नऊ फेब्रुवारीपासून जेएनयू धगधगतं आहे. घोषणा, निदर्शनं, वाद, चर्चा, मतमतांतरं, हाणामारी, अटक, भाषणं या सगळ्यांमुळे जगातल्या सगळ्यात मोठय़ा लोकशाहीचं मिनिएचर रुपच तिथे अवतरलं आहे. या सगळ्या वातावरणाकडे तिथले बाकीचे विद्यार्थी नेमकं कसं पहाताहेत? जेएनयूत शिकणाऱ्या एका मराठी विद्यार्थ्यांने लिहिलेला जेएनयूमधल्या वातावरणाचा हा आँखेदेखा रिपोर्ताज..

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयू ही देशातली एक महत्त्वाची संस्था. सामाजिक शास्त्रे तसेच आंतरराष्ट्रीय संबंध या दोन विषयांशी संबंधित संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले हे विद्यापीठ गेला महिनाभर देशातल्या सर्व प्रसारमाध्यमांचे मथळे व्यापते आहे, ते अगदी चुकीच्या कारणांसाठी. जेएनयूबद्दल जेएनयूबाहेर, म्हणजेच समाजात ‘या विद्यापीठात देशद्रोही घटकांना बौद्धिक खतपाणी घातले जाते,’ अशीच नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर एमफील करत असलेला विद्यार्थी या नात्याने इथे गेल्या काही दिवसात नेमकं काय काय घडलं ते सांगणं आणि जेएनयूबद्दल निर्माण झालेले मळभ दूर करण्याचा प्रयत्न करणं ही इथला विद्यार्थी या नात्याने माझी जबाबदारी आहे, असं मला वाटतं, म्हणून हा लेखप्रपंच.

Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
student preparing for JEE exam
झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल

या लेखात मी गेल्या काही दिवसांमध्ये जेएनयूमध्ये काय काय घडलं ते घटनानुक्रमानुसार देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते करतानाच राजकीय पक्ष आणि नेते मंडळी ही,  लोकांची मतं कशी तयार करतात, कशी घडवतात, जेएनयूच्या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनांवर कसा थेट प्रभाव टाकला हे सगळं मलाही शिकायला मिळालं.

मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी. तिथे पदव्युत्तर पदवी घेईपर्यंत मला विद्यापीठातील राजकारणाच्या गुंतागुंतीची फारशी कधी जाणीवही झाली नव्हती. या राजकारणाची मला कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धगही लागली नव्हती. त्यामुळे ऑगस्ट २०१५ मध्ये ऐन कॅम्पस निवडणुकांच्या धामधुमीतच मी इथे येऊन दाखल झालो तेव्हा जेएनयूमधलं वातावरण बघून मला एकीकडे मोठा धक्का बसला, तर दुसरीकडे त्या सगळ्याबद्दल अतिशय उत्सुकताही वाटली. कॅम्पस निवडणुका आणि होळी या जेएनयूमधल्या दोन मोठय़ा आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे मला नंतर कळलं. सहा-सात विद्यार्थी संघटनांमध्ये ही निवडणूक होते आणि अध्यक्ष निवडला जातो. तरुण, अंतर्मुख आणि सोबत एआयएसएफचे (ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन) अगदी थोडे पाठीराखे असलेल्या कन्हैया कुमारला इथे मी पहिल्यांदा बघितलं. एआयएसएफ ही सीपीआय (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)ची विद्यार्थी शाखा. जेएनयूच्या कॅम्पसमध्ये तिची दखल घेतली जावी असा तिचा फारसा प्रभाव नाही. आता जेएनयूमध्ये बऱ्यापैकी दिवस घालवल्यानंतर आणि अनेक गोष्टी प्रत्यक्षात अनुभवल्यानंतर कन्हैया कुमारचं राजकारण म्हणजे अलंकारिक भाषेतल्या दाव्यांशिवाय दुसरं काहीही नाही असं माझं मत बनलं आहे. खरं तर ज्या भाषणामुळे तो निवडला गेला त्या त्याच्या अध्यक्षीय भाषणापासून ते त्याला जामीन मिळाल्यांनंतर त्याने जे भाषण केलं, जे भाषण सगळ्या देशाने डोक्यावर घेतलं त्या भाषणापर्यंत एक आवर्तनच पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. त्याची वेगवेगळी भाषणं मी आजपर्यंत ऐकली आहेत. त्याच्या या भाषणांमधून मला नेमकं काय जाणवलं? एक तर त्याच्याकडे उत्कृष्ट वक्तृत्व आहे. त्याची भाषेवर चांगली पकड आहे. त्याच्या या दोन गोष्टी प्रभावी, ऐकणाऱ्याची पकड घेणाऱ्या असल्या तरी त्याच्या भाषणात अनुभवसिद्ध तपशील अतिशय कमी असतात किंवा फारसे नसतातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरच्या त्याच्या भूमिका संदिग्ध असतात. किंवा खूपदा त्याची काही भूमिकाच नसते. हे मुद्दे लक्षात घेऊनही विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या, आपल्या बाजूला वळवून घेण्याच्या त्याच्या क्षमतेविषयी कुणाच्याही मनात कसल्याही शंका नाहीत, मग ती जेएनयूमधली निवडणूक असो की त्याची स्वत:ची अटक असो.

जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी रोजी सगळ्या देशाला अवाक करणाऱ्या ज्या धक्कादायक घटना घडल्या त्यांच्याबद्दल सांगण्यापूर्वी कन्हैया आणि त्याचं राजकारण याबद्दल माझं मत काय आहे, हे सांगणं मला आवश्यक आणि महत्त्वाचं वाटलं म्हणून आधी ही सगळी माहिती मी दिली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अफजल गुरूचा हुतात्मा दिन साजरा करण्यासारख्या घटना जेएनयूमध्ये या वेळी पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा गोष्टी गेली काही वर्षे सातत्याने, नियमितपणे घडत आहेत. वास्तविक २०१० रोजी काश्मीरमध्ये दांतेवाडा इथे जो दहशतवादी हल्ला झाला, त्यात सीआरपीएफचे ७६ जवान मारले गेले. ही घटना साजरी करणाऱ्या राजकीय संघटनांची संख्याही त्या शहीद जवानांच्या संख्येएवढीच होती.  पण ही गोष्ट घडलीच असं मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण त्या काळात मी इथे नव्हतो. तसं घडल्याचे कोणतेच पुरावे माझ्याकडे नाहीत. असं घडलं हे मी इतरांकडून ऐकलं मात्र आहे.

नऊ फेब्रुवारी २०१६ हा आमच्यासारख्या इथे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातला नेहमीसारखाच एक दिवस. नेहमीसारखं होस्टेलहून गं्रथालयात जायचं, अभ्यास करून परत यायचं हा नेहमीचा दिनक्रम. त्यानुसार मी होस्टेलवर चाललो होतो. तेव्हा साबरमती ढाब्यावर (जेएनयूमधील एक मध्यवर्ती ठिकाण) आज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे असं मला कुणी तरी सांगितलं. तेवढय़ात इथे वावरल्यामुळे आोळखीचे झालेले अभाविपचे काही जण मला रस्त्यात भेटले. त्यांनी मला सांगितलं की संध्याकाळी फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर अफजल गुरूशी संबंधित काही तरी फालतू कार्यक्रम आहे. तुम्हाला माहीतच असेल की ९ फेब्रुवारी याच दिवशी अफजल गुरूला फाशी दिली गेली होती. मीही काय कार्यक्रम आहे, तो बघू या तरी असा विचार करून माझ्या होस्टेलवर गेलो. वाटेत काही विद्यार्थी ‘द कन्ट्री विदाऊट पोस्ट ऑफिस’ या विषयावरची माहितीपत्रकं वाटत होते.  या शीर्षकाबद्दलचं स्पष्टीकरण मी या लेखात नंतरच्या भागात दिलं आहे.  संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथे बरेच ओळखीचे चेहरे होते तसेच बरेच अनोळखी चेहरेही होते. बरेच विद्यार्थी शिट्टय़ा वाजवत होते. आसपास सुरक्षारक्षकही होते. वेगवेगळे फलक लावलेले होते. व्यंगचित्रं लटकवलेली होती. त्यात भारत देश हा वसाहतवादी दाखवला होता आणि काश्मीर ही भारताची वसाहत आहे असं दाखवलं होते. हे धक्कादायक होते, पण त्याहूनही मोठा आणि खरा धक्का त्यानंतरच बसला. कारण नंतर ‘अफजल हम शर्मिदा है, तेरे कातिल जिंदा है’, ‘हर घर से अफजल निकलेगा’, ‘डाऊन डाऊन इंडियन