येथील सियाल्दाह भागात एका पाच मजली गोदामाला लागलेल्या आगीत आतापर्यंत १९ जण होरपळून मरण पावले. प्लॅस्टिक आणि पेपर्सचा मोठा साठा असलेल्या या गोदामाला बुधवारी पहाटे ३.५०च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत अन्य १० जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
सूर्य सेन मार्केट कॉम्प्लेक्स असे आगीत भस्मसात झालेल्या इमारतीचे नाव आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांची कार्यालये आणि गोदामे असून मरण पावलेल्यांतील बहुसंख्यजण हे येथील कामगार आहेत. हे कामगार रात्री गाढ झोपेत असताना या ठिकाणी आग लागल्याचे या मार्केटचे उपाध्यक्ष सुशांत घोष यांनी सांगितले.
या इमारतीतील मार्गिका आणि जिन्यांच्या पायऱ्यांवरही सर्रास सामान ठेवण्यात येत असल्यामुळे आग लागल्यानंतर येथून सुटकेसाठी बाहेर पडणाऱ्यांची यामुळे चांगलीच कोंडी झाली.
या गोदामातील बहुतांश भागात प्लॅस्टिकचे पेपर आणि कपडे ठेवले जातात. यामुळे आग लागल्यानंतर या वस्तूंनी पेट घेतल्याने ही आग वेगात इतरत्र पसरली व सुमारे २०० दुकानांना याची मोठय़ा प्रमाणात झळ बसली, असे घोष म्हणाले.
गोदामाच्या या इमारतीत जाण्या-येण्यासाठी एकच प्रवेशद्वार असून संकटकाळी बाहेर जाण्यासाठी अन्य एक मार्ग आहे. मात्र या मार्गाचा गेल्या १५ वर्षांत वापर करण्यात आलेला नसल्याने तो बंदच होता. प्लॅस्टिक, कपडे आणि गॅस सिलेंडर्समुळे ही आग गोदामात इतरत्र वेगाने पसरली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस, अग्निशामक दल आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या घटनेचा इत्थंभूत तपशील तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
आगीत होरपळून जखमी झालेल्यांना येथील एनआरएस आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी या संपूर्ण भागाचा ताबा घेतला असून आग शमवण्यासाठी अग्निशामक दलाचे २६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत आतापर्यंत १९ जण मरण पावले असून अन्य १० जण गंभीररीत्या जखमी झाल्याचे सह-पोलीस आयुक्त (मुख्यालय) यांनी सांगितले.
सामान्यांतील धैर्य..
सूर्य सेन बाजारला लागलेल्या भीषण सर्वसामान्य कोलकत्ताकरांच्या धर्य आणि परस्पर साहाय्यभूततेचे अद्वितीय दर्शन घडल़े  आगीच्या लोळांत सापडलेल्या कुणा अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी कोणी आपला जीव धोक्यात घालत होत़े  तर कुणी जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाइी आटापिटा करीत होत़े
घटनास्थळापासून जवळपास राहणाऱ्या रणजीत हजरा, संजय गिरी, झांटू सरकार आणि सुशांत घोष यांनी अनेक अनोळखी लोकांचे प्राण वाचविल़े