17-lp-ebookग्रंथालयांमधून, कपाटांमंधून विसावलेली पुस्तकं आता अगदी मोबाइलमध्येही सामावली जायला लागली आहेत. काय आहे ही ई- पुस्तकांची दुनिया आणि त्या दुनियेत मराठी भाषा नेमकी कुठे आहे?

अशोक बँकर हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सध्या पन्नाशीच्या घरात असलेला भारतीय लेखक. त्यांचे आठखंडी रामायण विशेष गाजलं. अशोक बँकरनी लिहिलेली ४२ पुस्तके ५८ देशांच्या १६ भाषांतून भाषांतरित झाली असून त्यांच्या २४ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांवर आधारित मालिका आल्या आणि गाजल्या आणि आता फिल्म्स येत आहेत. आजवर अशोक बँकर यांची एक लाख ऐंशी हजार पुस्तके ईपुस्तकांच्या स्वरूपात विकली गेली आहेत. म्हणजे त्यांची छापील पुस्तके जेवढी विकली गेली त्याच्या तुलनेत नऊ टक्के.

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

अशोक बँकर हा बहुधा बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करणारा पहिला मोठा भारतीय लेखक असावा. १९९५ च्या सुमारास जेव्हा भारतात इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात होण्यास प्रथमच सुरुवात झाली तेव्हापासून बँकर यांनी आपले लिखाण वाचकांशी ऑनलाईन शेअर करायला सुरुवात केली. भारतीय लेखकाचे पहिले ई पुस्तक, पहिली धारावाहिक कादंबरी आणि पहिली मल्टीमीडिआ कादंबरी हे सर्व काढण्याचा मान अशोक बँकरना जातो. डिजिटल प्रकाशनामध्ये हे असे आणि आणखी कितीतरी प्रयोग त्यांनी आजवर केले आहेत. भारतीय प्रकाशकांच्या धिमेपणाला कंटाळून त्यांनी स्वत:च आपल्या स्वत:च्या वेबसाइटमधून ई-पुस्तकांच्या आवृत्त्या प्रकाशित आणि वितरित करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वत:चे ई- पुस्तक स्टोअरच काढले.

पावलो कोएलो हे जागतिक पातळीवरचे आघाडीचे लेखक. अत्युच्च शिखरावर असतानादेखील लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी सोशल नेटवìकगचा वापर करण्याची कोणतीही कसर पावलो कोएलो यांनी सोडलेली नाही. फेसबुक आणि ट्विटरव्यतिरिक्त माय स्पेस, यू ट्यूब, इन्स्टॅग्राम, टम्बलर, विमिओ, गुगल प्लस, िपट्ररेस्ट वगरे वगरे सर्व सोशल नेटवìकग अ‍ॅप्लिकेशन्सचा त्यांनी प्रभावी वापर केलाय.

अशोक बँकर, पावलो कोएलो अशा लेखकांना जे करायला जमलं ते इंटरनेटच्या उदयाआधी शक्यच नव्हतं. या लेखकांनी स्वत:ची प्रसिद्धी स्वत:च फार प्रभावीपणे केली. त्यांनी आपल्या वाचकांशी रोजचा संवाद साधला. वाचकांना केवळ श्रोते न ठेवता त्यांना त्यांचा स्वत:चा आवाज मिळवून दिला आणि आपल्या लेखनप्रक्रियेत त्यांना जोडून घेतलं. मुख्य म्हणजे नव्या युगाचं तंत्रज्ञान समजून घेतलं आणि अंगीकारलं आणि या सगळ्या प्रक्रियेत वापरलं.

मराठी साहित्यात डिजिटल माध्यमाचा पहिला प्रयोग केला लेखिका कविता महाजन यांनी. त्यांनी ऑडिओ, व्हिडीओ, कॅलिग्राफी, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, अ‍ॅनिमेशन इत्यादींचा वापर करत ‘कुहू’ ही मल्टिमीडिआ कादंबरी २०११ मध्ये प्रकाशित केली ती छापील आणि डीव्हीडी अशा एकत्रित स्वरूपात.

