यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये होणाऱ्या विविध बदलांच्या पाश्र्वभूमीवर या वर्षीच्या परीक्षेमधील बदल हे ठळक व महत्त्वपूर्ण मानले जातात. अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातही मोठय़ा प्रमाणात बदल केलेले आपल्याला दिसून येतात. त्यापकी सामान्य अध्ययन पेपर – १ मधील बदलांचा परामर्श येथे आपण घेऊ या.
सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे ‘सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक’ व ‘कोणताही विकल्प नसलेले’ या स्वरूपाचे होते. ‘प्रत्येकी १० गुणांचे सलग २५ प्रश्न’ अशी २५० गुणांच्या प्रश्नपत्रिकेची रचना होती. आयोगाने घातलेली शब्दमर्यादेची मेख हे या वर्षीच्या मुख्य परीक्षेचे वैशिष्टय़ म्हणता येईल. १० गुणांच्या प्रश्नांसाठी २०० गुणांची मर्यादा ठेवण्यात आली होती. म्हणजेच १ गुणासाठी २० शब्द (पूर्वी हे प्रमाण साधारणत: १ गुणासाठी १० शब्द इतके होते. त्यामुळे साधारणत: तीन हजार शब्दांमध्ये एखादा पेपर पूर्ण होत असे.) आता आयोगाने दिलेल्या शब्दमर्यादेनुसार एकूण पाच हजार ही शब्दमर्यादा आहे. परंतु, आयोगाच्या निर्देशांनुसार, शब्दसंख्या ही ‘यापेक्षा अधिक नको’ (Not more than) स्वरूपाची आहे. त्यामुळे दिलेल्या मर्यादेच्या अगदी ५० टक्के प्रमाणातदेखील उत्तर लिहिल्यास (अर्थात् मुद्देसूद आणि परिपूर्ण) पूर्ण गुण दिले जातील. त्याचबरोबर आयोगाने, ‘उत्तराचा आशय हा त्याच्या लांबीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.’ अशी सूचक टीपही दिलेली आहे. त्यामुळे या चक्रव्यूहात न अडकता प्रसंगावधान दाखवून, कमीत कमी शब्दांत मुद्देसूद उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. एका अर्थी विविध पातळ्यांवर आयोग उमेदवारांची निर्णयक्षमता सतत तपासून पाहतो, याचे हे उदाहरण होय.
यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील आणखी महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे काठिण्यपातळी असल्याचे पाहता येते. ज्यामुळे सर्वसाधारणपणे ‘बहुतांश उमेदवारांना लिहिता येण्याजोगी, परंतु नेमक्या उत्तराची अपेक्षा ठेवणारी’ असे यावर्षीच्या परीक्षेचे स्वरूप होते. याआधी २०१० पासून साधारणत: सामान्य अध्ययन विषयाचे पेपर हे कठीण स्वरूपाचे असत. परंतु, या वर्षी तुलनेने सोपे परंतु नेमकेपणावर व मुद्देसूदपणावर भर देणारे असे पेपर होते.
सामान्य अध्ययन पेपर १ मधील अभ्यासक्रमातील घटक व त्यावरील प्रश्नांचे विवरण अभ्यासल्यास आपल्याला बऱ्याच अंशी मदत होते.
अभ्यासक्रमातील घटक व त्यावरील प्रश्न
यांचे वितरण
वरील वितरण पाहता इतिहास विषयाला अभ्यासक्रमात व प्रश्नपत्रिकेत तुलनेने जास्त महत्त्व असल्याचे दिसून येते. परंतु बहुतांश प्रश्न हे विश्लेषणात्मक पद्धतीचे होते. प्रश्नांचे स्वरूप हे ‘विश्लेषण करा, टीकात्मक परीक्षण करा, भाष्य करा’ या प्रकारचे होते. यावरून उमेदवाराकडील माहितीपेक्षा त्याची विचार करण्याची व विश्लेषणात्मक क्षमता तपासून पाहणे हे आयोगाचे उद्दिष्ट दिसते. त्यामुळे पुढील काळात अभ्यासाची दिशा ठरवताना या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. इतिहासातील घटनांचा अभ्यास करताना त्यावर चिंतन, विश्लेषण करणे व त्या घटनेची इतिहासाशी संबंद्धता ताडून पाहणे हे आता आवश्यक झाले आहे. उदा. ‘प्र. क्र. १ दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने फारसे उपयोगी नसतानाही संगम साहित्य तत्कालीन सामाजिक व आíथक स्थितीचे अत्यंत प्रभावी शैलीने वर्णन करते, ‘भाष्य करा.’
वरील प्रकारच्या प्रश्नांमध्ये संगम साहित्याचे तत्कालीन इतिहासातील स्थान अधोरेखित करणे आवश्यक आहे. केवळ Factual  (वस्तुनिष्ठ) स्वरूपाच्या अभ्यासातून या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. अशाच प्रकारे जगाच्या इतिहासावर आधारित प्रश्नांमध्येही हे विश्लेषण करणे अपेक्षित आहे. उदा. ‘उशिरा आलेल्या जपानी औद्योगिक क्रांतीमध्ये असे काही घटक होते, जे पाश्चिमात्य देशांच्या अनुभवापेक्षा अगदी वेगळे होते. ‘विश्लेषण करा.’