ज्या स्वातंत्र्यसैनिकांना स्वत:चे घर नाही, अशा स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या राहत्या गावात घर घेण्यासाठी १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेत ज्या स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नीला अजूनही स्वत:चे घर नाही अथवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावे घर नाही, अशा लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य दिले जाते. लाभार्थी निश्चित होण्यासाठीचे निकष - स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा इतर देशात कोठेही स्वत:चे घर नाही, असे स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची पत्नी अथवा पती अर्थसाहाय्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी नमुन्यात अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. निकटवर्तीय यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा आणि मुलगी, त्याच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली आहे अशी व्यक्ती यांचा समावेश आहे. राज्य शासनाकडून निवृत्तिवेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक किंवा केंद्र शासनाकडून निवृत्तिवेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक अर्थसाहाय्यासाठी अर्ज करू शकतील. स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची पत्नी अथवा पती यापैकी एक जण हयात असणे आवश्यक आहे. ते किंवा त्यांच्या नावाने त्यांचे निकटवर्तीय यांना अर्ज सादर करता येईल. कागदपत्रे - मागील १० वर्षांपासून स्वत:चे घर नाही, याविषयीचा पुरावा म्हणून स्वातंत्र्यसैनिकाच्या वडिलांचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकाच्या वडिलांचे नावे असलेल्या मिळकतीबाबतचा दाखला. वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटण्या झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकाच्या वाटय़ास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतीबाबतचा दाखला. स्वातंत्र्यसैनिकाच्या निकटवर्तीयाच्या नावे असलेल्या मिळकतीबाबतचा दाखला. मागील १० वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा पती) भाडय़ाच्या घरात राहत असल्याबाबतचा पुरावा म्हणून घर मालकाबरोबर झालेल्या नोंदणीकृत करारनाम्याची साक्षांकित प्रत.