शहरांमध्ये मिळेल तेवढय़ा जागेत कशाबशा बांधलेल्या घरांमुळे वास्तुशास्त्राचा अजिबात विचार होत नाही आणि अशा घरांच्या रचनेचा त्यात राहणाऱ्यांच्या स्वभावावर परिणाम होत असतो, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
माणसाच्या बारूपाचा तसेच स्वभावाचा अंदाज त्याच्या जन्मकुंडलीवरून ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकाला लावता येतो. परंतु कालांतराने ह्य सर्वात बदल घडायला लागतो. आपल्या आजूबाजूची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती, वातावरणातील बदल, प्रदूषण, इ. अनेक घटक ह्य बदलाला कारणीभूत होत असतात. ह्य सर्व घटकांबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या स्वभावावर प्रभाव टाकत असतो आणि तो म्हणजे आपली राहती तसेच कार्यालयीन वास्तू.
वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा अतिशय निकटचा संबंध आहे. वास्तुशास्त्राच्या नियमांना डावलून बांधलेल्या घरात राहण्याऱ्या व्यक्ती नेहमी कसल्याना कसल्या तरी मानसिक तणावाखाली जगताना आढळतात व याचा विपरीत परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर, मैत्रीवर व एकूणच आयुष्यावर होतो. तो कसा व कधी ते आपण आता पाहू.
अलीकडच्या काळात शहरांची लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे, राहण्याच्या तसेच कार्यालयीन जागांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राला खिजगणतीत न धरता इमारती उभ्या राहत आहेत.
वास्तूचे स्वभावावर परिणाम
वास्तुशास्त्रानुसार प्लॉट अथवा फ्लॅटचा आकार हा चौरस असावा (आयताकृती चालेल), परंतु या नियमाच्या विपरीत अशी अत्यंत वेडय़ावाकडय़ा आकाराची, दिशांचे महत्त्व लक्षात न घेता बांधलेली घरे दोष निर्माण करतात.
आपल्या घरातील दिशा ओळखण्यासाठी एक साधी कृती करता येईल. बाजारातून एक साधं होकायंत्र आणून घराची उत्तर दिशा शोधावी. त्यानुसार इतर दिशादेखील समजतील.
वास्तूशास्त्रानुसार अनेक निकषांवर दिशा सदोष अथवा निर्दोष ठरतात. अगदी ढोबळमानाने सांगायचे तर एखाद्या दिशेला शौचालय असेल, ती दिशा पूर्णपणे बंद असेल किंवा त्यादिशेला अपेक्षित असलेली व्यवस्था आली नसेल (म्हणजे एखाद्या दिशेला स्वयंपाकघर होणार असेल, पण ते झालेच नसेल) तर त्या असे घटक त्या दिशेमध्ये दोष निर्माण करतात. अर्थातच ती दिशा सदोष मानावी. असे दोष नसणे म्हणजेच ती दिशा निर्दोष मानावी.
अर्थात ही ढोबळ परिमाणे झाली. दिशेचे सदोष-निदोर्षत्व ठरविण्यासाठी वास्तूशास्त्रात अनेक निकष असून त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. ढोबळ मानाने प्रत्येक दिशेचे सदोष निदरेषत्व आपल्यावर काय परिणाम करते ते पाहू.

पूर्व दिशा
निर्दोष असता :
स्वभाव प्रेमळ, त्यागी, कष्टाळू असतो. स्वत:हून दुसऱ्याच्या मदतीला धावून जातात. केवळ स्वत:च्याच कुटुंबाचा विचार न करता इतरांनाही कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागणूक देतात. प्रसिद्धीची आवड असते. संततीच्या बुद्धीत व ज्ञानात वाढ होते.
सदोष असता :
स्वभाव उतावळा, असंयमी, भावनेच्या आहारी जाणारा तसेच अव्यवहारी असतो. मन:स्थिती सतत द्विधा असते व त्यामुळे निर्णयक्षमतेचा अभाव असतो.