ही उदाहरणं पाहिली तर आता बदलत्या काळात प्रकाशकाचे काम आणि स्थान बदलत चालले आहे, हे लक्षात येते. पूर्वीची अनेक कामे आता दुय्यम किंवा बिनमहत्त्वाचीही ठरू शकतात. आणि नव्या अपेक्षा, आव्हाने तयार होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिकी सरकार. चिकी सरकार या पेंग्विन इंडियाची भूतपूर्व प्रकाशक आणि रँडम हाऊस इंडियाची प्रमुख संपादक. तिने दुर्गा रघुनाथ या संपादिकेच्या जोडीने ‘जगरनॉट’ या नावाची कंपनी स्थापन केली असून मोबाइल फोन पब्लििशगचा संकल्प सोडला आहे. चिकी सरकार म्हणते, ‘आजचे जग बहुविध कामे एकाच यंत्रातून करू इच्छिते. अगदी एखाद्याकडे किंडल असलं तरी तो मोबाइलमधून वाचतो असं होऊ शकतं. त्यामुळे आम्ही मोबाईल नजरेपुढे ठेवूनच या रचनेचा विचार करीत आहोत. भारत फोनवर जगणार असेल, तर भारतीय जनता वाचनदेखील फोनवरच करेल. त्यांना त्यातून २०० पानांची जाडजूड पुस्तके देण्यात काय अर्थ आहे?’

यापुढे पुस्तके कशी जास्त वाचली जातील? त्याचे चिकी सरकारकडे एकच उत्तर आहे, ते म्हणजे फोन फोन आणि फोन! यातील अतिरेकाचा भाग जरी सोडला तरी आज भारतात १६ कोटींवर मोबाइल इंटरनेटधारक आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. यापकी पुस्तके वाचण्याची क्षमता असणाऱ्यांची किंवा वाचनाची गोडी लागू शकणाऱ्यांची मोठी संख्या असणार. पण या वाचकाला सामोरे जाताना छापील पुस्तकांच्या जशाच्या तशा ई आवृत्त्या काढणे चुकीचे होईल. चिकी सरकार असं सुचवते की तीन पातळ्यांवर पुस्तक काढावे: छापील पुस्तक, ई- पुस्तक आणि फोन पुस्तक.

या प्रकल्पाच्या कल्पनेवरच १५ कोटी रुपयांचे प्राथमिक भांडवल उभं राहिलं असून ‘आधार’चे नंदन निलेकणी आणि फॅब इंडियाचे विल्यम बीस्सेल यांचा सक्रिय पािठबा मिळाला आहे. या वर्षीच्या लेखकांची यादी जाहीर झाली असून त्यात अरुंधती रॉय, टिं्वकल खन्ना, राजदीप सरदेसाई, ऋजुता दिवेकर, विल्यम डॅलिरपले या लेखकांची आणि त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत.

चिकी सरकार आणि जगरनॉट प्रकाशनाचा हा प्रयोग किती यशस्वी होतो, त्यातून काय धडे मिळतात, भारतीय परिस्थितीप्रमाणे त्यात काय बदल करावे लागताहेत ते काळच ठरवेल. पण एवढे नक्की की प्रकाशन व्यवसाय एकविसाव्या शतकाच्या माहिती युगात कात टाकतो आहे आणि त्यात नवे नवे प्रयोग होत राहणार. अशीच किंवा याहून मोठी वादळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत किमान तीन क्षेत्रांत येऊन गेली जी पुस्तक व्यवसायाप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातलीच आहेत. ती म्हणजे संगीत, चित्रपट आणि वृत्तपत्रे. या तिन्हीही क्षेत्रांचा पुस्तक व्यवसायावर मोठा परिणाम होत असतो आणि प्रभाव पडतो.

