पावसाळा सुरू झाला की जलजन्य आणि कीटकजन्य आजारांच्या रुग्णांध्ये मोठी वाढ होते. वातावरणातील बदलाबरोबरच याला कारणीभूत आहे, वाढतं शहरीकरण. त्यामागोमाग येणारी अस्वच्छता. ‘स्वच्छ भारता’चा नारा देताना आपण आपल्या अस्वच्छतेच्या सवयी बदलणं अत्यावश्यक आहे.

मध्यपूर्वेतील येमेन या अवघ्या अडीच कोटी लोकसंख्येच्या देशात मागील तीन महिन्यांपासून कॉलराने थमान घातले आहे. या टीचभर देशात जवळपास पावणेचार लाख जणांना कॉलराची लागण झाली असून त्यात जवळपास दोन हजार जणांचा बळी गेला आहे. आजवरच्या मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा कॉलरा उद्रेक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. कॉलरासारख्या आजाराने २१ व्या शतकात एवढा हाहाकार माजवावा, हे आश्चर्यकारक आहे. १८५४ मध्ये जॉन स्नोच्या प्रयत्नाने कॉलरा प्रसार कसा होतो आणि कॉलरा प्रतिबंधाकरता काय करायला हवे, हे आपल्या ध्यानात आले. स्नोनंतर दीडशे वर्षांनीही असे होणार असेल तर काय म्हणावे? पण येमेनमधील कॉलरा उद्रेकाला राजकीय कारणे आहेत. सध्या या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. सौदी नेतृत्वाखालील सन्याने येमेनवर हल्ला केला आहे. नागरी भागात बॉम्बवर्षांव होताहेत, अन्न-पाण्याचा मोठा तुटवडा लोकांना सहन करावा लागतोय, अशा अवस्थेत सहज आवरता येणारा कॉलरा अनावर झाला आहे. अशा वेळी ‘मेडिसिन इज अ सोशल सायन्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स इज नथिंग बट मेडिसिन ऑन लार्ज स्केल’ हे रुडाल्फ विरचोचे विधान आठवते. आपल्याला अनेकदा युद्धाची खुमखुमी येते आणि युद्धाच्या पोटात किती भयंकर साथी लपलेल्या असतात, हे आपण विसरून जातो.

‘इसलिए ऐ शरीफ इन्सानो,
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभी के आँगन में
शमा जलती रहे तो बेहतर है’

साहिरच्या या शब्दांचे अर्थही आपल्याला कळेनासे होतात. आंतरराष्ट्रीय दळणवळण प्रचंड वाढलेल्या या काळात जीवाणू आणि विषाणूदेखील आपल्याच सोबत विमानमाग्रे वेगवेगळ्या देशांत पोहोचू शकतात आणि एका देशातील साथ जगभरासाठी महामारी ठरू शकते,  हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. येमेनमध्ये कॉलरा पेटलेला असताना डोकलाममध्ये आपली कुरापत काढू पाहणाऱ्या चीनमध्ये इन्फ्लुएंझा ए एच7 एन9 या विषाणूच्या सहा नवीन केसेस आढळल्या आहेत, तर मलेरियाला ‘चले जाव’ म्हणणाऱ्या शेजारच्या श्रीलंकेत डेंग्यूच्या तब्बल ८० हजारांहून अधिक केसेस आढळल्या असून २१५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  मागील वर्षांत युरोपात गोवरसारख्या लसीकरणाने पूर्णपणे टाळता येणाऱ्या आजाराने ३५ जणांचा बळी घेतला आहे.

‘संसर्गजन्य आजाराविरुद्धचे युद्ध मानवाने जिंकले आहे,’ अशी दर्पोक्ती अमेरिकी सर्जन जनरल विल्यम स्टेवर्टने ५० वर्षांपूर्वी केली होती. हे ऐकून सारे सूक्ष्मजीव पोट धरून  हसले असतील किंवा त्यांनी परस्परांना ‘एलओएल’ (LOL) असा मेसेज केला असेल. पण अशी दर्पोक्ती करणारा विल्यम एकटा नव्हता ‘साथीचे आजार आता इतिहासजमा झाले आहेत,’ असे नोबेल विजेत्या मॅक बन्रेटलाही १९६२ साली वाटले होते. संसर्गजन्य आजारांबाबतचे आपले भाकीत असे वारंवार चुकले आहे. सूक्ष्मजीवांची नेमकी ताकद ओळखण्यात आपण अपुरे पडलो आहोत, हे नक्की!

