‘जब तक है जान’ व ‘सन ऑफ सरदार’ असे दोन बडे चित्रपट एकाच दिवशी एकामेकांसमोर उभे ठाकल्याच्या निमित्ताने एक ‘फ्लॅशबॅक’..
रमेश सिप्पीच्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ ‘शोले’समोरच झळकलेल्या विनोदकुमार या नवीन चेहऱ्याच्या ‘गरीब हटाओ’ चित्रपटाचा पालापाचोळा झाला.
राजेश खन्नाचे बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘कर्म’ (नायिका शबाना व विद्या सिन्हा) व शोभू मुखर्जी दिग्दर्शित ‘छैला बाबू’ (झीनतसोबत), एकाच शुक्रवारी झळकले, ‘कर्म’ त्याच्या प्रवृत्तीचा असूनही मसालेदार ‘छैला बाबू’ने यश मिळवले. शशी कपूर एकाच वेळी बऱ्याच चित्रपटांतून भूमिका साकारत असताना त्याचे दोन चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार होतेच, विजय भट्टचा ‘हीरा और पत्थर’ आणि प्रयाग राजचा ‘चोर सिपाही’ तसे झळकले व दोन्ही आपटले.
अमिताभचेही विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘ऐतबार’ व राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘खाकी’ एकाच दिवशी आले व गेले.
आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’, व अनिल शर्माचा ‘गदर- एक प्रेमकथा’ या दोघांनीही एकाच दिवशी झळकून यश मिळवले असा शुक्रवार सिनेमावाल्यांना हवाहवासा वाटतो.
सिनेमाचे जग गुणवत्तेपेक्षा यशाला खूपखूप महत्त्व देते. विशेषत: चोवीस तास मनोरंजनाचा रतीब टाकणाऱ्या उपग्रह वाहिन्या व फर्स्ट डे फर्स्ट शो संपण्यापूर्वीच त्याची चोरटय़ा मार्गाने येणारी चित्रफीत यांची स्पर्धा वाढल्याने तर यशाची किंमतही समजू लागली.दोन बडे चित्रपट एकाच शुक्रवारी झळकताना तुलना वाढते, काहीना एक जास्त आवडतो म्हणून दुसरा कमी का वाटतो याचे दर्शन घ्यावेसे वाटते.
अमिताभच्या ‘मिस्टर नटवरलाल’समोरच राज कपूर-राजेश खन्नाचा, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नौकरी’ झळकला, अशीही यानिमित्ताने आठवण येते..