आहे अथवा नाही. जेव्हा आपल्याला हवी असणारी गोष्ट/वस्तू आपल्याला मिळत नाही किंवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही तेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. यामध्ये राग, भीती, निराशा या आणि यांसारख्या भावनांचा समावेश होतो. व्यक्तीच्या त्याच्या भावनांवर असलेल्या नियंत्रणामधून किंवा त्याच्या अभावातून व्यक्तीला अनेकविध परिणामांना सामोरे जावे लागते. हे परिणाम सामाजिक, मानसिक किंवा शारीरिकदेखील असू शकतात.
भावना हे शरीराचे संवादी माध्यम मानले जाते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे शरीरासाठी विघातक ठरू शकते. उच्च भावनिक बुद्धय़ांक असणाऱ्या व्यक्ती ज्याप्रमाणे अधिक यशस्वी असतात, त्याचप्रमाणे त्या अधिक निरोगी, आनंदी व इतरांबरोबरील नातेसंबंधात अधिक सुखी असतात.
उच्च भावनिक बुद्धय़ांक असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक भावनांचा निरोगी समतोल आढळतो. जसे की –
स्व-नियंत्रण, मत्री, जागरूकता, समाधान, आनंद, परिपूर्णता, स्वायत्तता, स्वातंत्र्य, इच्छा, प्रशंसा, मानसिक शांतता इ. या उलट ज्या व्यक्तींचा भावनिक बुद्धय़ांक कमी असतो, त्यांना खालील भावनांच्या मिश्रणाला सामोरे जावे लागते. एकटेपणा, भीती, रिकामपण, दडपण, निराशा, बांधीलकी, अवलंबित्व, राग, चिडचिड, आळस, अस्थिरता इ. म्हणूनच आपल्या एकंदर आनंदी व गुणावत्तापूर्ण आयुष्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता निर्माण करणे आवश्यक आहे. या सगळ्यातून भावनिक बुद्धिमत्तेची एक व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाऊ शकते – ‘व्यक्तीची भावनांचा वापर करून घेऊन संवाद साधण्याची, लक्षात ठेवण्याची, वर्णन करण्याची, बोध घेण्याची, समजून घेण्याची, ओळखण्याची, भावना समजावून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.’
भावना व मेंदू
हे समजून घेणे अतिशय आवश्यक आहे की, भावनिक, बुद्धिमत्ता हे सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विरुद्ध क्षमता मोजणारे मापक नाही. भावनिक बुद्धिमत्ता व सर्वसामान्य बुद्धिमत्ता यांचा अनोखा मिलाफ व्यक्तीची एकूण बुद्धिमत्ता ठरवत असतो.
आपल्या सर्वानाच कधी ना कधी स्वत:च्या भावनांवर ताबा नसल्याचा अनुभव आला आहे. यामागील एक कारणमीमांसा म्हणजे भावनांचा आणि मेंदूचा गुंतागुंतीचा असलेला संबंध.
पंचेंद्रियांकडून मिळालेला कोणताही संदेश हा मेंदूतील thalamus  (थॅलॅमस)कडे पाठवला जातो व तेथून त्याचे रासायनिक संदेशात ‘भाषांतर’ केले जाते. अशा प्रकारे बहुतेक सर्व संदेश मेंदूच्या वस्तुनिष्ठपणे विचारप्रक्रिया करणाऱ्या केंद्रकाकडे पाठवले जातात. मात्र, अशा संदेशांमध्ये भावनांचे मिश्रण असल्यास हे संदेश अमिग्डेला (amygdala) या मेंदूमधील भावनिक केंद्राकडे पाठवले जातात. याच वेळेस संदेशातील बहुतेक भाग हा मेंदूतील वस्तुनिष्ठपणे विचार करणाऱ्या केंद्रकाकडे पाठवला जातो व काही भाग सरळ अमिग्डेलाकडे जातो. मेंदूला या संदेशावर पूर्णपणे वस्तुनिष्ठपणे काम करण्याची संधी न देताच हा संदेश अमिग्डेलाकडे जातो. म्हणजेच काही संदेशांसाठी प्रतिसाद हा केवळ लगेचच मिळणारा भावनिक प्रतिसादच असतो.
मेंदू आणि भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो व मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर बदलत असतो. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या भावनांना दूर लोटण्याचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अथवा त्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. आपल्या भावना या सतत आपल्या बरोबर असतात. आपल्या भावनांची मूळे आपल्या उत्क्रांतीमध्ये व जीवशास्त्रामध्ये दडलेली आहेत. आपल्या भावनांविषयी माहिती करून घेणे व त्यावर योग्य नियंत्रण मिळवणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.
अनेक संस्थांना व प्रशासकांना हे उत्तमरीत्या उमजले आहे की, केवळ कद IQ (Intelligence Quotient) व्यक्तीच्या यशाची अथवा गुणवत्तेची हमी देऊ शकत नाही. भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात घेणे प्रशासकांसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी अधिक प्रभावीरीत्या व परिणामकारक पद्धतीने काम करणारी व्यक्ती केवळ उच्च बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू शकत नाही.
तसेच अधिकाऱ्यांनीदेखील आपल्या सहकर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करत असताना त्यांच्याकडे असलेल्या भावनिक बुद्धिमत्तेला पुरेसे महत्त्व दिले पाहिजे.                                                            
admin@theuniqueacademy.com

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…