जगभरातील अशा विचित्र साथरोग परिस्थितीत मान्सून आपल्याकडे आला आहे. ‘सोनू तुला मान्सूनवर भरोसा नाय का?’ अशी पॅरोडी गावी अशी खरं म्हणजे मान्सूनची अवस्था आहे. भारतीय मान्सूनचे स्वरूप मागील काही वर्षांपासून बदलते आहे. १५०० किमीची आपली पश्चिम घाटाची पर्वतीय रांग एखाद्या हिरव्यागर्द रिबिनीसारखी दक्षिण पश्चिम अशी पसरली आहे. युनेस्कोने या पर्वतरांगेला हेरिटेज साइट म्हणून घोषित केले आहे. भारतीय मान्सून संपूर्णपणे या पर्वतरांगेवर अवलंबून आहे. पण मागील काही वर्षांपासून मान्सूनच्या पर्जन्यमानात १०-२० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे तर मान्सूननंतर आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडणाऱ्या पावसात वाढ होताना दिसते आहे. तर पश्चिम घाटाशी संबंधित कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र  या सहा राज्यांतील सरासरी तापमानात वाढ होताना दिसते आहे.  या बदलत्या वातावरणाचा परिणाम या राज्यातील वनस्पती जीवन,  शेती आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यावर होतो आहे. कोकणात शेतीची नासधूस करणारे हत्ती आणि ऐन उन्हाळ्यात म्हणजे चक्क एप्रिल-मेमध्ये वाढत्या इन्फ्लुएंझा केसेस हे चित्र बदलत्या मान्सूनमुळे अधिक ठळक होताना दिसते आहे. अर्थात वातावरणातील बदल आणि साथरोग यासंदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे.

पावसाळा हा अनेक साथरोगांचा महत्त्वाचा पारेषण कालावधी आहे. या कालावधीत वाढणाऱ्या साथरोगाचे वर्गीकरण मुख्यत्वे दोन विभागांत करता येणे शक्य आहे. एक म्हणजे पाण्यामुळे पसरणारे आजार अर्थात जलजन्य आजार. या गटात डायरिया, डिसेंट्री, कॉलरा, गॅस्ट्रो अशा आजारांसोबतच विषमज्वर (टायफॉइड), कावीळ अशा आजारांचा समावेश होतो. लेप्टोस्पायरोसिस हाही याच काळात बळावणारा एक आजार. दुसऱ्या गटात अप्रत्यक्षपणे पाण्यामुळे पसरणारे म्हणजे कीटकजन्य आजार. कारण पाणी साठल्यामुळे डासोत्पत्ती स्थाने निर्माण होऊन डासांमुळे होणाऱ्या आजारांतही वाढ होते ती याच काळात!  यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि  डासांमुळे पसणाऱ्या इतर आजारांचा समावेश होतो. याशिवाय हवेवाटे पसरणारा इन्फ्लुएंझा हा आजारदेखील मान्सून काळात डोके वर काढतो. एकूण काय,  पावसाळा नवे जीवन, नवे चतन्य देतो हे खरेच, पण –

उसळत घुसळत फेसाळत
जळ धावे दाही दिशांनी
आले नवे नवे पाणी!

असं वाजतगाजत आलेलं हे नवं नवं पाणी, आपल्या सोबत नव्या जुन्या आजारांच्या साथीदेखील घेऊन येते. पावसाचा अंतर्वरिोध आपल्या अवघ्या जगण्याच्या अंतर्वरिोधाचाच एक भाग आणि काय!

इन्फ्लुएंझा ए एच 1 एन 1

आपण याला स्वाइन फ्लू म्हणून ओळखतो. पण खरे तर याला या नावाने हाक मारणे योग्य नाही, कारण याचा आणि स्वाइनचा म्हणजे डुकराचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. आता तो आपल्याकडे सिझनल फ्लूसारखाचा वागतो आहे. २०१५ मधील मोठया उद्रेकानंतर २०१६ मध्ये या आजाराचा फारसा प्रादुर्भाव नव्हता. मात्र या वर्षी इन्फ्लुएंझाने पुन्हा डोके वर काढले असून भारतात आतापर्यंत ६५०हून अधिक मृत्यू या आजाराने झाले आहेत. आपल्या राज्यात फ्लूचे प्रमाण लक्षणीय आहे. जवळपास तीन हजार जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असून ३००हून अधिक मृत्यू या आजाराने झाले आहेत.