त्यातलं पहिलं उदाहरण संगीत उद्योगाचं. १९७५ पासून १९९९ सालापर्यंत पाव शतक या उद्योगाची अभूतपूर्व अशी वाढ झाली. पण १९९९ मध्ये शॉन फॅिनग या एका कॉलेज विद्यार्थ्यांने काढलेल्या नॅपस्टर या विनामूल्य फाइल शेअिरग सॉफ्टवेअरमुळे गाणी डाउनलोड करणं आणि त्या गाण्यांच्या मूळ हक्कधारकांना डावलून आपल्याला पाहिजे त्याच्याशी ते मुक्तपणे शेअर करणं शक्य झालं. संगीत उद्योगाने लाख कायदेशीर, तांत्रिक उपाय केले. पण कशाचाच काही उपयोग होईना. परिणामी मागील १५ वर्षांत या उद्योगाचे आधीचे बिझिनेस मॉडेलच तुटून पडले. या सर्व उलथापालथीत असं लक्षात आलं की संगीत क्षेत्रातील कंपन्यांनी बदलतं जग लक्षात न घेता आडमुठेपणाची भूमिका घेऊन स्वत:चं नुकसान करून घेतलं.

18-lp-ebookदुसरं उदाहरण आहे चित्रपटांचं.  या उद्योगावरदेखील माहिती युगाने बेकायदा फिल्म डाऊनलोड, टोरांट सॉफ्टवेअर असे आघात केले, पण संगीत उद्योगाच्या अनुभवातून चित्रपट उद्योग हे शिकला की नव्या तंत्रज्ञानापुढे आडमुठेपणाचे धोरण काही कामाचं नाही. उलट आपल्यातच बदल करायला हवेत. चित्रपट उद्योगाला वेळही जास्त मिळाला. दुसरं असं की चित्रपटांसाठी केबल, व्हिडीओ या माध्यमातून इंटरनेटच्या आधीच नवं तंत्र आणि परवाना, वितरणाची यंत्रणा रुळली होती. माहिती युगाला अनुरूप नवे बिझिनेस मॉडेल व त्यानुरूप जुळवाजुळव आधीच करून झाली होती. नफा वभिागून घेण्याच्या नव्या व्यवस्था बऱ्यापकी तयार होत्या. तिसरं म्हणजे पूर्वी चित्रपट म्हणजे स्टुडीओ असं समीकरण होतं. त्याजागी छोटय़ा छोटय़ा संघटनांचं जाळं, त्यांच्या त्यांच्या गुंतवणुकी आणि कामांप्रमाणे महसूल विभागणी अशी रचना तयार झाली. चौथं चित्रपटाशी संबंधित कारण असं आहे की पायरटेड फिल्म उपलब्ध असली तरी थिएटरमध्ये फिल्म बघण्याचा आनंद वेगळाच असतो! या अनेक कारणांमुळे चित्रपट उद्योगाच्या बाबतीत वेगळंच घडलं.

तिसरं उदाहरण वृत्तपत्रांचं. प्रगत देशांत वृत्तपत्रांच्या विविध प्रकारच्या जाहिरातींचा ओघ आटला असून त्या सर्व डिजिटल मीडिया आणि टीव्हीकडे वळल्या आहेत. त्याचा व्यवसायावर परिणाम झाला असला तरी भारतासारख्या देशांमध्ये मात्र वृत्तपत्र व्यवसाय बहरला आहे. त्याच वेळी लोक मोबाइलवर सोशल नेटवर्किंग, चॅटिंग, ईमेलसारख्या साधनांनी एकमेकांशी संवाद साधतात. वृत्तवाहिन्या सक्रिय आहेत. पत्रकारितेतील नागरिक सहभाग वाढतो आहे.

आजचं युग तंत्रज्ञानात्मक एकीकरणाचं आहे. चित्रपट, टीव्ही, वृत्तपत्रे, पुस्तके ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील आणि त्यात प्रसारमाध्यम, ज्ञानमाध्यम व मनोरंजनमाध्यम सर्वाचीच सरमिसळ होत राहील. येत्या दहा वर्षांत हे आपल्या सर्वानाच प्रकर्षांने जाणवत राहील. ऑनलाइन, ऑन डिमांड, ऑन एव्हरी डिव्हाइस हा या काळाचा मंत्र असेल आणि बाय, सबस्क्राइब, शेअर, कॉट्रिब्युट, कोलॅबरेट हे तंत्र राहील.