पश्चिम दिशा
निर्दोष असता :
कल्पक, शिस्तशीर असल्यामुळे कुठल्याही कार्यात यशस्वी होतात. नोकरचाकर विश्वासू मिळतात, पतीपत्नीमधील संबंध मैत्रीपूर्ण व मनमोकळे असतात. परिणामत: वैवाहिक जीवन आनंदी असते.
सदोष असता :
सदैव कल्पनाविश्वात वावरत असतात व त्यामुळे कुवतीपेक्षा जास्त धाडस करतात व नुकसान, अपयशाचे धनी होतात. कामापेक्षा जास्त मनोरंजनलाच महत्त्व देतात.
ह्य वास्तूतील व्यक्तींच्या बुद्धीवर विपरित परिणाम झाल्याने त्यांच्या कुठल्याही कामात कल्पनाशक्ती कमी पडते, बेशिस्तपणा व नियोजनाचा पूर्ण अभाव आढळतो. ह्य स्वभावाचा वाईट परिणाम वैवाहिक जीवनावर होऊन संतती होण्यात अडथळे येतात.
उत्तर दिशा
निर्दोष असता :
आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा व व्यवहारचातुर्य उत्तम असते, ह्य गुणांमुळे निर्णय सहसा चुकत नाहीत. ह्यमुळे संधींचा पुरेपूर फायदा घेऊन भरपूर अर्थार्जन करतात.
सदोष असता :
अत्यंत व्यवहारी असतात व ह्य दृष्टिकोनातूनच सर्व हितसंबंधांकडे बघतात. अतिमहत्त्वाकांक्षा व फाजील आत्मविश्वासामुळे बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेतात व नुकसान करून घेतात. पैसा हेच एकमेव धेय्य होते. गप्पाटप्पा व मनोरंजनात वेळ काढून नुकसानीचे धनी होतात.

दक्षिण दिशा
निर्दोष असता :
आत्मविश्वासू असतात, मानसिकदृष्टय़ाही संतुलित असतात व त्यामुळे पटकन निराश होत नाहीत व अपयश आल्यास खचून जात नाहीत. चालून आलेल्या संधींचा योग्य फायदा घेतात. वेळेचा सदुपयोग करतात.
सदोष असता :
छानछौकी व मौजमजेचीच आवड असते. पैसा मिळवायला कोणताही मार्ग चोखाळायची तयारी असते. माणूसघाणा स्वभाव, आत्मविश्वासाचा अभाव, सतत असुरक्षिततेची भावना ह्यमुळे नैराश्य येते व थोडय़ाशा अपयशानेही खचून जातात. मानसिक संतुलनही बिघडते. कुसंगतीमुळे कामापेक्षा इतर वाईट गोष्टींकडे ओढले जातात.
वास्तुशास्त्रात उपदिशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्य दिशांचा मानवी स्वभावावर फार महत्त्वपूर्ण परिणाम होताना दिसून येते.

ईशान्य दिशा
निर्दोष असता :
अशा वास्तूत राहणारी मंडळी अतिशय उदात्त स्वभावाची असतात, दुसऱ्याच्या कठीण प्रसंगात तत्परतेने धावून जातात, प्रसंगी पदरमोडदेखील करतात. निरनिराळ्या प्रकारच्या विद्या शिकण्याची, ज्ञानार्जनाची आवड असते. उत्तम आकलनशक्ती व स्मरणशक्ती असते. धाडसी, पराक्रमी असतात, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धमक असते, उत्कृष्ट वक्तृत्वकला अवगत असते. ह्य सर्व सद्गुणांचा उपयोग नियोजनबद्ध पद्धतीने जीवनात यशस्वी होण्यासाठी करताना दिसतात. एकूणच जीवनातील संघर्षांचे प्रमाण अल्प असते.
सदोष असता :
आत्मविश्वासाचा अभाव, सतत मानसिक तणाव, अविचाराने वागणे, इ. दोष अशा वास्तूत आढळून येतात.
स्वभावात अतिरेकीपणा असतो व ह्य स्वभावाला अनुसरून एखाद्याला मदतही इतकी अतिरेकी करतात की अगदी शिक्षणापासून ते नोकरी, लग्न पार अगदी बाळंतपण ही जणू काही ह्यंचीच जबाबदारी असते. एखादी गोष्ट सुरू तर करतात, पण थांबायचे कुठे तेच समजत नाही. परंतु करिअरच्या मागे लागून अनेक कर्तव्ये विसरतातही. कुवतीपेक्षा जास्त महत्त्वाकांक्षा बाळगतात. अतिरेकी धाडस व नसते मोठेपण मिरवतात. पैसे मिळवण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट व त्याग करायची ह्यंची तयारी असते.
स्वभावातील अतिरेकीपणाचे दोष ह्य वास्तूत ठळकपणे पाहायला मिळतात. कुठल्याही वयात कुठली तरी विद्या, शिक्षण घेण्यासाठी कितीही वेळ व पैसा खर्च करण्याची तयारी असते. मग भले ती विद्या उपयोगाची असो वा नसो, त्या शिक्षणापासून पैसा मिळो वा न मिळो! दुसरा महत्त्वाचा दोष असा की ह्यंना ह्यंच्या चुका दुसऱ्यांनी दाखवेपर्यंत समजतच नाहीत.
ह्य व्यक्तींकडून इतरांना असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात असमर्थ असतात व त्यामुळे मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी, इ.शी दुरावा निर्माण होतो. सततच्या मानसिक तणावामुळे मनोरुग्ण होण्याची शक्यता बळावते.
ह्य दोषामुळे एकूणच प्रगती धीम्या गतीनेच होते. घरातील कोणा ना कोणामुळे तरी सतत मन:स्ताप होत असतो. विशेषत: भावंडांमुळे अप्रिय प्रसंग उद्भवतात व त्यातच ह्यंचा मौल्यवान वेळ खर्ची पडतो. हा ह्य दोषाचा मोठा परिणाम असतो. ह्य लोकांचे बोलणे दुसऱ्याला जिव्हारी लागते.
हे लोक स्वत:च्याही नकळत सतत चुका करत असतात, परंतु इतरांनी त्या निदर्शनास आणून दिल्यावरही ह्यंना त्यावर विश्वास ठेवता येत नाही, पण जेव्हा त्यांना चुका झाल्याचे जाणवते तोपर्यंत ह्यंचे अपरिमित नुकसान झालेले असते.