एप्रिल-मेपर्यंत मुंबईसह आपला कोकणपट्टीच्या प्रदेशात या आजाराचा फारसा प्रभाव नव्हता, पण पावसाच्या आगमनापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबवली या साऱ्या शहरी भागांत इन्फ्लुएंझा मोठय़ा प्रमाणावर दिसतो आहे. या आजाराने काही जणांनी आपला जीवही गमावला आहे.

फ्लू प्रसाराचा वेग

हा खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय’ आजार आहे. तो जगातल्या सर्व देशांत आढळतो. फ्लू इतक्या वेगाने कसा काय पसरू शकतो, याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.

फ्लूचा अधिशयन कालावधी एक ते सात दिवस एवढा कमी आहे. हा आजार पसरतो हवेवाटे, रुग्णाच्या िशकण्यातून आणि खोकल्यातून उडणाऱ्या थेंबातून! एका साध्या वाटणाऱ्या िशकेत सुमारे ४० हजार थेंब असतात, हे आपण लक्षात घेतले तर हा प्रसार किती वेगात होऊ शकतो हे आपल्या ध्यानात येईल. त्यात थंड हवामानात वाऱ्याचा वेग कमी असल्याने हे थेंब हवेत अधिक काळ तरंगतात त्यामुळे प्रसाराचा वेग अजून वाढतो. फ्लू झाल्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही अत्यंत अल्पजीवी असते. ती केवळ सहा-आठ महिने टिकते, त्यामुळे एका सिझनला आपल्याला फ्लू झाला तरी पुढल्या सिझनसाठी आपल्याला प्रतिकारशक्ती मिळत नाही. शिवाय ही प्रतिकारशक्ती  त्या त्या विषाणूपुरती असते म्हणजे एच 1 एन 1 ची प्रतिकारशक्ती एच 3 एन 2साठी उपयोगी पडत नाही. लक्षणे आढळणारे फ्लू रुग्ण जेवढे आढळतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोक हे फ्लू विषाणू शरीरात जाऊनही लक्षणविरहित असतात. अशा अनेक कारणांमुळे फ्लू खूप वेगाने पसरतो. त्यात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या देशात त्याचा प्रसाराचा वेग अधिकच वाढतो. ग्रामीण भागापेक्षा तो शहरी भागात अधिक सापडतो त्याचे कारणही तेच आहे. प्रौढांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण पाच ते दहा टक्के तर मुलांमध्ये २०-३० टक्के एवढे आहे. आजही दरवर्षी जगभरात अडीच ते पाच लक्ष लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लू विषाणूमुळे मृत्युमुखी पडतात असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. अमेरिकेत फ्लू हे मृत्यूचे सहाव्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे.

इतका गंभीर आजार आहे?

राज्यात ३००हून अधिक जणांनी आपला जीव गमवावा, इतका हा आजार गंभीर आहे का? याचं खरं उत्तर खरं म्हणजे नाही असं आहे. हा आजार सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाचा आहे. थोडासा ताप,  घसादुखी, अंगदुखी, खोकला असं याचं स्वरूप असतं. अनेकजण तर  दोन-तीन दिवसांत आपोआपच बरे होतात.

मात्र काही व्यक्तींमध्ये मात्र हा आजार गंभीर स्वरूप धारण करताना दिसतो. मागील काही वर्षांच्या अभ्यासानुसार इन्फ्लुएंझासंदर्भात हा अतिजोखमीचा गट खालीलप्रमाणे आहे –

  • मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती
  • हृदय आणि फुप्फुसाचे विकार असणाऱ्या व्यक्ती
  • किडनी, लिव्हर आधी बाबतींत इतर जुनाट आजार असणाऱ्या व्यक्ती
  • गरोदर माता
  • स्थूल व्यक्ती
  • धूम्रपान करणाऱ्या किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती

या अतिजोखमीच्या गटातील व्यक्तीने फ्लूसंदर्भात अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणताही सर्दी-खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांचा सल्ला विनाविलंब घ्यावा. फ्लूवरील ऑसेलटॅमीवीर (टॅमीफ्लू) हे औषध लक्षणे सुरू झाल्यापासून दोन दिवसांमध्ये सुरू केल्यास अधिक गुणकारी ठरते हे लक्षात घेतले तर वेळेवर उपचार सुरू करण्याची निकड आपल्या लक्षात येईल.

