‘‘अहो, मी जुन्या जमान्यातला बाप! दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देणारा. कपडय़ाच्या शुभ्रतेपेक्षा चारित्र्याची शुभ्रता जपणारा. अंगावर इस्त्रीचा कपडा नसला तरी चालेल, पण डोक्यावर कर्जाचा बोजा असता कामा नये, यावर विश्वास ठेवणारा नि मुख्य म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची इभ्रत तीच बापाची इभ्रत असं मानणारा एक बाप!’’
रामभाऊ भोळेंनी संध्याकाळी ‘
‘ज्ञाती साहाय्यक संस्थे’ची एका खोलीतली कचेरी उघडली. इथं संस्थेचं दोन तास काम चालतं. ज्ञातीची चार सेवाभावी ज्येष्ठ मंडळी इथं विनावेतन सेवा देतात. थोडय़ाच वेळात कानडे, भडसावळे, वीरकर आणि आरेकर हे ज्येष्ठ सेवक हजर झाले. क्षणभर किरकोळ गप्पा करून आपापल्या कामाला लागले. मध्येच आरेकरांनी वीरकरांना विचारलं, ‘‘अहो संस्थेनं ज्ञातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हणून दिलेल्या आर्थिक मदतीचं रजिस्टर आपल्याकडे आहे. प्रदीर्घ काळानंतरही ही रक्कम ज्यांनी अद्याप परत केलेली नाही त्यांना आपण स्मरणपत्रं पाठविली होती त्याचा काही उपयोग झाला का?’’
वीरकर म्हणाले, ‘‘थोडा उपयोग झाला, पण अगदीच नगण्य.’’
‘‘आपण त्यांना पुन्हा स्मरणपत्रं लिहायला हवीत. काही वेळा पत्रं मिळत नाहीत, काही वेळेअभावी वाचली जात नाहीत, काही वाचूनही दुर्लक्षिली जातात, तर काहींना पत्र किंवा पैसे पाठवायला वेळ मिळत नाही.’’

‘‘हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन मी आधीच दोन-दोन, तीन-तीन स्मरणपत्रं पाठविली आहेत. अजून पाठवतोच आहे, कारण आता गरज संस्थेला आहे, अशी माझी धारणा आहे आणि या रकमा परत आल्या नाहीत तर संस्था पुढच्यांना कशी मदत करणार! शेवटी हे काही आपलं वैयक्तिक काम नाही, संस्थेचं काम आहे. तेव्हा याबाबतीत वाईटपणा येईल म्हणून आपण घाबरण्याचं कारण नाही. त्यातून पत्रावरची सही बघून एखाद्यानं मला वाईटपणा दिला तर तो मी कर्तव्यभावनेनं स्वीकारायला..’’
‘‘ ज्ञाती साहाय्यक संस्थेची कचेरी हीच ना?’’ एका अतिवृद्ध गृहस्थानं हातातली काठी सावरीत विचारलं. कृश अंगकाठी. अंगात बिनइस्त्रीचा साधा, शुभ्र सदरा. पिकलेल्या मिशा, धोतर.
वीरकर बोलणं थांबवीत नि बाहेरच्या गृहस्थांना निरखीत म्हणाले, ‘‘होय-होय. या.’’
‘‘आपण?’’
‘‘मी वीरकर.’’
‘‘छान, मला आपल्याला भेटायचं होतं. मी दत्तात्रेय रामचंद्र तेरेदेसाई.’’
वीरकर खुर्चीतून उठत म्हणाले, ‘‘तेरेदेसाईसाहेब, आपण या खुर्चीत बसा.’’
‘‘मी साहेब वगैरे कोणी नाही. एक साधा बाप आहे.’’
‘‘तरी बसा. पाणी देऊ?’’
‘‘नको. खुर्ची दिलीत हेच खूप आहे.’’
खुर्चीत बसून घेत तेरेदेसाई म्हणाले, ‘‘आपल्याला त्रास देण्याचं कारण असं की, मला आपली सर्व स्मरणपत्रं मिळाली.’’