माहिती युगाचे पुस्तक उद्योगावर झालेले ठळक परिणाम कोणते? पुस्तक प्रकाशकांचाच वरचष्माच आजवर पुस्तक उद्योगावर राहिला आहे. त्यानंतर येतात वितरक आणि त्यानंतर लेखक. इंटरनेटमुळे यातील परस्पर संबंधांवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन वितरकांची ताकद प्रचंड वाढली आहे. पण भारतात अजूनतरी प्रकाशकच केंद्रस्थानी आहेत. इथे पुस्तक उद्योगाला स्पर्धा करावी लागते आहे ती चित्रपट, टीव्ही, व्हिडीओ गेम्स यांच्याशी. त्यामुळे पुस्तक निर्मितीच्या बाबतीत प्रकाशकांनी, लेखकांनी नवकल्पनांचा आधार घेतला नाही तर भारतातील पुस्तक उद्योग स्वत:च्याच ओझ्याखाली दबलेला राहील. दुसरं असं की लेखकांना इंटरनेट युगात स्वयंप्रकाशनासारख्या बऱ्याच संधी उपलब्ध झाल्या आहेत. तिसरं असं की वाचकांचा दबाव वाढतो आहे. प्रकाशकांनी आणि लेखकांनी वाचकांशी सतत संवाद ठेवणं आवश्यक आहे. हा संवाद एकतर्फी नसून वाचकांसाठी सक्रिय व्यासपीठ हवं.

वाचनाच्या बाबतीत जगात जे वेगवेगळे प्रयोग चालले आहेत त्यांची दखल घ्यायला हवी. त्यातला एक प्रयोग आहे स्मार्टफोनवरची कादंबरी. हा जन्मला जपानमध्ये आणि तेथे अतिशय लोकप्रिय झाला. त्याला जपानमध्ये केताई शोसेत्सी असं म्हणतात. केताई म्हणजे सेल फोन आणि शोसेत्सी म्हणजे कादंबरी. २००० मध्ये एका जपानी युवकाने तो सुरू केला. त्याच्या कादंबरीचं नाव होत ‘डीप लव्ह’. १७ वर्षांच्या मुलीची ही कथा होती. ही कादंबरी छापली गेली आणि तिच्या २७ लाख प्रती विकल्या गेल्या. त्याचे कॉमिक आले, टीव्हीमालिका झाली आणि चित्रपटही. इथून जपानमध्ये सेल फोन कादंबरींचे पेवच फुटले. हे लोण पसरले चीन, स्विर्झलड, दक्षिण कोरिया, तवान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, फिनलंड, इटली. २००६ मध्ये मल्याळम भाषेत नीलकमल ही सेलफोन कादंबरी प्रकाशित झाली. फोन कादंबरी मुख्यत रोमँटिक असतात, पण आता त्यात इतरही प्रकारच्या कादंबऱ्या येऊ लागल्या आहेत. फोन कादंबरी हा प्रकार महिलांनी उचलून धरला आणि त्याच्या बहुतांशी लेखक महिलाच होत्या. या कादंबऱ्यांचा वाचक तरुण आहे आणि असा आहे की जो पुस्तके वाचणारा किंवा पुस्तकांच्या दुकानात जाणारा नाही. म्हणजे वाचनसंस्कृतीच्या परिघाबाहेरचा नवा वाचक आहे. भारतात चारोळ्या, हायकू रुजले पण फोन कादंबरी या प्रकाराचं वारंदेखील लागलं नाही. साहित्याच्या इतिहासात डोकावलं तर पूर्वीदेखील सेलफोन कादंबरीला मिळतीजुळती उदाहरणे आहेत. चार्ल्स डिकन्स यांचे पिकविक पेपर्स  (१८३६-३७ ) गाजलेलेच आहे. ते त्यावेळी वेगवेगळ्या भागांमधून प्रसिद्ध झाले होते आणि मागाहून पुस्तक रूपाने आले. इपिस्तोलरी कादंबरी हा प्रकार १८ व्या शतकात इंग्लंडमध्ये प्रचलित होता.

