दिल्लीत भाजपची सरकार स्थापन करावयाची खरोखरच इच्छा असल्यास त्यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करावे, अशी विनंती आम आदमी पार्टीने (आप) नायब राज्यपाल नजीब जंग यांना केली आहे.
दिल्लीत भाजपची सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे का, हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी प्रथम भाजपच्या नेत्यांना पाचारण करावे. भाजपची इच्छा नसल्यास किंवा त्यांनी असमर्थता दर्शविल्यास राज्यपालांनी राज्य विधानसभा निलंबनावस्थेत ठेवण्याची राष्ट्रपतींना शिफारस करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आपचे नेते प्रशांत भूषण यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
दिल्लीतील जनतेला लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार मिळावे यासाठी प्रशांत भूषण यांनी नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांना योग्य निर्णय घेण्याची विनंती केली. दिल्ली विधानसभा निलंबनावस्थेत ठेवण्यावरून आपचा राज्यपालांशी कायदेशीर लढा सुरू आहे.