आपल्याकडे एकत्र कुटुंबात, लग्न समारंभात, एखाद्या कार्यक्रमात वा हॉटेलात तेला-तुपाचे डबे वापरले जातात. हे डबे पत्र्याचे असतात. या डब्यातही छान बाग फुलवता येते. या तेलाच्या डब्यांना छोटय़ा अॅक्सल ब्लेडने कापावे, म्हणजे डब्याच्या पत्राला धार येत नाही. कटर मशीनने कापल्यास धार येते व अपघाताची शक्यता वाढते. या डब्यांना उभा काप दिल्यास त्याचे दोन पसरट भाग तयार होतात. याची खोली ५ इंचाची भरते. त्यात कांदे, लसूण, पालक, मेथी, गव्हांकुर छानपकी पिकवता येते. तसेच हे पसरट भाग बोन्साय झाडे जतन करण्यासाठीही उपयोगात येतात. डब्यास आडवा काप दिल्यास त्याचे ७ इंच खोलीचे दोन भाग तयार होतात. यात गवती चहा, मिरची, वांगे, आळूची पाने लावता येतात. तसेच या अखंड डब्यांचे फक्त वरील भाग कापून घेतल्यास १४ इंच खोलीचा डब्बा मिळतो. त्यात हळद, ऊस, चवळी, मलबार पालक लागवड करता येतो. तसेच या डब्यांना तिरपा मधोमध काप दिल्यास त्याचे त्रिकोणी दोन भाग मिळतात. त्यातही पालेभाज्या लागवड करता येतात. डब्यांसाठी वापरलेल्या पत्र्याच्या गुणवत्तेवर डब्यांचे आयुष्यमान वाढते. तरी डब्बा दीड ते दोन वर्षे वापरता येतो. यास तांबडा, काळा रंग दिल्यास त्यावर वारली पेंटिंगही करता येते. केळीचे कापलेले खांब.. केळीचे घड एकदा झाडावरून उतरवून घेतले की त्याचे वेगवेगळ्या लांबीचे व जाडीचे खांब उपलब्ध होतात. हे खांब असेही वाळायला म्हणजे त्या खांबातील पाणी बाष्पीभवन होण्यास खूप वेळ लागतो. या खांबाची टोकाकडील निमुळता भाग तासून घ्यावा. म्हणजे दोन्ही बाजूला सारख्याच जाडीचे खांब मिळतात. खांबाची जाडी बघून त्यात ५ इंच खोलीचे व तेवढय़ाच लांबी-रुंदीचे खोलगट भाग तयार करावेत. त्यात माती भरून रोपवाटिका तयार करता येते किंवा पुदिना, पालक लागवड करता येते. हे खांब या प्रकारामुळे लवकर कुजून त्याचे खतात रूपांतर होण्यास मदत तर होतेच, पण त्यासोबत उपलब्ध कालावधीतही छान पालेभाज्या तयार करता येतात. केळीच्या खांबांची पायरी पद्धतीने मांडणी करून त्यावर भाजीपाला पिकवता येतो. जैविक कचऱ्याचे खतात रूपांतर तर होतेच, पण त्यातून बागेच्या सौंदर्यवाढीलाही मदत होते. अशा अनेक गोष्टींचा आपण कल्पकतेने वापर करू शकतो. एकदा खांब पाणी व उन्हामुळे मलूल झाला की त्याचे पदर उस्तरून त्यांना वाळवून घ्यावे, त्याचाही कुंडय़ा, वाफा पुनर्भरणासाठी उपयोग करता येतो. संदीप चव्हाण -sandeepkchavan79@gmail.com