वॅटपॅड हे गोष्टी लिहिण्याचे संकेतस्थळ अमेरिकेतून चालते. त्यावर आपण एखादी गोष्ट किंवा दुसरे साहित्य आपण लिहू शकतो. ते आपल्यासारख्या पण खूप मोठय़ा समुदायाच्या समोर ठेवू शकतो. यातून नव्या लेखकांना संधी मिळू शकते आणि नवे लेखक घडू शकतात. वाचक आपल्या लिखाणावर आपली मते नोंदवू शकतात आणि सूचना करू शकतात. म्हणजे एरवी गोष्ट वगरे कोणतेही लेखन लेखक खासगीत करतो ते मोठय़ा समुदायाच्या साक्षीने करेल. आपण या वेबसाइटच्या आत आपला ग्रुप देखील बनवू शकतो. या संकेतस्थळावर २० लाख लेखक सध्या आहेत. दररोज एक लाख गोष्टी अपलोड होतात. दरमहा साडेतीन कोटी लोक भेट देतात. निम्मे सभासद अमेरिकेतले आहेत आणि निम्मे इतर देशांतले.

मराठीत बुक हंगामा डॉट कॉम या ई- पुस्तकांच्या साइटवर नुक्कड सारखे नवे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यात ऑनलाइन मराठी लघुकथा प्रकाशित केल्या जातात. तसेच ‘फिरस्ती’मध्ये प्रवासातील प्रत्यक्ष अनुभव साहित्यिक अंगाने ऑनलाइन प्रकाशित होतात. बुक हंगामा डॉट कॉम सुरू होण्याअगोदर त्यांनी दोनतीन वष्रे ‘न लिहिलेली पत्रे’ असं सदर फेसबुकवर चालवलं. त्याला महाराष्ट्रभर उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याचे एकोणीस हजारावर सभासद झाले. याचं कारण असं की त्यांनी एक अशी कार्यपद्धती आणि शैली विकसित केली की लोकांना लिहावंसं वाटावं आणि वाचकांना प्रतिक्रिया द्याव्याशा वाटाव्या. नवोदित लेखकांना आणि वाचकांना हे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे असं वाटतं. बुक हंगामाचे अध्र्वयू प्रसिद्ध नाटककार आणि लेखक विक्रम भागवत नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातून लिहितात, ‘बुकहंगामासाठी पहिले आणि अभूतपूर्व यशाचे पहिले साहित्य संमेलन संपले. घरी आलो. दिवसभर नुक्कडकथांचा कार्यक्रम पाहिलेले प्रेक्षक आजही बूथवर येत होते. भरभरून बोलत होते. खूप वेळा हेतुपुरस्सर दुर्लक्ष अनुभवल्यानंतर ‘सामान्य’ प्रेक्षकांचे हे प्रेम अनुभवत मी समोरून जाणाऱ्या अहंमन्य समीक्षकांकडे दुर्लक्ष करीत होतो.’ यावरून साहित्यातील नवे प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यासाठीचा वापर याबद्दल लोक किती उत्तेजित आहेत ते दिसून येते.

