ऋषि कपूर-नीतू सिंग-राकेश रोशन यांच्या ‘धमाल मस्ती’च्या ‘खेल खेल मे’ला घवघवीत यश मिळाले म्हणून दिग्दर्शक रवि टंडनने ‘झूठा कही का’ पडद्यावर आणला. तो त्या काळातला चित्रपटाचा ‘पुढचा भाग’ अर्थात सिक्वेल नव्हता का?
दीपक बलराज वीजने कायम मुंबईतील सामाजिक समस्या, गुन्हेगारी यावर चित्रपट काढले. ‘हप्ता बंद’ला चांगले यश मिळाले म्हणूनच त्याने ‘हप्ता वसूली’ घडवला. त्या काळात अशा घडामोडीला सिक्वेल म्हणत नव्हते हे दीपक बलराजचे दुर्दैव!
अनिल शर्माला कायम रक्तरंजित सूडकथांचे आकर्षण! नायक ‘शक्तीशाली’ ठरायला हवा म्हणून तो खलनायक ‘महाशक्तीशाली’ दाखवे. (एकदा दिग्दर्शक असाही दिसतो, हिंदी चित्रपटसृष्टीची वैशिष्टय़े किती बघा.) ‘हुकूमत’, ‘तहलका’, ‘एलान-ए-जंग’ हे त्याचे चित्रपट ‘पुढचा भाग’ वाटावेत असेच तर होते.
‘सपने साजन के’ला ‘साजन’चा पुढचा भाग म्हणता येणार नाही, दोन्हीच्या सादरीकरण  व संगीत यात केवढा फरक होता. पण निर्माता सुधाकर बोकाडे व दिग्दर्शक लॉरेन्स डिसौजा यानी ‘साजन’चे यश उपयोगी पडावे म्हणूनच तर ‘सपने साजन के’ निर्माण केला. त्यात घाई झाली व रंग उडाला.
ही उदाहरणे कोणती वा कशाला?
तर ‘चित्रपटाचा पुढचा भाग’ ही संस्कृती आपल्याकडे केव्हाच आली, पण ‘तसे काही म्हणायचे असते’ हे आपल्याला माहित नव्हते हो. ‘हॉलीवूड’ला तशी लाट आली म्हणून आपणही त्याच वाटेवर आलो.
तरी विजय आनंदच्या रहस्यरंजक ‘ज्वेल थीफ’चा पुढचा भाग म्हणून अशोक त्यागीने ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’ निर्माण केला हा आपल्याकडचा पहिला सिक्वेल चित्रपट चित्रपट, त्याला ‘ज्वेल थीफ’ची रस नव्हती, ते आता कशाला हो सांगायला हवे.
‘गोलमाल’, मग ‘गोलमाल रिटर्न’ ‘राज’ त्यानंतर ‘राज २’ ‘जन्नत’चा पुढचा भाग ‘जन्नत २’ असे करत करत ‘दबंग’चा पुढचा भाग ‘दबंग २’ आला. ‘चूलबूल पांडे’ची लोकप्रियता ‘वापरण्याचा’ हा प्रयत्न आहे. तो यशस्वी ठरलाच तर ‘दबंग ३’ मग ‘दबंग ४’ वगैरे चित्रपट मालिका सुरू राहिली तर ते हिंदी चित्रपटसृष्टीला साजेसे.
या लाटेत सर्वोत्तम ‘पुढचा भाग’ दिग्दर्शक राजकुमार हीरानी यांच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा ‘लगे रहो मुन्नाभाई’ पहिल्यात ‘प्यार की झप्पी’ मस्त होती. दुसऱ्यात महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान खूप सहजपणे साकारले. ‘समाजातील सर्व स्थरातील रसिकांना समजेल व म्हणूनच आवडेल’, असा चित्रपट निर्माण करणे जास्त कठीण असते. राजकुमार हीरानीला ते सिक्वेतमध्ये साध्य झाले.
प्रत्येक ‘पुढचा चित्रपट’ असाच दर्जेदार कसा ठरेल? बऱ्याचदा तरी पहिल्या चित्रपटाचे यश पुढच्याही चित्रपटाला लाभेल (वा लाभावे) हीच तर अपेक्षा असते.
यशाच्या भूमिकेतून हिंदी चित्रपटसृष्टीची संस्कृती कसे, का व कोणते वळण घेईल (नि त्याचेच वळण चालेल) काही सांगता येत नाही हो..