राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्र व राज्यसरकारतर्फे विविध योजना व उपक्रम राबविले जातात. या मिशनअंतर्गत गावातील आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती तसेच उपकेंद्र बळकटीकरण इत्यादी उपक्रमांना स्थानिक पातळीवर महत्व दिले जाते. गावातील आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती या समितीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि अंगणवाडी किंवा आशा कार्यकर्ती हे तिघे जण असतात. या समितीची सचिव म्हणून आशा किंवा अंगणवाडी कार्यकर्ती असते. या समितीला दर वर्षी दहा हजार रुपये अनुदान मिळते. या अनुदानातून विविध कामे समिती करू शकते. यातला काही खर्च हा भरपाई करून मिळतो. या समितीचे बँकेत खाते असते. सरपंच आणि आशा या दोघांच्या सहीने हे खाते चालते. या समितीला एक दिवसाचे प्रशिक्षण मिळते. गावातील आरोग्य आणि आरोग्यसेवा याबद्दल नियोजन आणि अंमलबजावणी ही समिती करू शकते. उपकेंद्र बळकटीकरण प्रत्येक आरोग्य उपकेंद्राला आता एकाऐवजी दोन परिचारिका असतात. याशिवाय पुरुष आरोग्य कर्मचारी तर असतोच. मिशनने उपकेंद्राची रंगरंगोटी, काही उपकरणे, जादा औषधे इ. साधनसामग्री पुरवली जाते. गरोदर स्त्रियांच्या तपासणीचे काम उपकेंद्रात आता अधिक चांगले होते. शक्य असेल ते बाळंतपण उपकेंद्रात होणे अपेक्षित असते. याशिवाय इतर नेहमीची कामे असतातच. उपकेंद्राला दर वर्षी निधी-अनुदान मिळते. यासाठी बँकचे खाते उघडलेले आहे. हे खाते नर्सताई आणि त्या गावचा सरपंच यांनी संयुक्तपणे चालवायचे असते. एकूण बाळंतपणांपैकी २०-३० टक्के बाळंतपणे उपकेंद्रांमध्ये व्हावीत अशी अपेक्षा आहे. देखभाल, रंगरंगोटी, उपकरणे यासाठी मिशनने वार्षिक अनुदान सुरू केले आहे. प्रत्येक केंद्रास रुग्ण कल्याण समिती असते. त्या भागातले लोकप्रतिनिधी व अधिकारी या समितीत असतात. ग्रामीण आरोग्य रुग्णालय ग्रामीण आरोग्य रुग्णालयात मुख्य म्हणजे बाळंतपणाचे सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची सोय असणे अपेक्षित असते. या दृष्टीने प्रशिक्षित स्टाफ व डॉक्टर, उपकरणे, छोटी रक्तपेढी वगैरे सज्जता अपेक्षित आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ हे दोन तज्ज्ञ ग्रामीण रुग्णालयात असले पाहिजेत, तरच शस्त्रक्रिया होतील.