आपण काय केले पाहिजे?

इन्फ्लुएंझा आपल्यासोबत राहणारच आहे. आपण काय करायचे,  हा लाखमोलाचा प्रश्न. आपल्या हातात आहे, शहाणपणाने वागणे. लोकशाही आणि आरोग्य या दोन्हीमध्ये  ही एक गोष्ट कॉमन आहे. या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी,  संवर्धन करण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. आरोग्य म्हणजे आदल्या रात्री क्लासच्या नोट्स वाचून परीक्षा देण्यासारखी इन्संट गोष्ट नाही. आपल्याला आरोग्यदायी सवयी लावाव्या लागतील. याला कोणताच शॉर्टकट नाही.

फ्लू काय किंवा सध्या आपल्यासमोर आ वासून उभा राहिलेला टीबीसारखा जीवघेणा प्रश्न काय, आपल्या काही चुकीच्या सवयी बदलून आपल्याला या आजारांवर नियंत्रण आणणे शक्य आहे. हे आजार हवेवाटे म्हणजे िशकण्या-खोकण्यातून पसरतात. त्यात आपण इतस्तत थुंकत राहतो, यामुळे यांच्या प्रसाराला बळ मिळते. आपण ही साधी सवय बदलली तरी या आजारांचे प्रमाण कमी व्हायला कितीतरी मदत मिळणार आहे. ज्याला आपण रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हणतो, त्या आपण पाळायला हव्यात. िशकताना- खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे,  हात पुन्हा पुन्हा स्वच्छ धुणे,  आपल्याला फ्लूची लक्षणे असतील तर आपला जनसंपर्क कमी करणे,  या साध्या साध्या गोष्टी आपले फ्लूपासून रक्षण करतील. महत्त्वाचे म्हणजे आहार आणि विहार. शारीरिक व मानसिक ताण टाळणे, भरपूर पाणी पिणे, धूम्रपान टाळणे आणि हस्तांदोलनाऐवजी आपला खणखणीत भारतीय नमस्कार घालणे फ्लूला ‘राम राम’ करण्याकरिता आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे फ्लू हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. पण तरीही सर्दी-खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यासोबतच गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हा उपचाराचाच एक भाग आहे, याचे विस्मरण होऊ नये. फ्लूविरोधी लसीकरण हाही एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

डेंग्यू, चिकनगुनिया आणि…

गेल्या वर्षी भारतात डेंग्यूच्या सव्वा लाखाहून अधिक केसेस आढळल्या होत्या आणि त्यापकी सुमारे २५० रुग्णांचा मृत्यू या आजाराने झाला होता. यापकी जवळपास सात हजार रुग्ण आणि ३३ मृत्यू हे महाराष्ट्रात झाले होते. या वर्षी आतापर्यंत राज्यात डेंग्यूचे सुमारे ५०० रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण कमी आहे, मात्र मुंबई आणि जवळच्या शहरी भागासोबतच कोल्हापूर, नाशिक आणि पुण्यात डेंग्यूच्या छोटय़ामोठय़ा साथी सुरू आहेत. या साऱ्याच आकडय़ांकडे आपल्याला थोडे जपूनच पाहणे आवश्यक आहे. सर्वेक्षण व्यवस्थेच्या क्षमतेवर अधिक अचूक आकडेवारी मिळणे अवलंबून असते. याकरिताच या ९ जूनला भारत सरकारने डेंग्यू नोटिफाएबल आजार म्हणून घोषित केला आहे. यामुळे खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांना आपल्याकडील डेंग्यू रुग्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला कळविणे, बंधनकारक झाले आहे. यामुळे डेंग्यूची अधिक अचूक आकडेवारी मिळणे भविष्यात शक्य झाले आहे. अर्थात याकरिता आवश्यक यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत मॅप बेस्ड अभ्यासातून जगभरातील सर्वाधिक डेंग्यूग्रस्त भागांचा शोध घेण्यात आला, त्यात भारत सर्वाधिक डेंग्यूग्रस्त आढळला. दरवर्षी भारतात डेंग्यूचे सुमारे तीन कोटी रुग्ण आढळत असावेत, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासातून आपली सर्वेक्षण व्यवस्था अजून बळकट करण्याची आवश्यकताच अधोरेखित होत आहे.

