भूकंपाचा प्रचंड हादरा बसलेल्या नेपाळमधील काठमांडूमधून ५५० भारतीय सुखरुपपणे मायदेशी परतले आहेत. शनिवारी रात्री १०.४५ पासून चार हवाई दलाची विमाने भारतात दाखल झाली. यामधून सुमारे ५४६ भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले.
वायूसेनेच्या पहिल्या विमानातून ५५ भारतीयांना  रात्री ११ च्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर रात्री दीड वाजता १०२ भारतीयांना दुसऱ्य़ा विमानाने परत आणले. आज सकाळी ४ च्या सुमारास नवी दिल्लीत आलेल्या तिस-या विमानातून १५२ भारतीय परतले. सकाळी ६ वाजता चौथ्या विमानातून २३१ भारतीय परतले. नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा प्रत्येक जिल्ह्य़ात शोध घेतला जात असून स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्यास राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकचे पर्यटक दोन दिवसांत परतणार
*नाशिकमधील ‘चौधरी यात्रा कंपनी’तर्फे नेपाळमध्ये गेलेले ५२ पर्यटक काठमांडूत सुखरूप आहेत. काठमांडूपासून ३० किलोमीटर दूर रस्त्यावर डोंगरकडा कोसळला असून वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे.
*रस्त्यावरील ढिगारा रविवापर्यंत हटविण्यात येईल आणि त्यानंतर रस्ता मोकळा होईल, असे आश्वासन नेपाळमधील सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.
*आमचे पर्यटक दोन दिवसांत परतीची वाट धरतील, अशी अपेक्षा चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी व्यक्त केली