नवं तंत्रज्ञान समजून घ्यायचं, नव्या लेखकांना घडवायचं. नव्या वाचकांना वाचनाची गोडी लावायची. वाचकांशी सतत संवाद, संपर्क त्यांचा सक्रिय सहभाग आणि सहयोग या दिशेने लेखनात नवे नवे प्रयोग व्हायला हवेत. त्याचबरोबर जग जवळ आल्यामुळे, आजच्या जगाच्या अपरिहार्य जीवनशैलीमुळे, माहिती तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यात तयार झालेल्या जैविक संबंधांमुळे भाषेमध्ये बदल घडत आहेत काय, असल्यास ते कसे आणि कोणते याची दखल घेणं आता अपरिहार्य झालं आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चालणाऱ्या संवादाला आज वीसच वष्रे झाली आहेत. भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीने हा कालखंड तसा नगण्यच, अक्षरश: क्षणिकच, म्हणायला हवा. पण यातून लेखी आणि बोली भाषेतील काही कल कसे आहेत याचा अंदाज बांधणं शक्य आहे. एक मोठा बदल होतो आहे ज्याची दखल सर्वानीच घ्यायला हवी, तो म्हणजे आपण नकळत परत बोली भाषेकडे चाललो आहोत! खरं म्हणजे मानवी संस्कृतीचा बराच मोठा इतिहास बोली भाषेनेच व्यापला आहे. लेखन कला आणि छपाई यांच्या उदयानंतरच आपण छापील भाषेत, लिपीत अडकलो. संगणक आणि इंटरनेट यांच्या उदयानंतर आपण परत बोली भाषेकडे चाललो आहोत. ही बोली भाषा लिपी आणि आणि मल्टीमिडीआ च्या माध्यमातूनच आपल्याकडे येते आहे. पण ही बोली भाषा आणि पूर्वीची बोली भाषा यांच्यात खूप फरक आहे, म्हणून या भाषेला ‘नव-बोली भाषा’ म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. या नव्या भाषा बदलांची संवेदनशील आणि आघाडीच्या लेखकांनी केव्हाच दखल घेतली आहे.

इंटरनेट आणि कॉम्पुटरच्या आधीच स्वातंत्र्योत्तर काळातच ग्रामीण आणि दलित साहित्याला प्रथम साहित्यबाह्य़ मानलं गेलं. त्यानंतर कालांतराने त्यांना साहित्यात आणि विद्यापीठात मानाच्या खुच्र्या प्रदान केल्या गेल्या. १९९५ साली ईमेल हे तंत्र तरुण होते तेव्हा त्याचा उपयोग करणाऱ्यांचं सरासरी वय होत २० वष्रे. आता ईमेल वापरणाऱ्यांचं सरासरी वय आहे ४० वष्रे. याचा परिणाम असा झाला की ईमेलवर आधीच्या मिसरूड फुटलेल्या तरुणांच्या ईमेली भाषेवर मध्यमवयीन शिष्टाचाराच्या भाषेचे थर चढलेली भाषा तयार झाली. आजही ब्लॉग, वेबसाइट याच्यावर शिष्टाचारी भाषा दिसेल. त्याखालोखाल ईमेल जी पत्रासारखी असतात, त्यात मिश्रित भाषा दिसते. पण चॅटिंगवर भाषेची जीभ स्वैर सुटलेली दिसेल अगदी ग्राफिक इमोटिकॉनच्या वापरासकट. तिथे आजच्या भाषेतील मौखिकता, चित्रमयता आणि तात्कालिनता, कृतीशीलता हे सर्व प्रकर्षांने जाणवू लागते.

मराठीत डिजिटल पब्लिकेशन आणि ईबुक्स कुठपर्यंत पोहोचली आहेत? मराठीच काय तर सर्वच भारतीय भाषा तंत्रज्ञानाच्या बाबतीत पहिलं नाव घ्यावं लागेल तर ते म्हणजे एम. एस. श्रीधर यांचं. ते तामिळ असले तरी त्यांचं बहुतांश वास्तव्य महाराष्ट्रात झालंय. सर्व भारतीय लिपी आणि भाषा, म्हणजे सर्वच्या सर्व बावीस आणि उर्दू सकट सगळ्या, यांवर त्यांनी किमान तीस वष्रे काम केलंय. बहुतेकांना परिचित असलेल्या ‘आकृती’ भाषा सॉफ्टवेअरचे ते जनक आहेत. गेली काही वर्ष ते भारतीय भाषांसाठीच्या डिजिटल प्रकाशन आणि ई पुस्तकांच्या तंत्रज्ञानावर ते काम करीत आहेत. त्यांनी यासाठी हलन्त बुक्स नावाचे अ‍ॅप आणि हलन्त ईबुक स्टोअर सुरू केले आहे. आजमितीला या बाबतीत ते या क्षेत्रात अग्रगण्य मानले जातात.

