आयआयटी, बिट्स पिलानी, एनआयटी/ आयआयआयटी या आघाडीच्या संस्थांसोबतच राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांच्या निकषांची माहिती देत आहोत-

असे दिसून येते की, गेल्या १५ वर्षांत दर २ वर्षांनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षेच्या स्वरूपात बदल झाले आहेत. देशभरातील सुमारे ३,५०० अभियांत्रिकी महाविद्यालयांत १८ लाख प्रवेशजागा उपलब्ध आहेत. त्यांपैकी ३५० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यातील दीड लाख प्रवेशजागा केवळ महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी देशस्तरावरील सुमारे आठ लाख प्रवेशजागा रिक्त राहतात तर राज्यातील ५० हजार जागा रिक्त राहतात. हेही नमूद करायला हवं की, देश स्तरावरील केवळ ६० हजार प्रवेशजागा या ‘अ’ प्रवर्गातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या असतात. अभियांत्रिकी प्रवेशांच्या नियमांत सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, हे लक्षात घेऊन या लेखाद्वारे २०१६ वर्षांतील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेच्या निकषांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत..

१. आयआयटी :

विविध आयआयटी संस्थांमध्ये जेईई- अ‍ॅडव्हान्स्डच्या अखिल भारतीय स्तरावरील गुणांकानुसार प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांने बारावीच्या (राज्य मंडळाच्या) परीक्षेत पाच विषयांमध्ये एकूण ७५ टक्के गुण मिळवणे हे आयआयटीतील प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरते. आयआयटीच्या विविध ठिकाणच्या संस्थांमध्ये एकूण दहा हजार प्रवेशजागा आहेत, त्यातील पाच हजार जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत आणि पाच हजार जागा या राखीव प्रवर्गासाठी आहेत. अखिल भारतीय स्तरावरील पहिल्या सहा हजार गुणांकांत स्थान पटकावणे (ऑल इंडिया रँक ऑफ टॉप ६,०००) हे आयआयटीतील सर्वसाधारण प्रवर्गात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक ठरते.

२. बिट्स पिलानी :

बिट्स पिलानीचे (बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्सचे)  प्रवेश हे बिटसॅट प्रवेशपरीक्षेद्वारे केले जातात. मात्र, विद्यार्थ्यांला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयांत किमान ७५ टक्के मार्क मिळवणे अत्यावश्यक आहे. बिट्सची पिलानी, गोवा आणि हैदराबाद अशा तीन ठिकाणी कॅम्पस असून तिथे १,८०० प्रवेशजागा उपलब्ध आहेत. बिट्सला प्रवेश मिळण्याकरता ४५० गुणांपैकी सुमारे ३०० गुण मिळवणे आवश्यक ठरते.

३. एनआयटी/ आयआयआयटी :

२०१६मधील एनआयटी  आणि आयआयआयटी संस्थांमधील प्रवेशाच्या निकषाचा गुंतागुंतीचा नियम आहे तो असा की, प्रवेशासाठी ६० टक्के वेटेज हे जेईई- मेन्सच्या गुणांना आणि ४० टक्के वेटेज हे बारावीच्या परीक्षेतील एकूण गुणांना दिले गेले आहे. अखिल भारतीय स्तरावरील गुणांकाची यादी (रँक लिस्ट) ही ६०-४० नियमानुसार बनवली जाणार आहे आणि त्या गुणांकानुसार प्रवेश दिले जातील. मात्र, सरकारच्या तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ मंडळांनी ही पद्धती अत्यंत सदोष असल्याने ६०-४०चा नियम रद्दबातल ठरवावा, अशी शिफारस केली आहे. म्हणून २०१७ पासून एनआयटी आणि आयआयआयटीचे प्रवेश जेईई मेन्सच्या गुणांवरच होतील आणि बारावीच्या परीक्षा मंडळाच्या परीक्षेतील गुणांना शून्य महत्त्व राहील, असे अपेक्षित आहे.

४. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये :

२०१६ मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच म्हणजेच

३५० महाविद्यालयांमधील प्रवेश हे पुढील नियमांनुसार होतील-

१. ६५ टक्के प्रवेशजागांवरील प्रवेश (राज्य कोटा) एमएचटी-सीईटी परीक्षेद्वारे होतील.

२. १५ टक्के प्रवेशजागांवरील प्रवेश (अखिल भारतीय स्तरावरील कोटा) जेईई- मेन्स परीक्षेद्वारे होतील.

३. उर्वरित २० टक्के प्रवेशजागांवरील प्रवेश व्यवस्थापन कोटय़ाच्या अखत्यारीत होतील.

२०१६ वर्षांसाठी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे मार्क विचारात घेतले जाणार नाहीत, मात्र, विद्यार्थ्यांने अर्हतेच्या निकषापोटी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयांत ५० टक्के गुण मिळवणे अपेक्षित आहे. या नियमांना कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे हे महाविद्यालय अपवाद आहे. या महाविद्यालयातील प्रवेश हे १०० टक्के एमएचटी- सीईटीत विद्यार्थ्यांने प्राप्त केलेल्या गुणांवर केले जातात.

२०१७ पासून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी आणि एनआयटी संस्थांच्या प्रवेशांच्या निकषांमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमांतील बातम्यांनुसार, तार्किक प्रश्नांवर आधारित ऑनलाइन कल चाचणीद्वारे (अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट) निवडलेले चार लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेनंतर जेईई परीक्षेला बसतील, अशी योजना मंत्रालय आखत आहे. २०१७ पासून जेईई-मेन्स आणि जेईई-अ‍ॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा एकाच जेईईमध्ये रूपांतरित केल्या जातील आणि त्यातील ४० हजार निवडक विद्यार्थ्यांना संयुक्त समुपदेशन प्रक्रियेद्वारे आयआयटी आणि एनआयटी संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.

या सर्व प्रवेशपरीक्षांची विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावी अशी दोन वर्षे तयारी करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्रवेशपरीक्षांच्या स्वरूपात जे बदल होतात त्याकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बारीक लक्ष ठेवणे आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाच्या तयारीला दिशा देणे आवश्यक आहे.

mdurgesh@yahoo.com