आज सर्वच स्तरांतील शिक्षणाच्या संकल्पना, अभ्यासक्रम, शिक्षणाला पूरक ठरणारे उपक्रम यांत महत्त्वाचे बदल होत असल्याने नर्सरीपासून उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय अशा सर्वच स्तरांवर शैक्षणिक सल्लागारांची गरज भासते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी तसेच उंचावण्यासाठी शैक्षणिक सल्लागारांची मदत होऊ शकते. शैक्षणिक सल्लागार होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये विश्लेषण क्षमता, संवादकौशल्ये, इतरांशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि व्यावसायिक पदवी प्राप्त असावी लागते. कामाचे स्वरूप - कामाचा संबंध थेट शिक्षणसंस्थांशी असल्यास अभ्यासक्रमासंबंधित अथवा पूरक उपक्रमांच्या आयोजनात मदत करणे, कामकाजातील आव्हाने, अडथळ्यांचा शोध घेऊन त्यासंबंधित उपाययोजना आखणे, शिक्षकवर्गाला सक्षम करण्यास मदत करणे अशा अनेक कामांमध्ये शैक्षणिक सल्लागाराला सक्रिय व्हावे लागते. शैक्षणिक सल्लागार म्हणून व्यक्तिगत काम करत असल्यास करिअरच्या निवडीचे निकष, दहावीनंतर अभ्यासक्रमांची निवड कशी करावी, अमुक एका महाविद्यालयातील प्रवेशाची अर्हता काय असते आणि तिथे प्रवेश मिळण्यासाठी कुठल्या बाबींची पूर्ती करणे अत्यावश्यक असते, अशा प्रकारचे समुपदेशन करावे लागते. अशा वेळेस विद्यार्थ्यांना कशात स्वारस्य आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने आणि उणिवा, त्याची अभ्यासातील अथवा इतर उपक्रमांतील प्रगती आणि त्याला पुढे काय करण्यात स्वारस्य आहे, हे सारे मुद्दे शैक्षणिक सल्लागाराला लक्षात घ्यावे लागतात. त्यानुसार, विद्यार्थ्यांला करिअरच्या दृष्टीने पुढे काय करता येईल, यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. कुठल्या गोष्टींवर विद्यार्थ्यांने आपले लक्ष केंद्रित करायला हवे, कुठल्या चाचण्यांना विद्यार्थ्यांने सामोरे जायला हवे, कुठल्या प्रशिक्षणवर्गात त्याने दाखल व्हायला हवे आणि कुठल्या महाविद्यालयातील प्रवेशाचे ध्येय त्यांनी ठेवायला हवे अशा विविध गोष्टी शैक्षणिक सल्लागार विद्यार्थ्यांच्या नजरेस आणून देतात. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा, मार्क मिळवण्याचा, अभियांत्रिकी- वैद्यक शाखेतच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, अशा तऱ्हेचा जो दबाव पालकांकडून असतो, तो दूर करण्याचा प्रयत्नही शैक्षणिक सल्लागार करतात. विद्यार्थ्यांला काही वेगळे करायचे असल्यास त्याचे म्हणणे ऐकून घेत पालकांशी ते यासंबंधात बोलून मध्यस्थीचे काम करतात. त्यांच्या या कामात त्यांनी निष्पक्षपाती दृष्टिकोन अंगीकारणे अपेक्षित असते. विद्यार्थिहित हे शैक्षणिक सल्लागाराचे सर्वोच्च हित मानले जाते. शैक्षणिक सल्लागार म्हणून जर कुठल्या शैक्षणिक संस्थेत रुजू झाल्यास त्याला उत्तम वेतन मिळू शकते. हे काम रुटीनच्या पलीकडचे असून मुलांमध्ये मिसळण्याचे कौशल्य त्यांच्यात हवे. अशा प्रकारच्या कामांतून आपण मुलांना मदत करू शकलो, याचे मोठे समाधानही मिळू शकते. अशा प्रकारच्या कामासाठी शाळांमध्ये रुजू झाल्यास तिथे कामाचे ठरावीक तास असतात. मात्र, यासंबंधीचा स्वतंत्र व्यवसाय करताना समुपदेशनासाठी आलेल्या विद्यार्थी-पालकांसोबत काम करताना वेळेची तमा बाळगावी लागत नाही तसेच खूप प्रवास करावा लागतो. आवश्यक कौशल्ये -शैक्षणिक सल्लागाराचे काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये समोरच्याशी उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य हवे. त्याचबरोबर समोरच्याने दिलेली माहिती लक्षात ठेवून वेगवेगळ्या गोष्टींशी त्याची जुळणी करून उपयोजन करण्याची क्षमता हवी. विश्लेषण क्षमता आणि तटस्थपणे निर्णय घेता येणे हे गुणही शैक्षणिक सल्लागारासाठी महत्त्वाचे ठरतात. शैक्षणिक सल्लागार बनण्यासाठी.. - शैक्षणिक सल्लागाराने बी.एड्. असणे, अध्यापन तसेच समुपदेशनाचा अनुभव असणे उपयुक्त ठरते. खरे पाहता, शैक्षणिक सल्लागाराने मानसशास्त्रातील पदवीसोबत बी.एड्. करणे योग्य ठरते. काही नोक ऱ्यांमध्ये एम.एड्. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे अनिवार्य मानले जाते. जैवतंत्रज्ञान पदवीधरांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे पदवी व पदव्युत्तर पात्रताधारक विद्यार्थ्यांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे विशेष औद्योगिक क्षेत्राच्या सहकार्याने बायोटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅम (बीआयटीपी) २०१६-१७ चे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक अर्हता : अर्जदारांनी २०१५ मध्ये बायोटेक्नॉलॉजीमधील बीई, बीटेक, एमएस्सी, एमटेक, एमबीए यांसारखी पात्रता अथवा एमव्हीएससी पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते २०१६ मध्ये वरील पात्रता परीक्षेला बसलेले असावेत. निवड पद्धती : अर्जदारांना निवड पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल व त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित उद्योगात प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यावेतन : योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित उद्योगातील प्रशिक्षण कालावधीत दरमहा १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येईल. अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रुपयांचा बायोटेक काँर्सोटियम इंडिया लिमिटेड, नवी दिल्लीच्या नावे असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहिती : प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी www.bcil.nic.in/ bitp 2016/ index.asp या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज पाठविण्याची मुदत : आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर, बायोटेक कँर्सोटियम इंडिया लिमिटेड (बीसीआयएल), पाचवा मजला, अनुव्रत भवन, २१०, पं. दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- ११०००२ या पत्त्यावर ५ मे २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीचा बीएस्सी- एव्हिएशन अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, रायबरेली व छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या बीएस्सी- एव्हिएशन या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश निवड परीक्षा- २०१६ द्वारे केले जातात. या अभ्यासक्रमाची तसेच निवडप्रक्रियेची माहिती पुढीलप्रमाणे आहे- उपलब्ध जागा : दीड वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध जागांची संख्या १५० असून, त्यापैकी २३ जागा अनुसूचित जातीच्या, ११ जागा अनुसूचित जमातीच्या व ४१ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असून ७५ जागा खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी १० + २ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा इंग्रजी, गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व किमान ५५% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५०%) उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांची दृष्टी निकोप असायला हवी. वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १७ वर्षांहून अधिक नसावे. निवड पद्धती : अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षा द्यावी लागेल. ही निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने २८ मे २०१६ रोजी घेण्यात येईल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानचालन पात्रता परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अधिक माहिती : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी, अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ६ मे २०१६ पर्यंत अर्ज करावेत.