बुकगंगा डॉट कॉम म्हणजे मराठीतील सर्वात पहिला आणि सर्वात जुना पुस्तकांच्या ऑनलाइन वितरणाचा आणि डिजिटल पब्लिकेशनचा प्रकल्प, जो अमेरिका स्थित मंदार जोगळेकर यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी सुरू केला. त्यावर पुस्तके ई पुस्तक स्वरूपात नसून पीडीएफ पद्धतीने ठेवली जातात. पण ती खुली नसून प्रोटेक्टेड असतात. त्यासाठी त्यांनी अ‍ॅप दिला आहे. मराठीतील बहुसंख्य प्रकाशकांनी आणि लेखकांनी आपली पुस्तके बुकगंगावर ठेवली आहेत. बुकगंगावर पंच्याहत्तर हजार छापील पुस्तके आहेत जी ऑनलाइन विकत घेता येतात आणि साडेपाच हजार डिजिटल पुस्तके आहेत जी पीडीएफ स्वरूपात आहेत.

ई साहित्य डॉट कॉम सुनील सामंत आणि त्याच्या मित्र-मत्रिणींच्या पुढाकाराने तयार झालेली स्वयंप्रकाशनाची सामाजिक चळवळ आहे ज्यावर पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात जी मोफत असतात. ही अशा कवी आणि लेखकांनी सुरू केली ज्यांना प्रस्थापित प्रकाशकांकडून पुस्तके प्रकाशित करायला अडचणी दिसू लागल्या. वाचकांना पुस्तके विनामूल्यच उपलब्ध व्हावीत अशी त्यांची धारणा आहे. त्यांनी आजवर साडेतीनशेच्या आसपास पुस्तके प्रकाशित केली आहेत. ई साहित्य प्रतिष्ठानचे जवळपास पाच हजार सभासद असून दोन लाख वाचक आहेत.

ग्रंथालीने २५ डिसेंबर २०१५ रोजी ग्रंथाली दिनी टॅब प्रकाशित केला ज्यात ई पुस्तके असतील. सव्वाशे र्इ पुस्तके असलेला टॅब पंधरा हजार रुपयांना उपलब्ध करून दिला आहे जो एरवीही टॅब म्हणूनदेखील वापरता येईल. पुस्तके ग्रंथालीव्यतिरिक्त दुसऱ्याही प्रकाशकांची असतील. त्यांनी जाहीर केले आहे की लवकरच अ‍ॅपदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे मराठीतील सहा मोठय़ा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर डॉट इन’ ही वेबसाइट सुरू केली आहेत. हे प्रकाशक आहेत पॉप्युलर, मौज, राजहंस, कँाटिनेंटल, रोहन आणि ज्योत्स्ना. सध्या या साइटवर ऑनलाइन छापील पुस्तके विकत घेण्याची व्यवस्था असली तरी लवकरच ई पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. मेहता प्रकाशनाने स्वत:ची पुस्तके स्वत:च्या वेबस्थळी टाकायला सुरुवात केली आहे.

पुस्तकांव्यतिरिक्त दिवाळी अंक इंटरनेटवर येऊ लागले आहेत. त्यातील एक लक्षणीय प्रयत्न सायली राजाध्यक्ष यांचा आहे. त्यांनी ‘डिजिटल कट्टा’ दिवाळी अंक आणि ‘डिजिटल वर्षां’ विशेषांक चालवले आहेत. छपाईला काट देऊन. उत्कृष्ट लेआउट, उत्कृष्ट साहित्य, उत्कृष्ट संपादन यामुळे ते अतिशय लोकप्रिय झाले आहेत. ते ऑनलाइन आणि पीडीएफ पद्धतीचे असून विनामूल्य आहेत. ‘डिजिटल वर्षां’ ३९ देशांतून साडेतीन हजार वाचकांनी वाचला आणि तेरा हजारांनी पाहिला.

