महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे तर्फे पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी राज्यातील मुस्लीम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील १ ली ते १० वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. केंद्र सरकारच्या या मॅट्रिकपूर्व शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक पात्रता- अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत- * उमेदवार वर नमूद केलेल्या अल्पसंख्य समाजातील व राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांमध्ये १ ली ते १० वीचे शिक्षण घेणारे असायला हवेत. * इयत्ता १लीचे विद्यार्थी सोडल्यास इतरांनी गेल्या वर्षीच्या परीक्षेत कमीत कमी ५०% गुण मिळविलेले असावेत. * अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक १ लाखाहून अधिक नसावे. * एका कुटुंबातून २ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. * या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. * यापूर्वी सदर शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व तपशील : शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, दूरध्वनी क्र. ०२०- २६१२३५१५ वर संपर्क साधावा अथवा राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढशिक्षण संचालनालय, पुणेच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१६ आहे. श्री बृहद् भारतीय समाजातर्फे शिष्यवृत्ती श्री बृहद् भारतीय समाज, मुंबईतर्फे देशांतर्गत विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. समाविष्ट विषयांचा तपशील- हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेमध्ये एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, संगणकशास्त्र, कृषी, पशुरोगचिकित्सा, नर्सिग, शिक्षणशास्त्र इ. विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आवश्यक पात्रता- * अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांची संबंधित पात्रता परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. फार्मसी विषयातील अर्जदार विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट ४५% पर्यंत शिथिलक्षम आहे. * अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६०,००० रु. हून अधिक नसावे व अर्जदार इतर कुठल्याही शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत. शिष्यवृत्ती देताना संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर देण्यात येईल. अधिक माहिती व तपशील- वरील शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली श्री बृहद् भारतीय समाज, मुंंबईची जाहिरात पाहावी अथवा समाजाच्या दूरध्वनी क्र. ०२२- २२०२०११३ वर संपर्क साधावा. अर्ज व माहितीपत्रक- विहित नमुन्यातील अर्ज हवे असतील तर उमेदवारानी श्री बृहद् भारतीय समाज, एन. के. मेहता इंटरनॅशनल हाऊस, १७८ बॅक बे रेक्लमेशन, बाबुभाई एम चिनॉय मार्ग, एलआयसी योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर संपर्क साधावा. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज वरील पत्त्यावर ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.