जबाबदारी (Responsibility) व दायित्त्व (accountability) हे दोन शब्द महाभारतामध्ये पांडवांशी बोलताना भगवान श्रीकृष्ण अनेक वेळा उच्चारतात; पण तेच शब्द साहेबांनी तुमच्या बाबतीत उच्चारले की आपल्याला घामच फुटतो, गोंधळून जायला होते. आपण विचार करू लागतो की आता काय घोळ झाला. तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिलेल्या कामाचा यशस्वी किंवा अयशस्वी शेवट व त्यामुळे होणारे चांगले-वाईट परिणाम तुम्ही अंगीकारायला तयार असणे म्हणजेच जबाबदारी व दायित्व. अर्थात तुम्हाला कामाची जबाबदारी दिली गेली तरी प्रत्येक कामाचे दायित्व तुमचे असेलच असे नाही. तुम्हाला नोकरीवर ठेवताना तुम्ही तुमचे काम जबाबदारीने करावे असे अपेक्षितच असते; पण जाणतेअजाणतेपणे किंवा कुसंगतीमुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणे तुमच्यात तर दिसत नाहीत ना, याची खात्री करा. * स्वत:चा वय व हुद्दा याचा विचार न करता कुणाशीही उर्मटपणे, उद्दामपणे किंवा बालिशपणे वागणे. * दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटणे. * स्वत:चे काम अयशस्वी झाल्यास ते दुसऱ्यावर ढकलणे. * कुठलेही काम अंगाबाहेर टाकणे. * सवयीने व कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय येताना उशिरा व लवकर जाणे व वेळोवेळी दांडय़ा मारणे. * बदलत्या गरजेनुसार कामाची नवीन तंत्र न शिकल्यामुळे काही न येणे. * जाणते किंवा अजाणतेपणे कंपनीची गुपिते फोडणे. * आर्थिक लाभासाठी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करणे. * कार्यालयीन शिस्तपालनाची कुठलीही तमा न बाळगणे. * कार्यालयात येऊन कोम न करता नुसत्याच टवाळगप्पा मारून स्वत:च्या व दुसऱ्याच्या कामाचा अपव्यय करणे. नोकरीच्या पहिल्या वर्षांपासूनच एक उत्तम जबाबदार कर्मचारी म्हणून तुम्हाला ठसा उमटावयाचा असेल तर पुढील गोष्टी करत राहाणे अत्यावश्यक आहे - * कार्यालयात दररोज वेळेवरच येऊन पूर्ण वेळ काम करणे. काही संयुक्तिक कारणाशिवाय उशीर होणार असेल अगोदरच फोन करून पूर्वपरवानगी घेणे व पूर्वसूचना देणे हे महत्त्वाचे आहे. * नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला दिलेल्या कामाचे स्वरूप व तुमचा कंपनीच्या कारभारातील सहभाग कसा आहे हे तुम्हाला कळले पाहिजे. * बऱ्याच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याला कामाचा (Job Description) गोषवारा दिला जातो. त्यात कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या व दायित्व दिलेले असते. तुम्हाला हा गोषवारा न मिळाल्यास वरिष्ठांकडून मागून घ्या. * तुम्हाला दिले गेलेले काम हे तुमच्या कामाच्या गोषवाऱ्यात बसत नसेल, पण तुमच्याकडे ते करायचे कौशल्य व इच्छा असेल तर वरिष्ठांच्या कानावर घालून अवश्य करा; पण तुम्हाला यशाची खात्री वाटेपर्यंत त्याचे दायित्व स्वीकारू नका. * वरिष्ठ व कनिष्ठ सहकारी, कंपनीचे ग्राहक अशा सर्वानाच कामासाठी बिनधास्त अवलंबून राहाता येईल असे तुम्ही एक विश्वसनीय सहकारी आहात असे वाटले पाहिजे. * बऱ्याच वेळेला खूप किंवा तातडीने काम करावयाचे असते तेव्हा ते तुम्हीच करू शकाल याची खात्री इतरांना वाटली पाहिजे. * तुम्हाला दिलेल्या प्रत्येक कामाच्या कालमर्यादेच्या आधीच काम संपविण्याचा मार्ग शोधा, प्रयत्न करा. * काम पूर्ण करावयाची जबाबदारीच तुमच्यावर आहे, का त्याचे दायित्वही तुमच्याकडेच आहे याची काम चालू होण्यापूर्वी खातरजमा करा व तसे औपचारिक किंवा अनौपचारिकपणे वरिष्ठांच्या कानावर घाला. * प्रत्येक कामाचे ध्येय पूर्णत्वाने गाठल्याची खात्री करा. * पूर्णत्वास गेलेल्या कामाचे स्वत:च मूल्यमापन करा व तसे लिखित स्वरूपात वरिष्ठांना सादर करा. * वैयक्तिक कारणांसाठी अल्प किंवा दीर्घकालीन रजा घेताना प्रथम तुमच्यावर सोपविलेल्या कामांचा विचार करा. विशेषत: दीर्घकालीन रजा घेताना त्याचे अनेक महिने आधी नियोजन करा व त्यासाठी सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना विश्वासात घ्या. * रजेवर जाणाऱ्या सहकाऱ्याचे काम तुम्ही स्वत:हून सांभाळण्याची तयारी दाखवा. त्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य स्वयंप्रेरणेने शिकून घ्या. * नोकरीच्या पहिल्या वर्षांतच एक जबाबदार, प्रामाणिक व विश्वासू कर्मचारी व सहकारी म्हणून तुमचा नावलौकिक झाला तर पुढच्या वर्षी तुम्हाला घसघशीत पगारवाढ नक्कीच मिळू शकते. त्यापुढच्या काही वर्षांत हा नावलौकिक तुम्ही कायम ठेवल्यास अधिक जबाबदारीच्या पदावर होणारी तुमची बढती कुणी रोखू शकत नाही. डॉ. जयंत पानसे dr.jayant.panse@gmail.com