स्वत:विषयी जाणवणारा दृढ विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास मूलत: स्वभावात असतोच; तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो. खरं तर आत्मविश्वास ही स्वत:च्या विचारांची प्रतिक्रिया असते. एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बऱ्याचदा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचारांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि क्षमता असून केवळ आत्मविश्वास गमावल्याने काही व्यक्ती अपयशाच्या बळी ठरत असतात. उदा. ‘मी करू शकेन का?’ ही भीती आणि ‘मी करू शकेन.’ हा आत्मविश्वास. विचारांमध्येच आत्मविश्वासाचा स्रोत दडलेला असतो. आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. आत्मविश्वासामध्ये स्वप्न साकार करण्याची स्वयंप्रेरणा असते. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रयत्नांमधूनच आत्मविश्वास जाणवत असतो. बऱ्याचदा खूप मेहनत आणि नियोजन करूनही ‘यश मिळालं नाही तर..’, ‘हातून चूक झाली तर..’, ‘नीट जमलं नाही तर..’ या नकारात्मक विचारांमुळे मनात भीती आणि गोंधळ सतत वाढत असतो. त्यामुळे आत्मविश्वास मिळविण्यासाठी मूलत: योग्य पद्धतीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा. विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वत:कडे, वास्तवाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं ‘कसं’ आणि ‘का’ ठरलं की, आत्मविश्वास अधिकाधिक वृिद्धगत होत जातो. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याचं मनोबल. आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातला आनंद. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची ऊर्जा. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची उमेद! आणि आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातलं यश..