आयुष्यात जे होणार असते ते टाळता येत नाही असे म्हटले जाते. मग ही बाब लग्नसंबंधातल्या विसंवादातून होणाऱ्या घटस्फोटांबाबतही खरी असते का? की ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन घटस्फोट टाळता येतात?

आजकाल समाजात कुठेही पाहिले तरी एक प्रश्न प्रकर्षांने जाणवतो तो म्हणजे ‘लग्न करायचे ते टिकवण्यासाठी की चार दिवसांची नवलाई संपल्यानंतर मोडण्यासाठी?’ त्यातही अलीकडच्या काळात हे प्रमाण भयावह अवस्थेपर्यंत गेले आहे. समजा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास कधी जाणवला नसेल आणि हौस म्हणून ‘डोके दुखणे म्हणजे काय होत असते’ हे पाहायचे असेल तर कोणत्याही कुटुंब न्यायालयात एखाद्या कोपऱ्यात दिवसभर बसून राहा. काही बोलायचे नाही. फक्त कान आणि डोळे उघडे ठेवा. किती किरकोळ व क्षुल्लक कारणांवरून तिथे वाद वाढलेले दिसतात ते पाहून घरी आल्यावर तुमचे डोके दुखले नाही तर खऱ्या अर्थाने आपण ‘असहिष्णू’ आहात असे समजावे लागेल.
मागच्या महिन्यात एका मित्राकडे गेलो. कामाची बोलणी झाल्यावर शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. वहिनींची थट्टा करणे आणि त्या दोघांमधले ‘थोडे लावून देणे’ हा माझा आवडता उद्योग गेली दोन-तीन वर्षे होता. मध्यंतरी वर्षभराचा काळ लोटल्यानंतर आम्ही भेटत होतो. बराच वेळ घरात वहिनी दिसत नाहीत म्हटल्यावर त्याला विचारले ‘‘काय रे, वहिनी माहेरी गेल्या आहेत का काय?’’ ह्य प्रश्नावर त्याचे आलेले त्याचे उत्तर मोठा बॉम्बगोळा होता. त्याने सांगितले ‘‘आम्ही सध्या नोटीस पीरियडवर आहोत. ‘‘साधारण पुढील महिन्यात घटस्फोटाची ऑर्डर होईल.’’
काय विशेष आहे पाहा, त्यांचा होता प्रेमविवाह. लग्नाअगोदर तीन-चार वर्षे आम्हा मित्रांच्या भाषेत ‘प्रकरण’ चालू होतं. म्हणजे लग्नाअगोदरची चार र्वष एकमेकांना समजून घेऊ शकले नाहीत म्हणे. लग्नानंतरच्या पाच-सहा महिन्यांतच तीव्र मतभेद सुरू झाले. ह्यला प्रेमविवाह तरी कसे म्हणावे हादेखील प्रश्न आहे.
आजकाल विभक्त कुटुंबामुळे घरात मोठे कोणी नसते त्यामुळे कोणत्याही वादांमध्ये त्रयस्थांची जशी मध्यस्थी असते तो भागच संपला आहे. मुले बिचारी आईबापांकडे हताश होऊन बघत असतात.
नवरा-बायकोमध्ये वाद होण्याची कितीतरी कारणे आहेत. त्यातली ठळक कारणे मला वाटतात ती पुढीलप्रमाणे.
संवाद : खरे तर आमच्या अगोदरच्या पिढीच्या मानाने आमच्या पिढीतला संवाद हा वाढलेला आहे. म्हणजे असे की एखाद्या घरात समजा चौघे जण आहेत. आईबाबा, मुलगा व मुलगी तर हे चौघेही बोलत असतात. अगदी दिवसभर बडबड चालू असते. पण प्रत्येक जण घरात थांबून मोबाइलवरून बाहेरच्या कोणाशी तरी बोलत असतो. एकंदरीत काय तर घरातला आपापसातला संवाद संपलेला आहे. मुळात सगळे जण (कदाचित) जेवणापुरते एकत्र बसलेले असतात. पण लक्ष मात्र असते टीव्हीकडे.
ह्यचा परिणाम म्हणजे आपले मन मोकळे करायला कोणती जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे अन्यही अनेक विकार विवाहित जोडप्यांमध्ये बळावत चालले आहेत.
त्याग : विवाह हीच मुळी एक तडजोड असते. आणि तडजोड म्हणजे त्याग. एखादी गोष्ट आवडत असून न करणे किंवा न आवडणारी गोष्ट करावी लागणे अशा तडजोडी आपण जीवनाच्या अन्य अनेक क्षेत्रांत करीत असतो. त्यातल्या त्यात नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी तर किती तरी तडजोड करत असतो, मग वैवाहिक जीवनात का तडजोड नको असा प्रश्न स्वत:ला कोणी विचारत नाही. केवळ माझे शिक्षण, माझा पगार, माझे करिअर, माझा फ्लॅट.. सगळे काही माझे माझे ‘आपले’ असे काहीच नाही. आपले आयुष्य स्वत:पेक्षा इतरांसाठीही असते हे आजकाल कोणी कोणाला शिकवत नाही असेच दिसते.
