आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजप सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेस पक्षाप्रमाणे भाजपही सीबीआय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. यापूर्वी स्वपक्षातील किंवा घटकपक्षातील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास कमकुवत करण्यासाठी काँग्रेसने सीबीआयचा गैरवापर केला होता. आता भाजपही  पक्षाध्यक्ष अमित शहा यांना दंगलीच्या आरोपांमधून मुक्त करण्यासाठी सीबीआयचा दुरूपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले. मग आता प्रसारमाध्यमे शांत का बसली आहेत, प्रसारमाध्यमे अमित शहांना झुकते माप देत आहेत, का त्यांना शहांचे भय वाटते, असा सवालही केजरीवालांनी यावेळी उपस्थित केला.