‘‘कशाबद्दलची?’’
‘‘माझा मुलगा बाळकृष्ण दत्तात्रेय तेरेदेसाई याला आपल्या संस्थेनं उच्च शिक्षणासाठी तात्पुरती आर्थिक मदत म्हणून चाळीस सहस्र रुपये दिले होते. आपल्या मदतीमुळं तो अमेरिकेत जाऊ शकला. कालांतरानं अपघाती मरण पावला. सौभाग्यवती आधीच गेल्या होत्या. सध्या मी एकटाच असतो. बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे इच्छा असूनही आपल्या पत्रांना उत्तर देऊ शकलो नाही. प्रत्यक्ष येऊही शकलो नाही. याबद्दल क्षमस्व.’’
‘‘आम्हीच आपली क्षमा मागितली पाहिजे.’’
‘‘कशाबद्दल?’’
‘‘संस्थेनं या बाबतीत एक ठराव करून अशा रकमा माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याकडील खेदवृत्त संस्थेपर्यंत न आल्यामुळं आपल्याला अनावश्यक स्मरणपत्रं पाठविली गेली याबद्दल! आत्ता हे खेदवृत्त संस्थेकडे लेखी द्या. आवश्यक ती नोंद घेऊन सदर रक्कम माफ केली जाईल व आपल्याला स्मरणपत्रं येणार नाहीत.’’
‘‘माफ करा. आपला गैरसमज होतोय. मी माफीसाठी आलेलो नाही. मी ही सर्व रक्कम व्याजासह परत करायला आलेलो आहे. मला व्याजासह एकूण देय रक्कम सांगा. मी थांबतो.’’
‘‘आता तसं नका करू. त्यापेक्षा आपण देणगी म्हणून..’’
‘‘नाही. मला देणगी वगैरे द्यायची नाहीए. मला हीच रक्कम व्याजासह परत करायची आहे.’’
वीरकर विचारात पडले. आरेकरांनी ‘त्यांची एकूण रक्कम द्यायची तयारी असेल तर घ्यायला हरकत नाही.’ असं सांगितलं. वीरकरांनी रजिस्टर काढून हिशोब करायला सुरुवात केली. हिशोब झाल्यावर एकूण एकसष्ट हजार नऊशे वीस रुपये नव्वद पैसे होत असल्याचं सांगितलं. तेरेदेसायांनी कापडी पिशवीतून चेकबुक काढलं. सही करून कोरा चेक वीरकरांपुढं ठेवत म्हणाले, ‘‘कृपा करून आपण रक्कम लिहा आणि मला पूर्ण रक्कम मिळाल्याची पावती द्या.’’
वीरकरांनी दिलेली पावती वाचून पिशवीत टाकीत तेरेदेसाई विनंतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘थोडं बोलू?’’
वीरकरांनी मान कलती केल्यावर तेरेदेसाई म्हणाले, ‘‘अहो, मी जुन्या जमान्यातला बाप! दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देणारा. कपडय़ाच्या शुभ्रतेपेक्षा चारित्र्याची शुभ्रता जपणारा. अंगावर इस्त्रीचा कपडा नसला तरी चालेल, पण डोक्यावर कर्जाचा बोजा असता कामा नये यावर विश्वास ठेवणारा नि मुख्य म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची इभ्रत तीच बापाची इभ्रत असं मानणारा एक बाप. येताना कर्जबाजारी मुलाचा बाप म्हणून खाल मानेनं आत आलो. जाताना कर्जमुक्त मुलाचा बाप म्हणून अभिमानानं नि ताठ मानेनं बाहेर पडणार आहे. माझ्या मुलाचा आत्मा जिथं कुठं असेल तिथं तोही माझ्यासारखाच अभिमानानं नि ताठ मानेनं बाहेर फिरेल यावर माझी दृढ श्रद्धा आहे. अच्छा येतो.’’
आणि तेरेदेसाई थकल्या पावलांनी, काठीच्या आधारानं चालू लागले…