ही कारणांची यादी कितीही वाढवता येईल. एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, आवडीनिवडी, एकमेकांना समजून न घेणे, कामजीवनातील काही प्रश्न, वैचारिक मतभेद अशी भली मोठी यादी मांडून त्यावर विचार करता येईल.
प्रश्न पडतो तो म्हणजे घटस्फोट टाळता येतात का? मी स्वत: ज्योतिषशास्त्राचा एक विद्यार्थी. पत्रिकेवरून घटस्फोट होईल का, किंवा टाळता येईल का ह्य प्रश्नाचे थेट उत्तर मिळणे अवघड असते. कारण घटस्फोट ह्या घटनेकडे मी वेगळ्या नजरेने बघतो.
टाळता काय येते याचा विचार केला तर लक्षात येते की एखादी प्रक्रिया चालू असेल तर मध्ये थांबवता येते, दुरुस्त करता येते किंबहुना योग्य मार्गाने पुन्हा पुढे चालू करता येते. याउलट अपघात होतो तो मात्र त्या क्षणाला टाळणे जवळजवळ अशक्य असते. दोन गाडय़ा समोरासमोरून वेगात आलेल्या आहेत. त्यातील एकाचे किंवा दोघांचेही नियंत्रण सुटले असेल तर काय टाळणार? फार तर तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होईल, पण नुकसान तर ठरलेलेच.
या विचारांच्या ओघात घटस्फोट ह्य घटनेकडे पाहाल तर लक्षात येईल की अजून तरी आपल्याकडे लग्न झाले आणि दोन-तीन दिवसांत घटस्फोट झाला असे होत नाही. लग्न होते. दोन-चार महिने एकमेकांचा अंदाज घेण्यात जातात आणि मग काही योग्य वाटले नाही तर दरी वाढत जाते आणि मग दोघांचे निर्णय होऊ लागतात. याचा अर्थ घस्फोट हा अपघात नसतो तर ती असते एक प्रक्रिया. मग हे आपण कसे टाळू शकतो?
ज्योतिषशास्त्राच्या माध्यामातून व्यक्तीची स्वभाववैशिष्टय़े बऱ्यापैकी समजू शकतात. एखाद्या बऱ्यावाईट प्रसंगात ती व्यक्ती कशी व्यक्त होत असेल किंवा तिची कशी प्रतिक्रिया असेल हेही समजते. त्यामुळे दोघांनाही कोणत्या प्रकारची तडजोड करावी लागेल हे सांगता येते. ह्यचा अर्थ योग्य अशा समुपदेशातून ही बाब दोघांच्या लक्षात आणून देता येते.
चाणाक्ष वाचकांच्या हे नक्की लक्षात आले असेल की हे अजूनही लग्न टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंचे लोक ज्योतिषांकडे जात असतात आणि विशेषत: नवरा-बायकोच्या वादामध्ये जो ज्योतिषी ‘चांगला श्रोता’ असतो त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात. कारण हेच की अनेक जण आपले मन मोकळे करण्यासाठी अशा तज्ज्ञांची मदत घेत असतात. म्हणून कोणत्याही ज्योतिषाने असा प्रश्नांमध्ये सकारात्मक व निरपेक्ष भूमिका घेतल्यास त्या उभयंतामधील दरी कमी होण्यास नक्की मदत होते.
आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशुभ काळ येत असतो. कधी तो नोकरी-व्यवसायांत असतो, कधी आरोग्याच्या बाबतीत तर कधी अशा नातेसंबंधांत असतो. नातेसंबंधांत येणाऱ्या अशा अशुभ काळात त्यांना तात्पुरते विभक्त व्हायला सांगता येते. याचा अर्थ दोघांनी दोन वेगवेगळी घरे करणे असा नाही तर प्रसंगानुरूप ह्यचे मार्ग देतात येतात, ते दोघांना विश्वासात घेऊन सांगावे लागतात, जसे की त्या मुलीला काही दिवस माहेरपणासाठी जायला सांगणे, कोणाला नोकरीत बदली होऊन अन्य ठिकाणी जायला सांगणे अथवा एखादा नवीन विषय शिकण्याच्या निमित्ताने दुसऱ्या गावातील एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे. याचा अर्थ एवढाच की भांडय़ाला भांडे न लागण्यासाठी दोन्ही भांडी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे.
हा अशुभ काळ अशा पद्धतीने घालवल्यास त्यांच्यातील प्रेम लांबून का होईना टिकतेच, शिवाय पुढील अनर्थ टाळता येतात. ह्यशिवाय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ह्य प्रश्नासाठी अनेक उपाय सांगता येतात. त्यांचा उपयोगही होतो. त्या दोघांची किंवा त्यांच्यापैकी कोणाही एकाची तरी लग्न टिकवण्याची तीव्र इच्छा असेल तर आणि तरच हे उपाय लागू पडतात.
चला तर, वादविवादात फसलेल्या व फसत चाललेल्या सर्व जोडप्यांना मनापासून शुभेच्छा-
response.lokprabha@expressindia.com

Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान