दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये जोरदार’आप’टल्यानंतर आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्याकडून झालेल्या चुकांची कबुलीच दिली आहे. पंजाब, गोवा विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने पक्षाच्या नेत्यांच्या निशाण्यावर आलेल्या केजरीवाल यांनी शनिवारी सकाळी ट्विटरवर एक पत्र जारी करून आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कार्यकर्ते आणि मतदारांशी चर्चा केली. वास्तवात आम्ही चुका केल्या. त्यावर आत्मचिंतन करून केलेल्या चुका सुधारू, असे ते म्हणाले. केजरीवालांच्या कबुलीनंतर दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी त्यांना जोरदार चिमटा काढला आहे. केजरीवाल यांनी माफी मागण्यास उशीर केला, असे ते म्हणाले.

आम्ही केलेल्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. ते करणे गरजेचे आहे. आम्हाला आत्मचिंतन करायला हवे. कार्यवाही करण्याची गरज आहे. कारणे देऊन चालणार नाही. आम्हाला पुन्हा कामावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे केजरीवाल म्हणाले. वेळोवेळी आम्ही चुका केल्या आहेत. आत्मचिंतन करून दमदार पुनरागमन करायचे आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी त्याचा आमच्या सरकारच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिल्लीकरांना दिली.

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली होती. पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कुमार विश्वास यांनीही काल, शुक्रवारी त्यांच्यावर टीका केली होती. महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रामुळे (ईव्हीएम) नाही, तर जनतेनेच आपचा पराभव केला. केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायला नको होती, असे ते म्हणाले होते. आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधला नाही. अनेक महत्त्वाचे निर्णय बंद खोलीत झाले. महापालिका निवडणुकीत चुकीच्या लोकांना तिकीटे देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला होता. ईव्हीएममध्ये फेरफार हा निवडणुकीचा एक भाग आहे. याबाबत निवडणूक आयोग आणि न्यायालयात आपण तक्रार करू शकतो, असे त्यांनी सुनावले होते.