स्टेट’, ‘भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाल्लाह इन शालाह’, ‘भारत तेरे बरबादी तर जंग रहेगी’ अशा घोषणा दिल्या गेल्या. पण मला ही गोष्ट स्पष्ट केलीच पाहिजे की तिथे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा मी ऐकल्या नाहीत. माझ्यासारखेच काय चाललं आहे हे बघायला आलेले इतर जणही या घोषणा ऐकून अवाक झाले. आम्हाला खरोखरच धक्का बसला. अभाविपचे समर्थकही तिथे जमले होते आणि ते या घटनांविरोधात घोषणा देत होते. भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यावर अभाविपच्या समर्थकांनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. तिथेच त्या दोघांमध्ये हाणामारी झाली. इथे मला एक गोष्ट स्पष्ट केलीच पाहिजे की, मी कन्हैयाकुमारला (अध्यक्ष) आणि राम नागला (महासचिव) त्या ठिकाणी बघितलं. ते दोघंही मोर्चापुढे भाषण देत होते. पण त्या दोघांचीही भाषणं २०१४ नंतरच्या फॅसिझमबाबत सरकारवर टीका करणारी होती. कन्हैयाने देशविरोधी घोषणा दिलेल्या मी तरी ऐकल्या नाहीत. पण त्याबरोबर कन्हैयाने या दोन्ही गटांमधला वाद संपवण्याचा, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, हे पूर्ण चुकीचं आहे. असं काहीही घडलं नाही. उलट मी तर असं म्हणेन की मी त्याचं तेव्हा जे भाषण ऐकलं ते उचकवणारं होतं.

वास्तविक जेएनयूमधलं वातावरण नेहमीच कोणत्याही विषयावर घमासान चर्चा घडवून आणणारं, विचारमंथन घडवून आणणारं आहे. हातात चहाचा कप घेऊन इथे सतत चर्चा आणि चर्चा सुरू असतात. मग ती वेळ दुपारच्या जेवणाची असो की रात्रीच्या. अगदी रात्री उशिरापर्यंतही इथे विद्यार्थी चहा पीत वाद घालत बसलेले असतात. या रिवाजानुसार त्या दिवशी या सगळ्या घटनांवरून खूप चर्चा झाली, पण जेएनयूच्या कॅम्पसमध्ये जे झालं ते चुकीचं होतं या मुद्दय़ावर बहुतेक जण सहमत होते. माझ्या मेसमधले काही विद्यार्थी जेवताना या विषयावर चर्चा करताना म्हणाले की, हे चुकीचं आहे; पण आज हा लेख लिहीत असताना याच सगळ्या विद्यार्थ्यांचं मतपरिवर्तन झालेलं मी बघतो आहे. आता हे सगळे विद्यार्थी कन्हैयाच्या बाजूने झाले आहेत. त्यांना आता कन्हैयाबद्दल सहानुभूती वाटते आहे. जेएनयूच्या कॅम्पसमध्ये त्या दिवशी जे झालं ते चुकीचं होतं या मुद्दय़ापासून बहुसंख्य विद्यार्थी आता कन्हैयाला सरकारने बळीचा बकरा केलं, इथे भाषणस्वातंत्र्य, मतं सरकार कशी चिरडून टाकतं या मतापर्यंत आले आहेत. घोषणांबाबतची चर्चा आता कन्हैया प्रकरणाबाबत वकिलांनी धक्काबुक्की करणं कसं चुकीचं होतं, कन्हैयाला आलेल्या धमक्या या विषयांकडे वळली आहे. यामागचं एक मुख्य कारण आहे, सरकार. सरकारने हा संवेदनशील प्रश्न अतिशय निष्काळजीपणे हाताळला. या सगळ्यातून कन्हैया विनाकारण हिरो झाला.