आग्नेय दिशा
ह्य विभागाचा विचार धन-संपत्तीशी निगडित आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही ह्य विभागाला मोठे महत्त्व आहे.
निर्दोष असता :
स्वभाव उत्साही, कष्टाळू असतो, दुसऱ्यांच्या अडचणीत मदतीला धावून जातात, आरोग्य उत्तम राहिल्याने स्वभावात नैसर्गिकरीत्या एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. मनस्ताप खूपच कमी होतो. दोन पिढय़ांमध्ये सुसंवाद असतो ह्यमुळे आयुष्य सुखी, समाधानी, समृद्ध व यशस्वी असते.
सदोष असता :
संततीसंबंधी त्रास, अनाठायी प्रवास तसेच अग्निभय, अनारोग्य, आर्थिक समस्या, चिंता- नसत्या काळज्या, स्त्रियांना पीडा ह्य गोष्टी संभवतात.
सामन्यत: आळशी स्वभाव असतो, महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करून वायफळ गोष्टीत वेळ दवडतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ह्य स्वभावामुळे फारसे यश प्राप्त होत नाही.
प्रसिद्धीसाठी वेळ आणि पैसा दोन्ही फुकट घालवतात. पैशांचा अपव्यय होताना दिसतो. थँकलेस जॉब करण्याची जणू आवडच असते. ह्य दोषाचा विपरीत परिणाम संततीवरही होताना दिसतो, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो, उर्मटपणाने वागतात. वागणे अतिरेकी असू शकते. ह्य वास्तूतील तरुण पिढी ही शिरजोर, नसता तोरा मिरवणारी असते, वडिलधाऱ्या मंडळींना दुरुत्तरे देतात. घरातील सर्वच जण मोठमोठय़ाने एकमेकांशी भांडल्यासारखेच बोलतात. घरातील मुख्य पुरुष/स्त्री स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असताना दिसतात.
ह्य वास्तुदोषात अतिशय कष्टाने पैसा मिळतो व तोही थोडाच. पैसा मिळवणे हेच परम ध्येय असते व त्यासाठी कोणत्याही थराला जातात, अपार कष्टही करतात. संततीचे वागणे अतिरेकी असू शकते.
नोकरीतही बढतीचे प्रश्न त्रासदायक ठरतात. ह्य सर्वाचा परिणामस्वरूप प्रचंड मनस्ताप होतो. वरिष्ठ तसेच कनिष्ठ मंडळींबरोबर सामना करावा लागतो.

नैर्ऋत्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार ह्य प्रभागात स्थिर तत्त्व विराजते. म्हणूनच आयुष्यातील स्थैर्याचा बोध ह्य दिशेवरून होतो.
निर्दोष असता :
आयुष्यात स्थैर्य आल्यामुळे मानसिक संतुलन ढासळत नाही व त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही बऱ्याच अंशी कमी होताना दिसतात ह्यमुळे मनुष्य येणाऱ्या अडचणी- अडथळे सहजगत्या पार करतो. सत्कर्म करण्याची प्रवृत्ती दिसते, वायफळ गोष्टींमध्ये वेळ वाया न दवडता कष्ट करण्याची आवड असते.
सदोष असता :
ह्य दिशेतील दोषाचे वैशिष्टय़ असे की ह्य वास्तूत राहणाऱ्यांना तर मनस्ताप होतोच होतो, परंतु बांधकाम सुरू असताना बांधकामाशी संबंधित प्रत्येकाला कुठल्या तरी स्वरूपात मनस्ताप भोगावा लागतो. अशी वास्तू बांधत असताना सर्वच संबंधितांना अगदी साध्या कामगारांपासून ते आर्किटेक्टपर्यंत सर्वानाच मनस्ताप भोगावा लागतो.
ह्य व्यक्तींमध्ये आढळणारा एक दुर्गुण म्हणजे आळशीपणा. मोठेपणाचा प्रचंड हव्यास, परंतु आत्मविश्वासाच्या अभावामुळे यश हुलकावणी देते. ह्य वास्तुदोषाचा सर्वात वाईट परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतो. दोघांमधील विसंवाद टोकाला जाऊन त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. ह्य दोषाचे निराकरण शक्यतितक्या लवकर करणे अत्यावश्यक ठरते अन्यथा पती-पत्नी एकमेकांपासून कायमचे विभक्त होऊ शकतात. तडजोड न करण्याच्या स्वभावामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्यात हा दोष कारणीभूत ठरतो.
ह्य घरात राहणाऱ्या व्यक्तींना परस्परांकडून अपेक्षित प्रेम, माया, ऊब न मिळाल्यामुळे त्यांचा जगण्यातील रसच नाहीसा होतो व परिणामी संघर्ष वाढून घरातील वातावरण तप्त होते. माणसांचा स्वभाव अति तापट, चिडचिडा होतो. भांडण-तंटे कुठल्याही थराला पोहोचतात.
ह्य घरातील लोक बहुतांशी नास्तिक असतात. स्वत:वर संयम नसतो, प्रलोभनांच्या मागे धावतात.
ह्य घरांमध्ये असमाधान, अस्थैर्य, अशांतता असते. लहानसहान कारणांवरून घरात सतत वादविवाद, रुसवे-फुगवे, मानापमानाची नाटय़े घडत असतात व ह्यमुळे या लोकांच्या मनात जन्म वाया गेल्याची भावना रुजू लागते.

वायव्य दिशा
ही दिशा चंचलता व अस्थैर्याची निदर्शक आहे.
निर्दोष असता :
स्वभावातील चांचल्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे जीवनातही स्थैर्य येऊन येणाऱ्या अडचणींवर मात करतात. एकदा हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेण्याची धडपड दिसून येते. चांगले मित्र मिळतात. हितशत्रूंचे प्रमाण कमी असते. घरातील स्त्रियांना स्वत:चे करिअर करण्याची संधी मिळते व त्याही समाधानी असतात. वैवाहिक जोडीदार एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. मित्रमंडळी, नातेवाईक व आप्तेष्टांशी सलोख्याचे संबंध असतात.
सदोष असता :
कामापेक्षा दुसऱ्यांना मदत करणे, मौजमजा करणे असल्या गोष्टींमध्ये वेळ, पैसा व श्रम वाया घालवतात. ह्य व्यक्ती स्वत:च्या कल्पनाविश्वात वावरत असतात. अविचारी वृत्ती असते. मित्रच शत्रू होतात.
मुलांचे फाजील लाड करण्याने ती वाया जातात. घरच्या स्त्रियांची एकप्रकारे मानसिक कुचंबणा होते. ह्य मंडळींना निरनिराळी वाहने खरेदी करण्याचे जणू काही व्यसनच असते.
नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक ह्यंच्याशी दुरावा/ गैरसमज होतात. वेळेचे महत्त्वच समजत नाही. कामाचे गांभीर्य लक्षात येत नाही. नियोजनाचा अभाव असतो.
ह्य दोषाचा संबंध वैवाहिक जीवन व मुलांच्या प्रगतीशी असतो. परंतु त्याग न करण्याच्या स्वभावामुळे व वाढीस लागलेल्या स्वार्थी वृत्तीमुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेताना दिसत नाहीत व त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण होते. किरकोळ कारणांनी नातेवाईक, मित्रवर्ग, पाहुणे ह्यंच्याशी असलेले संबंध बिघडतात.
वास्तूतील सर्व दिशांतील गुणदोषांचा एकत्रित विचार करून मगच योग्य तो निष्कर्ष काढावा. ह्य माहितीचा उपयोग सुज्ञ वाचक स्वत:च्या स्वभावातील गुणदोषांचा विचार करून राहत्या/ कार्यालयीन वास्तूतील गुणदोष शोधून काढण्यासाठी निश्चितच करतील अशी अपेक्षा आहे. अर्थातच एखाद्या जाणकार वास्तुतज्ज्ञाचा सल्ला घेणेच कधीही योग्य ठरेल.
मनीषा नार्वेकर -response.lokprabha@expressindia.com