कला शाखेकडे येणारे विद्यार्थी हे बरेचदा इतर काही पर्याय उरलेला नाही, म्हणून या शाखेकडे येतात. खरेतर तसे असू नये. कारण या शाखेमध्ये एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्याची संधी मिळते. करिअरलाही वाव आहे. यातलाच एक विषय म्हणजे समाजशास्त्र. वेगवेगळ्या देशांमध्ये समाजाच्या विकासाचे प्रश्न विभिन्न असतात, त्याचबरोबर सामाजिक, आíथक व्यवस्थेमध्ये नोकरीच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. अशा वेळी समाजशास्त्राचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. समाजशास्त्र हे समाजजीवनाचा अभ्यास करते. त्याच वेळी सामाजिक जीवन, संस्था, बदल, भिन्न, समुदाय अशा अनेक बाबींचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. समाजातील प्रश्न कसे सोडवले जातील याचेही पर्याय या विषयाच्या अभ्यासामुळे उपलब्ध होतात. म्हणूनच समाजशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. पण आजही समाजविज्ञानाकडे पाहण्याचा कल फारसा बदललेला नाही. पण नोकरीच्या बाजारात पाहिले तर समाजविज्ञानातील विद्यार्थ्यांकडे करिअरचे अनेक पर्याय आहेत. समाजशास्त्रातील पदवी, पदव्युत्तर, पीएचडी या अभ्यासक्रमांतून वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक प्रकारच्या नोकरीच्या उत्तम संधी मिळतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल संधी आहेत. उद्योग व व्यवसाय – समाजशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना पर्सोनल ऑफिसर, संशोधक, मानवी संसाधन व्यवस्थापक, विमा अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षक, इ. नोकरीच्या संधी मिळू शकतात. शिक्षण क्षेत्र - अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सल्लागार, संशोधन व प्रकल्प अधिकारी, यूजीसी नेट किंवा सेट परीक्षा दिल्यानंतर महाविद्यालये व विद्यापीठे यांमध्ये साहाय्यक प्राध्यापक ही संधी उपलब्ध होते. या विषयात एमए केल्यानंतर विद्यापीठात पीएचडी संशोधन करण्याची संधी उपलब्ध आहेत. सामाजिक सेवा - पुनर्वसन अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, समाजविकास अधिकारी, लवाद अधिकारी, बालसुधार व महिला कल्याण अधिकारी अशा या पदांसाठी समाजशास्त्रातील पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध होते. आरोग्य व्यवस्था - हॉस्पिटल व्यवस्थापक, आरोग्य कल्याण अधिकारी समुदाय सेवा क्षेत्र - शहर नियोजन अधिकारी, पर्यटन व्यवस्थापक, इ. प्रकाशन क्षेत्र - संपादक, पत्रकार, व्यावसायिक लेखक सल्लगार /तंत्रज्ञ (जाहिरात) इ. कायदा - पोलीस अधिकारी, वकील, इ. राज्य व केंद्रीय सेवा - बीए समाजशास्त्र या विषयातील पदवी घेऊन राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोग याची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांला अनेक संधी मिळू शकतात. तहसीलदार, बीडीओ अधिकारी (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर), विक्रीकर निरीक्षक, उत्पन्न कर निरीक्षक, आएएस, आयपीएस, आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिसेस), भारतीय वनसेवा या क्षेत्रांमध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते. काळाची गरज ओळखून, जागतिकीकरणाच्या व नवीन अर्थव्यवस्थेच्या कालखंडात समाजशास्त्राचा जाणीवपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण आज अनेक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाची गरज आणि उपयोजन वाढू लागले आहे. तेव्हा एक वेगळा विचार केल्यास, वरील नोकऱ्यांशिवायही अनेक तऱ्हेच्या नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांला मिळू शकतील. (लेखक मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)