17-lp-kanhaiyaa

जेएनयूबाहेर काय झालं यावर आतापर्यंत बराच प्रकाश टाकला गेला आहे. त्यामुळे माझा मुख्य रोख तिथे आत काय घडलं यावर आहे. जेएनयूमध्ये रोजच वेगवेगळ्या विषयांवर, प्रश्नांवर वेगवेगळी निदर्शनं होत असतात. तो जोएनयूच्या संस्कृतीचाच भाग आहे म्हणा ना! त्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडणारी माहितीपत्रकं वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना प्रसिद्ध करत असतात. स्टुडण्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष), ऑल इंडिया स्टुडण्ट्स असोसिएशन (मार्क्‍सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष), बीरसा आंबेडकर फुले स्टुडण्ट्स असोसिएशन यांनी या सगळ्या प्रकरणावर अतिशय चतुर, चलाख अशा भूमिका घेतल्या. त्यांनी आपल्या भूमिकांमधून असं सूचित केलं की, ते अशा घोषणा देणाऱ्यांना पाठीशी घालत नाहीत, घालणार नाहीत, पण सरकार जे करतं आहे, तेही तितकंच चुकीचं आहे.

इथे म्हणजे देशविरोधी घोषणाबाजीच्या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करून त्यावरच ठाम न राहण्याची चूक अभाविपने केली आणि हा सगळा वाद देशविरोधी घोषणांवरून सरकारचा अत्याचार आणि कन्हैयाचा बळी या विषयांवर वळवला गेला. त्यात कन्हैया बळीचा बकरा ठरला. राहुल गांधी आणि इतरही नेत्यांनी जेएनयू कॅम्पसला भेट दिल्यानंतर तर ही मतंमतांतरं अधिकच दृढ होत गेली. या सगळ्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात डाव्या संघटना आघाडीवर राहिल्या. त्यानी एकत्र येऊन राष्ट्रवादावर सार्वजनिक भाषणं आयोजित केली, मानवी साखळ्या आयोजित केल्या. या सगळ्याला त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. अभाविपनेही या सगळ्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ना लोकांना गोळा करता आलं, ना विद्याथ्यांच्या मतांवर प्रभाव टाकता आला. हे सगळं डाव्यांनी एकत्र येऊन केलं.

या सगळ्यामध्ये कन्हैयाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला जाणं आवश्यक आहे. अटक होण्यापूर्वी त्याने सरकारवर टीका करणारं, एरएसएसपासून , जातीवादापासून, महागाईपासून, वर्गभेदापासून आणि अशा अनेक गोष्टींपासून आपल्याला कसं स्वातंत्र्य हवं आहे अशा आशयाचं भाषण केलं. हे भाषण त्याने ११ फेब्रुवारी रोजी केलं होतं. आणि ते समाजमाध्यमांमधून व्हायरल झालं होतं. त्याच्याबद्दलचं वाढतं नकारात्मक वातावरण लक्षात घेऊन त्या वातावरणातला विखार कमी करण्यासाठी हमखास उपयोग होईल, ते गेम चेंजर ठरेल म्हणून त्याचं हे भाषण जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आलं होतं. ‘द कंन्ट्री विदाऊट पोस्ट ऑफिस’ या शीर्षकाचा मी आधी उल्लेख केला आहे, त्याचा संदर्भ आता मी इथे देतो. अफजल गुरुला ९ फेब्रुवारी रोजी फाशी दिली गेली. या फाशीची माहिती त्याच्या कुटुंबाला स्पीड पोस्टने ८ फेब्रुवारी रोजी कळवली गेली. ती त्यांना मिळाली ती ११ फेब्रुवारी रोजी. म्हणजे त्याच्या फाशीनंतर तब्बल ५१ तासांनी. ९ फेब्रुवारीला कन्हैया ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता, त्या कार्यक्रमाचा आणि ११ फेब्रुवारी रोजी त्याचं जे भाषण व्हायरल केलं गेलं त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. याचाच अर्थ त्याला वाचवण्यासाठीच हे सगळे प्रयत्न नंतर जाणीवपूर्वक केले गेले.

