जानेवारी महिन्यात तब्बल ११ चित्रपट प्रदर्शित झाले खरे, पण त्यांनी रसिक प्रेक्षकांचा काहीसा अपेक्षाभंगच केला. आता या महिन्यात येणारे ‘पोश्टर गर्ल’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी’, ‘एक होती राणी’, ‘बाबांची शाळा’ काय करतात ते बघायचं.

‘नटसम्राट’मुळे २०१६ची नांदी जरी चांगली झाली असली तरी पहिल्याच महिन्यातील इतर चित्रपटांनी तशी निराशाच केली म्हणावे लागेल. या महिन्यात तब्बल ११ चित्रपट प्रदर्शित होऊनदेखील काहीसा अपेक्षाभंगच झाला. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टी ही इंडस्ट्री म्हणून विस्कळीत असल्याचे जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

खंडीभर तगडे कलाकार असणारा ‘शासन’चा विषय चांगला होता, पण म्हणावी तशी पकड घेऊ शकला नाही. हाच प्रकार ‘बंध नायलॉन’चे मध्येदेखील दिसून आला. मानवी यंत्रमानव अशा काहीशा वेगळ्या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट विनाकारण इतर कथानकात लांबवून त्याची मज्जाच निघून गेली. ‘फ्रेण्ड्स’ आणि ‘गुरू’ तर थेट दाक्षिणात्यांची री ओढणारेच ठरले. मात्र या दोन चित्रपटांनी लोकप्रियतेच्या या दाक्षिणात्य नाण्याला मराठीत लोकप्रिय करण्याचा काहीसा का होईना यशस्वी प्रयत्न केला. अर्थात आशयघनतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी ते काहीसं घातक आहे.

दुसरा मुद्दा आहे तो व्यावसायिकतेच्या अभावाचा. कसलाही समन्वय नसल्यामुळे जो काही गोंधळ होऊ शकतो तो जानेवारी महिन्यात पाहायला मिळाला. पहिल्या आठवडय़ात ‘नटसम्राट’ हा बजेट, बडे कलाकार, ब्रॅण्ड असं सारं काही असणारा चित्रपट, तर दुसऱ्या आठवडय़ात ‘लॉर्ड ऑफ शनिशिंगणापूर’सारखा तद्दन चित्रपट आला. परिणामी तिसऱ्या आठवडय़ात तब्बल पाच चित्रपटांची वर्णी लागली, तर चौथ्या आठवडय़ात केवळ एकच चित्रपट आणि पुन्हा पाचव्या आठवडय़ात चार चित्रपट अशी विचित्र अवस्था पाहायला मिळाली. तिसऱ्या आठवडय़ात तर तुला न मला घाल कुत्र्याला अशी अवस्था झाली. मात्र त्याच वेळी एकही नवा हिंदी चित्रपट नसल्यामुळे सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्येदेखील मराठी चित्रपटांचेच चारही खेळ दिसून आले. पण एकंदरीतच आपला मर्यादित प्रेक्षकवर्ग पाहता यातून कोणाही एकाला समाधानकारक यश मिळाल्याचे दिसत नाही. तिसऱ्या आठवडय़ात चित्रपटांची गर्दी नको म्हणून ‘अनुराग’ पुढे ढकलण्यात आला. त्याच वेळी ‘फ्रेण्ड्स’ अलीकडे आला. एकटय़ा ‘गुरू’ची फिल्मी गुरगुर ऐकायला लागली.

फेब्रुवारीच्या सुरुवातीस ‘मुंबई टाइम’, ‘मराठी टायगर्स’ आणि ‘पोलीस लाइन’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण त्यातदेखील ‘मुंबई टाइम’ सोडता इतरांनी निराशाच केली. चांगल्या संकल्पनेचे वाटोळं कस करावं हे मराठीत हल्ली वरचेवर दिसून येणारं चित्र ‘मराठी टायगर्स’ने पुन्हा एकदा दाखवलं. ‘मुंबई टाइम’ची संकल्पना बरी असली तरी त्यातून नवीन काहीच हाती आलं नाही. याच आठवडय़ात येणारा ‘अस्तु’ निधीअभावी पुन्हा एकदा पुढे ढकलावा लागला आहे. तर सायफाय ‘फुंतरू’ आता मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.

असो, तर या महिन्यात उरलेल्या तीन आठवडय़ांत ‘पोश्टर गर्ल’ आणि ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी’ या दोन चित्रपटांची चर्चा बरीच झालेली असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. अर्थातच विषय आणि व्यवसाय म्हणूनदेखील.

