ओशोंच्या एका पुस्तकात लाकूडतोडय़ाची नवीन गोष्ट वाचावयास मिळाली. गोष्टीतील हा लाकूडतोडय़ा रोजच्या रोज रानात जाणे, लाकडे तोडणे, पोटापाण्यासाठी बाजारात जाणे, मिळेल त्या भावाला ती विकणे या कटकटीला भयंकर कंटाळलेला असतो. अशाच एका क्षणी अत्यंत खिन्न मन:स्थितीत झाडाखाली बसून तो विचार करतो, ‘हे असे जगण्यापेक्षा मृत्यू कितीतरी बरा. देवा हे सोसण्यापेक्षा मृत्यूला लवकर पाठव.’ त्याची हाक ऐकून प्रत्यक्ष मृत्यू त्याच्यासमोर उभा राहतो. आता मात्र तो गोंधळतो, घाबरतो. मृत्यूबरोबर जायची त्याची अजिबात तयारी नसते. उलट, आता आलाच आहेस तर पुन्हा ते ओझे माझ्या डोक्यावर ठेवायला मदत कर अशी विनंती तो मृत्यूला करतो! बंधनात अडकायला आपल्यालाच आवडत असते.
अभिनिवेश, द्वेष, राग (आवड), अस्मिता व अविद्या या प्रतिप्रसवानेच परमात्म्याशी एकरूपता साधता येईल. Death is not an end it is the beginning of infinities of God. अशी नाण्याची दुसरी बाजू ओशो उलगडतात ती यासाठीच. या स्थितीस पोचण्यासाठी आसनात प्रयत्न शैथिल्य, व अनंत समापत्ती(अनंतावर लक्ष केिद्रत करणे) साधता आली पाहिजे तरच आसनात स्थिरता, सुखमयता प्राप्त होईल.
शशांकासन
मन शांत करण्यासाठी बैठक स्थितीतील शशांकासनाचा सराव आपण करू या. प्रथम विधिवत वज्रासन घाला. पाठकणा समस्थितीत, डोळे शांत मिटलेले व दोन्ही तळहात मांडय़ांवर ठेवा. आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही हात एकमेकांना समांतर असतील. आता दोन्ही हात पुढे आणा. हात कोपरांमध्ये किंचित वाकवा. गुडघ्यांसमोर डोके (कपाळ) आणत जमिनीवर विसावण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीत ४ ते ५ श्वास स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा श्वास घेत हात डोक्यावर न्या. श्वास सोडत पूर्वस्थितीत या. या आसनाच्या सरावाने पाठकण्याचे आरोग्य सुधारते. बद्धकोष्ठतेचा विकार ठीक होण्यास मदत होते. शशांक म्हणजे चंद्र. चंद्र हे शीतलतेचे प्रतीक मानले जाते. शशांकासनाच्या   सरावाने शांतता अनुभवास येते.