जेएनयू टीचर्स असोसिएशनने (जेएनयूटीए) या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ती अनेकांनी लक्षातच घेतलेली नाही. या संघटनेने कन्हैयाच्या सुटकेबरोबरच कार्यक्रमाचे संघटक म्हणून पोलिसांनी ज्या विद्यार्थ्यांवर जे आरोप ठेवले आहेत, ते सगळे मागे घेतले जावेत अशीही मागणी केली. यामध्ये अर्थातच उमर खालिद आणि अनिब्रन भट्टाचार्य हेसुद्धा आले. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलीस शाोधत होते म्हणून जे आठ विद्यार्थी भूमिगत झाले होते, ते एक दिवस अचानकपणे जेएनयूच्या कॅम्पसमध्ये अवतरले. वेगवेगळ्या डाव्या संघटना, एनएसयूआय (नॅशनल स्टुडण्ट्स युनियन ऑफ इंडिया- काँग्रेस) यांच्या अशा धोरणांमुळे, क्लृप्त्यांमुळे वातावरणातली अनिश्चितता खूप वाढली. अभाविपला आपली भूमिका नीट स्पष्ट करता आली नाही. सरकारने तर हे प्रकरण इतक्या वाईट पद्धतीने हाताळलं की ते अधिकच चिघळत गेलं. हे सगळं घडलं त्या दिवशी म्हणजे घोषणा दिल्या गेल्या त्या दिवशी रात्री मी मेसमध्ये ज्या विद्याथ्यरंशी बोललो होतो, (त्याचा उल्लेख सुरुवातीला आला आहे) त्या सगळ्यांचं आता असं मत झालं आहे की हे भाषण स्वातंत्र्यावर घाला घालणारं हे अतिशय कठोर सरकार आहे. डाव्यांची निदर्शनं, पोस्टर्स, सार्वजनिक चर्चा या सगळ्या उत्तम आणि जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे एका साध्या गोष्टीचे एका मोठय़ा प्रश्नात रुपांतर झाले आहे. आणि देशविरोधी घोषणांचा मोठा मुद्दा बाजूलाच पडला आहे. कन्हैयाला देशभर प्रसिद्धी मिळून तो अचानकपणे मोठा विद्यार्थी नेता झाला आहे. मोदी सरकारविरोधात जणू छातीचा कोट करून लढणारा एकमेव लढवय्या अशी स्तुतीसुमनं त्याच्यावर उधळली जात आहेत. जेएनयूच्या कॅम्पसमध्येही त्याच्या कौतुकाचे वारे वहात आहेत. या सगळ्यामध्ये सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हा जो सगळा अनुभव जेएनयूमध्ये मिळाला तो मुंबईमध्ये कधीच मिळाला नसता. माझ्यासारख्याच देशभरातल्या अनेक विद्यार्थ्यांना आमच्या अभ्यासाबरोबरच खरंखुरं राजकारण काय असतं याचा जिवंत अनुभव घेण्याची, त्यातली गुंतागुंत समजून घेण्याची, अभ्यासण्याची चांगली संधी कन्हैया प्रकरणामुळे मिळाली. जेएनयूमध्ये एकावेळी जवळपास आठ हजारांहून अधिक विद्यार्थी शिकतात. इथे सामाजिक शास्रांमधल्या सिद्धांतावर जास्त भर दिला जात असतो. अशा वातावरणात आम्हाला या सिद्धांताबरोबरच प्रत्यक्ष परिस्थितीचा, बदलत्या मतमतांतरांचा अभ्यास करायचा प्रॅक्टिकल अनुभव मिळाला. या सगळ्याच्या मतमतांतरात न पडता मला एवढंच माहीत आहे की मी देशाला हलवून सोडणाऱ्या एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरलो आहे. विद्यार्थ्यांच्या पातळीवर राष्ट्रीयदृष्टय़ा फारशा कृतीशिल नसलेल्या मुंबई-महाराष्ट्राच्या वातावरणातून तिथे गेल्यामुळे सगळ्या देशाला अचंबित करणारं, अवाक करणारं हे सगळं प्रकरण माझ्यासाठीही तेवढंच अचंबित करणारं ठरलं.
सुयश देसाई
अनुवाद : वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com