यूपीएससीने ‘भारत व जगाचा भूगोल’ असे अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेले आहे, ज्यामुळे भारताचा भूगोल तसेच जगाचा भूगोल यासारख्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी परीक्षाभिमुख माहिती देणाऱ्या संदर्भग्रंथाची योग्य निवड करावी लागते. आजच्या लेखामध्ये या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा वापर करावा लागतो? तसेच एनसीईआरटीच्या नेमक्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा उपयोग परीक्षेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकतो? याची गतवर्षीय विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे चर्चा करणार आहोत. भूगोल या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ बाजारामध्ये उपलब्ध आहेत . याच्या जोडीला एनसीईआरटीच्या भूगोल या विषयाच्या क्रमिक पुस्तकांचाही उपयोग या विषयाची तयारी करण्यासाठी होतो.

एनसीईआरटीचे पुस्तके – मूलभूत माहितीसाठी

भूगोल या विषयाचे मूलभूत ज्ञान प्राप्त करण्यासाठी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरते. नेमक्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा वापर करावा लागतो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. तसे पाहता इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा वापर करावा लागतो पण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने Contemporary India (STD – IX,X), Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment (XI), Fundamentals of Human Geography (XII), India- People and Economy (XII) इत्यादी पुस्तकांचा वापर उपयुक्त ठरतो.  यामुळे भूगोल या विषयाची तोंडओळख होण्यास मदत होते. एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असल्यामुळे हा विषय समजणे तितकेसे कठीण जात नाही. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी या विषयाची मूलभूत माहिती आपणाला मिळते.

संदर्भग्रंथ – विषयाच्या र्सवकष तयारीसाठी

या विषयाची विभागणी साधारणत: दोन घटकांत आहे; पहिला घटक प्राकृतिक भूगोल आणि दुसरा घटक मानवी भूगोल. या दोन्ही घटकांवर बाजारात स्वतंत्ररीत्या अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी आपणाला Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India Comprehensive Geography ( by D.R. Khullar) World Geograhy (by Majid Husain), World Regional Geography (Tikha,Bali,Sekhaon) या संदर्भग्रंथाचा वापर करता येतो. तसेच यातील काही संदर्भग्रंथ मराठीमध्ये अनुवादित करण्यात आलेले आहेत.

उपरोक्त नमूद केलेल्या संदर्भग्रंथामध्ये या सर्व घटकांची अधिक सविस्तर पद्धतीने माहिती मिळते. प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन घटकनिहाय पद्धतीने केल्यास या संदर्भग्रंथाचा वापर अधिक फायदेशीर होतो. कारण एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे या विषयाचे एक मूलभूत ज्ञान आपणाला असते. याच्या जोडीला गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचा आधार घेतल्यास वर नमूद केलेल्या संदर्भग्रंथाचा वापर अधिक उपयुक्तरीत्या करता येतो. उदाहरणार्थ २०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यासारख्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात. कारण?’ अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी आपणाला उष्णदेशीय चक्रीवादळे या संकल्पनेची  सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा प्रश्न जगातील तीन विविध प्रदेशांच्या प्राकृतिक रचनेशी संबंधित आहे. त्यामुळे नेमके कोणते प्राकृतिक घटक यासाठी जबाबदार आहेत याचीही माहिती असणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास सर्व संदर्भग्रंथाचा वापर करता येतो. तसेच मुख्य परीक्षेचा विचार करता भारताचा भूगोल या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात. यामध्ये भारताच्या प्राकृतिक, लोकसंख्या, सामाजिक व आíथक घटकांशी संबंधित प्रश्न असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती देणारा ग्रंथ India Comprehensive Geography (by D.R.Khullar) हा आहे. म्हणून भारताच्या भूगोलवर सर्वाधिक भर परीक्षेच्या दृष्टीने द्यावा लागतो याव्यतिरिक्त ‘जगाचा भूगोल’वर ही प्रश्न विचारले जातात.

उदारणार्थ २०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये – महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. तसेच हे प्रवाह प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक यावर काय प्रभाव  टाकतात? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न प्राकृतिक आणि आíथक या दोन्ही पलूंचा आधार घेऊन विचारण्यात आलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), World Geograhy (by Majid Husain), World Regional Geography (Tikha, Bali, Sekhaon) इत्यादी संदर्भग्रंथाचा आधार घ्यावा लागतो.

याचबरोबर या विषयाशी संबंधित चालू घडामोडीचाही अभ्यास करावा लागतो, ज्यामध्ये मुख्यत्वे आíथक आणि सामाजिक भूगोल तसेच प्राकृतिक घटकांचा समावेश होतो. यासाठी द िहदू आणि इंडियन एक्स्प्रेस यासारखी वर्तमानपत्रे, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ यासारख्या मासिकांचा वापर उपयोगाचा ठरतो.

उदाहरणार्थ, २०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला होता. – मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यातील दिल्लीमधील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे? हा प्रश्न पर्यावरण आणि हवामान संबंधित होता आणि याला चालू घडामोडीचा संबंधही जोडलेला होता. तसेच २०१६ मध्ये दक्षिण चिनी समुद्र व त्याचे महत्त्व याचबरोबर भारतातील महापुराची समस्या यासारख्या बाबींवरील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यासाठी उपरोक्त नमूद केलेली वर्तमानपत्रे आणि मासिकांचा उपयोग करता येतो. थोडक्यात उपरोक्त नमूद केलेल्या एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा वापर तसेच संदर्भग्रंथाचा वापर करून भूगोल या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करता येते.