तुफान हिट झालेल्या समीर पाटील यांच्या ‘पोश्टर बॉईज’ नंतर त्यांच्याच ‘पोश्टर गर्ल’बद्दल बरीच उत्सुकता लागलेली आहे. तिरकस वळणाने जाणारा आणि त्याचबरोबर अनेक धम्माल करामती करणारा ‘पोश्टर गर्ल’ सध्या त्याच्या गाण्यांमुळे आणि ट्रेलरमधून चांगलाच गाजत आहे. पारगाव टोकवडे अशा एखाद्या पार खोपच्यातल्या गावात घडणारी ही कथा. गावात मुलगीच नाही, गावातल्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही, अगदीच लग्न करायचं तर घरजावई बनून दुसऱ्या गावात जायचं. असं काहीसं चित्रविचित्र अशा या गावात पोश्टर गर्ल येते आणि गावातील सारे तरुण एकजात गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होतात. हृषीकेश जोशी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ मेनन आणि रमेश सुरेश जोडगोळीतले अक्षय टंकसाळे-संदीप पाठक अशी ही सारी वरात पोश्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या मागे लागलेली आहे. ट्रेलर, टीझरवरून तर चित्रपटाचा बाज एकंदरीतच फुल टू धिंगाणा असाच आहे. सोनालीच्या अदांनी त्यात भरच घातलेली आहे. क्षितिज पटवर्धनची गाणी, आनंद शिंदेंच्या आवाजातील ‘आवाज वाढव डिजे तुला..’ असं बरंच काही आकर्षण यात दिसतंय. अर्थात कथानकातील अनेक गोष्टी सध्या तरी उघड केलेल्या नाहीत.

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर येणारा ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी’ हा आशीष वाघ यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’मुळे मागच्या वर्षीची हिट जोडी प्रार्थना बेहेरे आणि वैभव तत्त्ववादी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. अर्थात कॉफीचा फंडा येथे नसेल. या जोडीने एकदम यू टर्न घेतला असून रोमॅण्टिक आणि अ‍ॅक्शन असं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. डॅशिंग भूमिकांसाठी फारसा प्रसिद्ध नसलेला वैभव तत्त्ववादी एकदम वेगळ्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाला आणखी एका गोष्टीची जोड दिलीय ती मराठी अस्मितेची. वैभवच्या दंडावरील शिवाजी महाराजांचा टॅटू आणि जगदंब हे शिवरायांवरील गाणं हे तरुणाईला चांगलंच आकर्षून घेताना दिसत आहे. मराठी चित्रपटातील मॉरिशसमधील चित्रीकरण हादेखील एक आकर्षणाचा भाग यात आहे.

या दोघांव्यतिरिक्त आणखीन चार चित्रपट या महिन्यात आपल्या भेटीला येणार आहेत. १२ फेब्रुवारीला ‘विघ्नहर्ता महागणपती’ हा सत्यकथेवर आधारित धार्मिक अंगाने जाणारा आहे. ३१४ वर्षांची परंपरा असलेले खवळे कुटुंब देवगड येथील तारामुंब्री या गावातले आहेत. कान्होजी आंग्रेंच्या सरदारांनी स्थापन केलेल्या खवळे कुटुंबातील गणपती आणि त्या कुटुंबाची कथा पाहायला मिळेल. २१ दिवसांचा गणपती, त्याला पहिल्या तीन दिवसांत दिले जाणारे वेगवेगळे रंग असं धार्मिक माहोल यात आहे. गणपतीचे धार्मिक माहात्म्य यात पाहायला मिळेल.

एक होता राजा अशी गोष्ट ऐकायची सवय असणाऱ्या आपणाला आता ‘एक होती राणी’ची गोष्ट पाहायला मिळणार आहे. अनिकेत विश्वासराव आणि मीनल घोरपडे यांच्या अनपेक्षितरीत्या जुळलेल्या गाठी आणि त्याचा प्रवास यात मांडला आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात झाले असून निसर्गरम्य पाश्र्वभूमीवरचा हा चित्रपट १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

मराठीतील आशयाचे वैविध्य जोपासणारा २६ फेब्रुवारीला येणारा एक वेगळा चित्रपट म्हणजे ‘बाबांची शाळा’. रागाच्या भरात केलेले गुन्हेगारी कृत्य, त्यातून झालेली शिक्षा, पश्चात्ताप आणि त्यामुळे होणारी कुटुंबाची फरफट, त्यातून सुधारू पाहणाऱ्या कुटुंबाला सामावून घेण्याची गरज असा काहीसा सामाजिक बाज असलेला हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारित आहे. सयाजी शिंदे, शशांक शेंडे, ऐश्वर्या नारकर, कमलेश सावंत, छाया कदम या कलाकारांच्या भूमिकेमुळे चित्रपटाबद्दल अपेक्षा करायला हरकत नाही.

सध्या तरी फेब्रुवारीची मजल इतपतच आहे. मार्चमध्ये येणारे ‘अनुराग’ आणि ‘फुंतरू’ काय करतात हे पाहण्यासारखे आहे. १२ डिसेंबरपासून प्रदर्शनासाठी तयार असलेला गोपीनाथ मुंडेंच्या जीवनावरील संघर्षयात्रा या महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

जाता जाता – नागराज मंजुळेच्या सैराटची उत्सुकता लवकरच शमण्याची चिन्हं दिसत आहेत. मार्चच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे कळते.
सुहास जोशी
response.lokprabha@expressindia.com, twitter –  @joshisuhas2