सर्वाधिक भीती चिकनगुनियाची

ज्या डासांमुळे डेंग्यू पसरतो त्याच डासांमुळे चिकनगुनिया हा आजारही पसरतो, मात्र चिकनगुनियाचा विषाणू हा एकाच प्रकारचा असल्याने एकदा तो झाला की व्यक्तीला दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती मिळते.  त्यामुळे दरवर्षी चिकनगुनियाचा प्रभाव आढळत नाही. चिकनगुनियाची साथ साधारण दहा-बारा वर्षांनी येते, असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी महाराष्ट्रात २००६ मध्ये चिकनगुनियाची मोठी साथ आली होती, त्यात लाखो लोकांना या आजाराने घेरले होते. या वर्षी पुन्हा चिकनगुनिया डोके वर काढतो आहे. या वर्षी पुणे आणि सातारा परिसरात चिकनगुनियाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. डेंग्यूबद्दल बोलताना त्याच्या या धाकटय़ा भावंडाबद्दलही सावध राहायला हवे. हे दोघे एडीस डासाच्या पंखावर बसूनच येत असल्याने दोघांना रोखायचा मार्ग एकच आहे.

डेंग्यू आणि चिकनगुनियाचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठय़ात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठय़ात,  कुंडय़ा, फुलदाण्या, कारंजी, कूलरचे ट्रे, पक्ष्यांना-प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. याशिवाय खराब टायर्स,  नारळाच्या करवंटय़ा, इतस्तत: पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या, छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे,  रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपडय़ा पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात दिवसांकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो. एडीस डासाची अंडी पाण्याशिवाय एक वर्षभरही टिकू शकतात. डेंग्यूवर कोणतेही औषध आजमितीला उपलब्ध नाही. लस निर्माण करण्यात यश आले असले तरी ती आपल्याकडे उपलब्ध व्हायला, अजून काही अवधी लागेल. तिच्या परिणामकारकतेबाबत आजच काही भाष्य करता येणार नाही. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण..!!!

नव्यानं गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळलेला झिका हा आजार आणि जो भारतात कधीही येऊ शकतो अशी धास्ती असलेला यलो फीव्हर हा आजारदेखील याच डासामुळे पसरतात, हे लक्षात घेतले तर एडीस डास नियंत्रणाची गरज किती आहे, हे आपल्या लक्षात येईल.

डेंग्यू का वाढतोय?

डेंग्यू इतक्या वेगानं वाढतोय, त्याचे कारण काय? मागच्या ५० वर्षांत तो ३० पट वाढला आहे. डेंग्यूच्या या वाढीकरिता अनेक कारणे आहेत. ही सारी कारणे आरोग्यबाह्य़ आहेत. त्यामुळे त्याची उत्तरेदेखील आपल्याला सर्वसमावेशक धोरणात्मक नियोजनाने शोधावी लागतील, ती केवळ आरोग्य व्यवस्थेत सापडणार नाहीत.

अत्यंत वेगाने होत असलेले नियोजनशून्य शहरीकरण हे याचे एक प्रमुख कारण. वाढती लोकसंख्या, प्रचंड प्रमाणात होत असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर, वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण, अपुऱ्या नागरी सुविधा, नॉन बायोडिग्रेडेबल वस्तूंचा (बाटल्या, डिस्पोजेबल कप, प्लास्टिक वस्तू, टायर्स, इ.) यांचा मोठय़ा प्रमाणावरील वापर या व अशा अनेक कारणांनी डेंग्यूचे प्रमाण वाढण्यात हातभार लावला आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलाने, ग्लोबल वॉìमगने या आजाराला हातभार लावला आहे. साधारणपणे २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान आणि ७०-८० आद्र्रता ही डेंग्यू डासाच्या वाढीकरिता आवश्यक असते. या प्रकारच्या वातावरणात अंडी ते प्रौढ डास हा प्रवास सात ते आठ दिवसांत पूर्ण होतो. तापमान कमी असल्यास अंडी उबण्याचा हा कालावधी वाढतो. जगातल्या सव्वाशेहून अधिक देशांना हैराण करणाऱ्या या डासाचे आयुर्मान असते अवघे चार आठवडय़ांचे! मात्र वातावरणातील बदलामुळे वाढत्या तापमानात डासाचे जीवनचक्र अधिक वेगात पूर्ण होते, त्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढते, डासाच्या शरीरातील विषाणूंची वाढही अधिक वेगात होते, डासांचे चावण्याचे प्रमाणही वाढते. तापमान वाढीमुळे पूर्वी ज्या भागात एडीस आढळत नव्हता त्या भागातही या डासाला थारा मिळतो.

