भारतीय तत्त्वज्ञानाने ‘सारे काही ओम्’ हा सिद्धांत मांडला आहे. या चराचरात जे जे काही दृश्य आहे, अदृश्य आहे ते ते सर्व नादचतन्यमयच आहे, असे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळेच नादचतन्य हा मानवी जीवनाचाही अविभाज्य भाग आहे आणि ते वैज्ञानिकदृष्टय़ा तपासले तरी त्यातील सत्यता पटते. कारण कोणतेही मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते खूप मोठय़ाने रडते, ते रडले नाही तर डॉक्टर मृत किंवा अ‍ॅबनॉर्मल म्हणून घोषित करतात.
 मानवी जीवन हे गतिमान आहे. जोपर्यंत देहमन आवाजवाणीचा नाद चालू आहे, मग तो शब्दबोलाच्या रूपातून असू दे, देहाच्या हालचालीच्या रूपातून असू दे किंवा मनोविचार रूपात असू दे. त्याच्या हृदयाचे कार्य सहज लयबद्ध नादाच्या रूपात रात्रंदिन अविरत चालूच असते. व्यक्ती जेव्हा मृत होते तेव्हा त्याचा आवाज-वाणी-बोल-नाद थांबतो, मनोविचारनाद थांबतो, देहहालचालनाद थांबतो, श्वासोच्छ्वास क्रियेचा नाद थांबतो आणि हृदयाचा व पेशीपेशींचा नादही थांबतो. म्हणूनच मानवी जीवन हे संपूर्णपणे नादमयच आहे.
सारांश – अव्यक्त नादाचे व्यक्त नादात आगमन म्हणजे जन्म, व्यक्त नादाचे सातत्याने प्रवहन म्हणजे जीवन आणि व्यक्त नादाचे अव्यक्त नादात गमन म्हणजे मृत्यू होय. म्हणूनच आपले जीवन सर्वार्थाने समृद्ध करण्यासाठी परमशुद्ध नादसाधना ही जीवनशैलीचा प्रमुख भाग म्हणून अंगीकारणे हे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. पुढील लेखात परमशुद्ध नादचतन्य साधना म्हणजे नेमके काय ते आपण पाहू.