* मी सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए करत आहे. ही पदवी घेतल्यानंतर मला यूपीएससीची परीक्षा देता येईल का? - माधुरी कुंटे यूपीएससी म्हणजेच संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी किमान अर्हता ही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून घेतलेली पदवी अशी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे अधिकृत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे. त्याचे कुलपती हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतात. कुलगुरूंची निवड ही शासनामार्फत केली. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, सार्वजनिक क्षेत्रातील बँक परीक्षा अशा सर्व परीक्षा देता येऊ शकतात. * मी सध्या पुण्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. मला अर्थशास्त्र हा विषय अभ्यास करण्यास अवघड जात आहे. त्याची आवड कशी निर्माण करायची? या विषयाला सोपे बनवण्याच्या काही युक्त्या सांगू शकाल का? - वैभव कर्तस्कर जेव्हा कोणताही विषय आपल्याला अवघड वाटतो तेव्हा, एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आपल्याला त्यातील मूळ संकल्पना पुरेशा कळलेल्या नाहीत. बरेचदा मूळ संकल्पना न कळल्याने, त्यातील सौंदर्य लक्षात न आल्याने अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना अवघड जातो. हा थोडा क्लिष्ट विषय आहे खरा. त्याचे अनेक सिद्धांत हे गणितीय सूत्रांवर आधारित असतात. त्यामुळे आधी सर्व संकल्पना नीट समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. एनसीईआरटीने तयार केलेली अर्थशास्त्राची पुस्तके तू अभ्यासावी. त्यामुळे प्रारंभीचा पाया मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. शिवाय तू पुण्यामध्ये ज्या शिकवणी वर्गात जात आहेस, तेथील शिक्षकांना तुझी समस्या प्रामाणिकपणे सांग. जोपर्यंत तुला एखादी संकल्पना किंवा घटक समजत नाही, तोपर्यंत शिक्षकांचा पिच्छा सोडू नकोस. तुला जरी शिकवणी वर्गातल्या चाळणीमध्ये उत्तम गुण मिळत असतील तरीही शिक्षकांना प्रश्न विचारणं सोडू नकोस. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून अर्थकारण या विषयावर येणारे लेख, विश्लेषणं याचाही अभ्यास कर. तुला हळूहळू अर्थशास्त्र सोपे जाईल आणि त्यातली गंमत आणि सौंदर्य लक्षात येऊन विषय आवडू लागेल. तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)