स्त्री-सक्षमीकरणासाठी सेबीने उचललेले पाऊ ल निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पण त्यापूर्वीच अनेक समर्थ महिलांनी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषविली आहेत हे विशेष. यावरच अधिक प्रकाश टाकणारा वसंत कुलकर्णी यांचा ‘सार्थ स्त्री नेतृत्व’ (११ एप्रिल) व कल्पना सरोज यांचा ‘कष्टाला पर्याय नाही’ हे दोन लेख माहितीपूर्ण व प्रेरणादायी असल्यामुळे वाचनीय वाटले. ‘कष्टाला पर्याय नाही’ हा तर स्फूर्तिदायी लेख आहे. अत्यंत हलाखीच्या, कष्टाच्या परिस्थितीतही मनोबलाच्या सामर्थ्यांवर व्यक्ती किती विस्मयकारक यश मिळवू शकते, याचे उदाहरण म्हणजे कल्पना सरोज! त्यांचं पूर्वायुष्य मनाला चटका लावणार होतं. आयुष्यात त्यांना अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीला, छळाला, त्रासाला तोंड द्यावं लागलं. पण त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर संघर्ष करून प्रयत्नपूर्वक त्या या परिस्थितीतून कशा बाहेर आल्या, तो त्यांचा उत्कर्षांचा प्रवास चक्रावून टाकणारा आहे. सुलभा वैद्य, नाशिकअचूक निरीक्षण‘अनुभवांचं जग’ हा पालक-बालक या सदरातील शोभा भागवत यांचा लेख (११ एप्रिल) वाचला. लेखात उल्लेख असणारी गोष्ट ‘एक मूल वाढवायचं तर सगळ्या गावाची साथ लागते. It takes a village to raise a child किती सार्थ आहे! केवळ मुलाच्या संगोपनातच नव्हे तर समाजाच्या अनेक घडामोडींत अनेक घटकांचा आणि व्यक्तींचा हातभार असतो, पण व्यक्तिवादी आणि स्वयंकेंद्रित व्यक्ती स्वत:पलीकडे काहीच बघत नाहीत.‘गेल्या पंचवीस वर्षांत मुलं किती बदलली आहेत! ती अशांत आहेत, अस्वस्थ आहेत, त्यांची भाषा बदलली आहे.’ या लेखिकेच्या निरीक्षणाला दुजोरा देणारी एक आठवण झाली. शाळेत मारामाऱ्या आणि लढाईचे खेळ करणाऱ्या मुलांना बाहुला-बाहुलीचा खेळ खेळताना पाहून आश्चर्य वाटले. पण हा आनंद जरा वेळच टिकला. थोडय़ा वेळाने सगळे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. मुलांनी सांगितले की, डाकू आला, मंडप उद्ध्वस्त केला आणि बाहुलीला पळवून घेऊन गेला! खेळणी बदललेली आहेत हेच खरे. असेही असेल की, समाजाने एक पैलू स्वीकारला की परिस्थिती पुढच्या टप्प्यावर जात असेल.- राजीव जोशी, नेरळवैऱ्यांचाच सहवास आहे का?हेरंब कुलकर्णी यांचा ‘निष्पत्ती सात वर्षांच्या धडपडीची’ (४ एप्रिल) हा लेख वाचून हृदयाचं पाणी पाणी झालं. लेखकाच्या प्रयत्नांची माहिती होतीच, पण ‘समस्येला प्रत्यक्ष भिडण्याचं’ वर्णन अंगावर काटा आणणारं आहे. ज्यांच्या अंगाखांद्यावर बिनघोर बागडत मोठं व्हायचं, ती माणसंच मुलीसाठी वैरी झाली. याचा अर्थ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मुलांना जन्माला घालणं आणि अर्थार्जनासाठीचा हात म्हणून वाढवणं ही मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे आणि एकविसाव्या शतकातही त्यातून बाहेर पडता येत नाही हा कटू निष्कर्ष निघतो. यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यांचीच विवंचना करण्यात आयुष्य वेचणाऱ्या आणि आपल्या लहानग्यांनाही तोच वारसा देऊ पाहणाऱ्या वडीलधाऱ्यांच्या विचारांना परिपक्वता आणण्याची प्राथमिकता दिसते. प्रौढ शिक्षणाची गरज खेडोपाडी आवश्यक वाटते. त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणाऱ्या आणि स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणाऱ्या वळूंना वेसण घालण्यासाठी सर्वच प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांच्या स्तरावरून दडपणं आणली गेली पाहिजेत. यासह शहरातल्या मुलांचा व्यसनाधीनतेचा प्रश्न मांडणारा डॉ. हरीश शेट्टी यांचा ‘व्यसनाधीन मुलांना समजून घ्या’ हा लेखही डोकं पोखरणारा होता. इथेही पालकांचं हवं तेव्हा प्रेम, आपुलकी न मिळणं आणि शाळा, कॉलेजपासूनच गळेकापू स्पर्धेचं वातावरण असणं आणि त्या स्पर्धेत पक्षपातीपणामुळे संधी हुकून अपयश मिळणं या कारणांमुळे घरी पालक आणि गुरुजन हे एक प्रकारे ‘हितशत्रू’च होऊन बसतात. ज्या अर्थी आजकालची सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्झ हाताळण्याचं कौशल्य, मुलांनो, तुमच्यात आहे, त्या अर्थी हाडा-मांसाच्या आपल्याच आई-वडिलांना समजून घेण्याचं कौशल्यही आत्मसात करायला वेळ लागू नये. शेवटी टाळी एका हातानं कशी वाजणार?- श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणेयोगोपचारही प्रभावी ठरू शकतो‘पाळीच्या काळातील अस्वस्थता’ हा डॉ. शुभांगी पारकर यांचा (४ एप्रिल) लेख वाचला. त्यानिमित्ताने यावर काही खुलासा करू इच्छितो. मी पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांच्या ‘योग विद्या निकेतन’ या संस्थेत गेली अठ्ठाविस वर्षे योगशिक्षक या नात्याने कार्यरत आहे. पाळीच्या वेदनेवर, आपण वैद्यकीय क्षेत्रातील असल्यामुळे त्यानुसार उपाय सुचवला आहे. मात्र, या काळातील अस्वस्थतेवर काही रुग्णांना योग सरावाचा ‘एक उपचार’ म्हणून प्रभावी उपयोग झाला आहे. योगशास्त्रातील वज्रासन, पवनमुक्तासन, सुलभ उत्तान वक्रासन हे आसन प्रकार, तडागी, सिंह, दत्त-ब्रम्ह आदी मुद्रा प्रकार मन:शांती, तणाव नष्ट करू शकतात.अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम विशेष परिणामकारक आहेत. यानंतर चैतन्यासन(शवासन)अधिक प्रभावी ठरते असा अनुभव आहे. अर्थातच आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. शरीर रचना गुंतागुंतीची असल्यामुळे केवळ एकोपचारावर अवलंबून राहू नये.-अनंत अष्टेकर, गोरेगाव, मुंबई