डिजिटल पब्लिकेशन लेखकांना कसे वरदान ठरू शकते त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार दीनानाथ मनोहर यांची ‘रोबो’ ही कादंबरी. ही ग्रंथालीच्या स्थापनेच्या वेळी १९७५ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या तीन पुस्तकांपकी एक. त्यानंतर दीनानाथ मनोहर यांच्या बऱ्याच कादंबऱ्या आल्या. रोबोचे पुनर्मुद्रण व्हावं अशी दीनानाथ मनोहरांची खूप इच्छा होती. पण अनेक कारणांनी ते होत नव्हतं. शेवटी ई साहित्याने तीन वर्षांपूर्वी ती पीडीएफ ई पुस्तक म्हणून काढली आणि ती पुन्हा प्रकाशात आली. त्यानंतर ती मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावली. त्यापाठोपाठ शब्द प्रकाशनाने रोबो छापलीदेखील. आता दीनानाथ मनोहरांनी आपली आत्तापर्यंतची सर्व प्रकाशित म्हणजे आठ पुस्तके ई पुस्तक स्वरूपात काढायचे ठरवले असून ती हलन्त प्रकाशित करीत आहे.

आधुनिक जीवनशैलीत वावरणारा वाचक मल्टीटािस्कग आहे. तो अनेक गोष्टी करताना वाचनही करतो. आजचा ग्राहक हा एकाच यंत्रात, म्हणजे स्मार्ट फोनमध्ये वाचनासकट सर्वच अ‍ॅप्लिकेशन्स मिळावेत आणि तेदेखील कमीत कमी किमतीत अशा वृत्तीचा आहे. त्यामुळे ई-पुस्तकांना कॉम्प्युटर गेम्स, फिल्म्स, म्युझिक वगरेशी सामना करावा लागतो. आजच्या जगात वाचनाची गोडी कमी झाली आहे का? अजिबात नाही. आज कधी नव्हते तेवढे लोक शिक्षित झाले आहेत आणि वाचकांची संख्या वाढतेच आहे. विकीपेडिया या वाचकांच्या सहभागातून तयार झालेल्या ज्ञानकोशाला दरमहा एक हजार आठशे कोटी वेळा बघितले जाते, त्यावर तीन कोटी सात लाख लेख उपलब्ध आहेत, ऐंशी हजार लोक त्यावर लिहितात आणि मराठीसकट दोनशे ऐंशी भाषांमध्ये विकीपेडिया उपलब्ध आहे. पण वाचनाचा ढाचा आणि सवयी नक्कीच बदलत आहेत. पूर्वी शिक्षित लोकांच्या घरी पुस्तकाचे कपाट दिमाखाने उभे असायचे. आता ती जागा हळूहळू पर्सनल कॉम्प्युटर, स्मार्ट फोन यांतील ई पुस्तक संग्रह घेत आहे. पूर्वी बेस्ट सेलर्सवरच बहुतांशी व्यवसाय चालायचा. आता ई पुस्तके आणि ऑनलाइन वितरणामुळे बेस्ट सेलर्स एव्हढाच व्यवसाय असंख्य छोटय़ा-मोठय़ा पुस्तकांच्या एकूण विक्रीतून होतो हे क्रिस अँडरसन यांनी लाँग टेल हा सिद्धांत मांडून सिद्ध केले आहे. गुडरीड्स या वाचकांनी वाचकांसाठी चालवलेल्या पुस्तकांसाठीच्या जागतिक संकेतस्थळाचे चार कोटी सभासद आहेत, एकशे तीस कोटी पुस्तकांची त्यावर दखल घेण्यात आली आहे आणि चार कोटी सत्तर लाख पुस्तकांची परीक्षणे त्यावर उपलब्ध आहेत. आजच्या पुस्तक जगात दखल घेण्यासारखा नवा प्रकार म्हणजे सेल्फ पब्लििशग, म्हणजे लेखकाने स्वत:चे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचे. अ‍ॅमेझॉनचा असा दावा आहे की सेल्फ पब्लििशगला प्रतिसाद वाढतो आहे आणि अ‍ॅमेझॉनने भारतात किंडलवर प्रकाशित केलेल्या टॉप १०० पुस्तकांपकी २० पुस्तके सेल्फ पब्लिश्ड् आहेत. मराठीमध्येही ही लाट येईलच, पण त्यासाठी अजून काही काळ तरी वाट पाहावी लागेल !
अनिल शाळग्राम – response.lokprabha@expressindia.com