येथून ११० किलोमीटर अंतरावर सिरमौर जिल्ह्य़ातील मिल्ला गावाजवळ सोमवारी दुपारी एक बस ४०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १७ प्रवासी ठार आणि अन्य १२ जण गंभीररीत्या जखमी झाले. हे सर्व प्रवासी स्थानिक रहिवासी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातात सात जण जागीच ठार, तर अन्य दोघे जण रुग्णालयात नेताना मरण पावले. अन्य आठ जण पाओन्ता साहिब येथील रुग्णालयात उपचार करतेवेळी मरण पावले. ही बस मिल्ला येथून पाओन्ता साहिब येथे जात होती. या अपघाताची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गंभीररीत्या जखमी झालेल्या पाच जणांना चंदीगढ येथील पीजीआय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत प्रवाशांच्या निकटच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून २० हजार रुपये, तर जखमींना १५ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.