सलग तीन दिवस जोरदार पाऊस, अरुणाचल प्रदेशात अनेक भागांना पुराचा तडाखा
आसाममधील बराक खोऱ्यात करीमगंज व हैलाकांडी भागात जोरदार पावसानंतर भूस्खलनाने दहा जण ठार झाले. करीमगंज जिल्हय़ात सोनाशिरा येथे दरड कोसळण्याच्या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण मरण पावले. जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन टेकडीच्या खालच्या भागात असलेले घर गाडले गेले. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. यातील मृतांमध्ये एक पुरुष, त्याची पत्नी, मुलगी व दोन मुलग्यांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस पडत आहे. हैलाकांडी जिल्हय़ात भूस्खलनाच्या दोन घटनांत बिलाईपूर येथे चार जण ठार झाले, तर रामचंडी भागात सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. दोन घरांवर चिखलाचा ढिगारा कोसळून या लोकांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस यांनी मदतकार्य सुरू केले आहे.
इटानगर- अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे नोआ-देहिंग नदीला पूर आला असून त्यामुळे नामसई जिल्ह्य़ातील अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.
नामसई जिल्ह्य़ातील महादेवपूर-१ आणि महादेवपूर-४ आणि काकोनी गावांत पुराचे पाणी शिरले असून पिकेही बुडाली आहेत, असे एका अधिकृत अहवालात म्हटले आहे.
न्यू सिलाटो येथे १० मे रोजी उभारण्यात आलेल्या बांबूच्या १४ बांधकामांपैकी पाच बांधकामे वाहून गेल्याने महादेवपूर शहराला धोका निर्माण झाला आहे.