पावसामुळे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते. खूप जोराचा पाऊस झाला तर डासांची उत्पत्तीस्थाने वाहून जातात. मात्र रिमझिम पावसाने मात्र घराभोवती एडीस डासाच्या उत्पत्तीसाठी योग्य स्थाने निर्माण होतात. दुष्काळी परिस्थितीत लोकांची पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते, हेही डास वाढीला कारणीभूत ठरते.

डेंग्यू आणि इतर सर्वच कीटकजन्य आजार नियंत्रणासंदर्भात महाराष्ट्रासमोरील प्रश्न नेमके काय आहेत, याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण डेंग्यूवर मात करायची असेल तर वैयक्तिक पातळीबरोबरच आपल्याला धोरणात्मक पातळीवरही काही प्रयत्न करावे लागतील.

आपण काय करू शकतो?

प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वाच्या सहभागाची आत्यंतिक आवश्यकता आहे. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे, आपल्या घरात किंवा अवतीभवती नळ गळती असू नये,  घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदलणे किंवा कुंडय़ात डास अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकणे,  बििल्डगवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या असणे,  खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, अवतीभोवती/ घराच्या छतावर प्लास्टिकच्या वस्तू, इतर खोलगट वस्तू असतील त्या नष्ट करणे अथवा नष्ट करणे शक्य नसेल तर त्यात पाणी साठणार नाही अशा पद्धतीने ठेवणे, खराब टायर्समध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे या व अशासारख्या गोष्टी आपण साऱ्यांनी करणे, नियमितपणे करणे आवश्यक आहे. विशेषत: सुट्टीवर जाताना कमोड झाकून ठेवणे,  पाण्याची भांडी मोकळी करून पालथी घालून ठेवणे, नळ ठिबकून अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे.

हम साथ साथ है…

लोकसहभागाशिवाय कीटकजन्य आजार रोखणे कठीण आहे. याबाबतीत इंडोनेशियाच्या सव्वादोन लाख लोकवस्तीच्या पुर्वोकेरटो शहरात राबवलेले मॉडेल आपल्याला उपयोगी ठरेल. या शहरात आरोग्य विभागाने दर दहा घरांचा एक समूह (दसविस्मा)केला. प्रत्येक घरातील जबाबदार व्यक्तीला डेंग्यूचा डास,  त्याच्या अळ्या कशा ओळखायच्या, कशा पाहायच्या याचे प्रशिक्षण दिले. दर आठवडय़ाला एका घराने इतर नऊ घरांचे सर्वेक्षण करायचे आणि किती घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतात, याची नोंद करायची. विहित फॉर्म भरून आरोग्य विभागाला सादर करायचा. यामध्ये एका घराला दहा आठवडय़ांतून केवळ एकदा सर्वेक्षण करावे लागते. पण या अभिनव योजनेचा खूप चांगला फायदा झाला. योजनेच्या सुरुवातीला सुमारे २० टक्के घरांत एडीस डासाच्या अळ्या सापडत, काही दिवसांतच ते प्रमाण अवघ्या दोन टक्क्यांवर आले. आपले स्वच्छ भारत अभियान हा या साऱ्यावरील महत्त्वाचा उपाय आहे.

धोरणात्मक बदलांची गरज

डेंग्यू हा मुख्यत्वे शहरी भागात आढळतो आहे. आज महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले महत्त्वाचे राज्य आहे. आपल्याकडे २७ महानगरपालिका आहेत तर २५०हून अधिक नगरपालिका-नगर परिषदा आहेत. महानगरपालिका या नगरविकास विभागाकडे येतात तर नगरपालिका नगर प्रशासनाचा भाग आहेत. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची पायाभूत यंत्रणा ही मुख्यत्वे ग्रामीण भागात आहे. उपकेंद्र,  प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये ही यंत्रणा काही अपवाद वगळता उत्तम प्रकारे विकसित झाली आहे. मात्र शहरी भागातील आरोग्य यंत्रणा ही त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरी विभागात पायाभूत आरोग्य यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आत्ताशी कुठे त्याला सुरुवात झाली आहे. अर्थात केंद्र सरकारच्या या मदतीवर सर्वस्वी अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. घटनात्मकदृष्टया आरोग्य हा राज्याचा विषय असल्याने याबाबतीत राज्याने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरी भागातील आरोग्य यंत्रणा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विकसित होणे आवश्यक आहे. याकरिता सार्वजनिक आरोग्य, नगर विकास आणि नगर प्रशासन या विभागांना एकत्रित येऊन समन्वयाने काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. आज जुन्या मनपा वगळता इतर मनपा क्षेत्रात सार्वजनिक आरोग्याची यंत्रणा अभावानेच आढळते. नगरपालिका आणि नगर परिषदांमधील परिस्थिती काळजी करावी अशी आहे. या शहरी भागात पायाभूत सार्वजनिक आरोग्याचे जाळे विस्तारणे हे केवळ डेंग्यूकरिताच नव्हे तर सार्वजनिक आरोग्याच्या अनेक प्रश्नांकरिता आवश्यक आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मदतीने हे आपण अधिक वेगाने करू शकतो.

डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे सारेच कीटकजन्य आजार असल्याने या आजाराच्या नियंत्रणात कीटकशास्त्रज्ञांची (मेडिकल इन्टोमॉलॉजिस्ट) भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. डासांच्या जातींचा अभ्यास करणे, त्यांचे वर्तन अभ्यासणे, कीटकनाशकांची परिणामकारकता तपासणे, त्यानुसार योग्य कीटकनाशकाची निवड करणे,  कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून संभाव्य उद्रेकाची कल्पना देणे, अशी महत्त्वाची कामे या विषयातील तज्ज्ञ करत असतात. मात्र आज कीटकशास्त्र ही पूर्ण शाखाच दुर्लक्षित झाली आहे, असे दिसते. डेंग्यूच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपल्याला कीटकशास्त्र शाखा पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. केवळ धूरफवारणी ही धूळफेक आहे. डेंग्यू नियंत्रण याने साधणार नाही.

जलजन्य आजार आणि आपण

एकूण साथरोगांपकी बहुतांश आजार पाण्याच्या वाटेने आपल्यापर्यंत पोहोचतात. स्वच्छ पाण्याचा पुरवठा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे. दूषित पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, टाइफॉइड,  कावीळ असे आजार पसरतात. राज्यातील प्रत्येक पाणी स्त्रोत वर्षांतून दोन वेळा तपासण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर असे दोन वेळा राज्यभर साथरोग सर्वेक्षण करण्यात येते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे आणि लाल असे कार्ड देण्यात येते. मुंबईसारख्या शहरात फेरीवाले, पदपथावर खाद्यपदार्थ विकणारे यांच्याकडील पाणी आणि बर्फ यांचीदेखील तपासणी नियमित करण्यात येते. मागील वर्षी मुंबईतील फुटपाथवरील विक्रेत्यांकडील बहुतांश बर्फ नमुने दूषित आढळले होते. मुंबईत जलजन्य काविळीचे प्रमाणही लक्षणीय आहे, हे लक्षात घेतले तर आपण सर्वानी आपल्या पाण्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.  ‘रहमन पानी राखिये, बिन पानी सब सुन,’ या सुप्रसिद्ध दोहय़ानुसार पाणी राखलंच पाहिजे, पण ते शुद्ध असणेही तेवढंच आवश्यक आहे.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते आणि असे पाणी उंदराच्या अथवा जनावरांच्या मूत्रामुळे दूषित होते. या पाण्यातून गेल्याने लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार पसरतो. कोकणात भात शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही भात लावणीच्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव होतो. ताप, अंगदुखी, कावीळ, खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत. २०१५ मध्ये एकटय़ा मुंबईत या आजाराने १७ जण मृत्युमुखी पडले. या वर्षीही राज्यात या आजाराने पाच मृत्यू झाले आहेत. भातशेती करणारे शेतकरी, पशुपालक, कत्तलखान्यातील कामगार, ड्रेनेजची सफाई करणारे, ट्रक ड्रायव्हर अशा व्यावसायिकांना हा आजार विशेषत: होतो. आपल्या पायाला जखमा असताना पावसाच्या पाण्यातून जाताना काळजी घेणे, शेतात काम करताना हॅण्डग्लोव्ह्ज आणि गम बूटचा वापर करणे आवश्यक आहे. उंदीर नियंत्रण, गाईगुरांचे गोठे, घोडय़ांचे तबेले यांची स्वच्छता हाही लेप्टो नियंत्रणाचा एक आवश्यक भाग आहे.
डॉ. प्रदीप आवटे – response.lokprabha@expressindia.com